सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसह खासगी वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा असा सीएनजीचा पुरवठा विस्कळीत झाल्यामुळे लोकांना फटका बसला आहे. मुंबई आणि उपनगरातील नागरिकांना मागील दोन दिवसांपासून सीएनजीच्या तुटवड्याचा चांगलाच दणका बसला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. रविवारी झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे सोमवारी मुंबईची वाहतूक व्यवस्था खिळखिळी झाली होती. तर मंगळवारीही याचा फटका बसल्याचे दिसून आले.
सीएनजीच्या तुटवड्यामुळे रिक्षा- टॅक्सी चालकांपासून सर्वसामान्य प्रवाशांचे हाल होत आहेत. मुंबईच्या वडाळा परिसरातील गेल (GAIL) गॅसच्या मुख्य पाइपलाईनमध्ये रविवारी दुपारी अचानक तांत्रिक बिघाड झाला. यानंतर संपूर्ण मुंबई आणि ठाणे परिसरातील सीएनजी पुरवठा विस्कळीत झाला. या बिघाडामुळे अनेक सीएनजी पंप बंद पडले तर, जे काही थोडे पंप सुरू होते त्या काही पंपांवर प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. अक्षरशः वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्याचे चित्र होते.
रविवारीपासून बंद असलेला पुरवठा सोमवारी आणि मंगळवारीही पूर्णपणे सुरळीत झालेला नाही. महानगर गॅस लिमिटेडनुसार, पाइपलाईनची दुरुस्ती अजूनही युद्धपातळीवर सुरू आहे. सीएनजी वापरकर्त्यांना अडचण होऊ नये म्हणून पर्यायी पुरवठा व्यवस्था करण्यात आली आहे. शक्य तितके सीएनजी पंप सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. तरीही पुरवठा कमी असल्याने सीएनजी पंपांवर मोठ्या रांगा दिसून येत आहेत.
हेही वाचा..
बिहारच्या जनतेने जातीयवादाच्या विषाला नाकारले
इथिओपियाहून ‘कॅप्सूल’ कोकेन तस्करी
भारतीय फिरकीच्या जाळ्यात आफ्रिका —९३/७!
कॅप्टन गिल मैदानात कधी उतरणार?
नवी मुंबईमध्ये काही पंप सोमवारी रात्रीपासून सुरू झाले असले तरी अनेक ठिकाणी अजूनही पंप बंद आहेत. ठाण्यातही दोन दिवस सलग सीएनजी उपलब्ध नसल्याने रिक्षा- टॅक्सी वाहतूक काहीशी ठप्प झाली होती. रिक्षा व टॅक्सी चालकांना सीएनजी न मिळाल्याने गाड्या उभ्या ठेवाव्या लागत आहेत. सीएनजीसाठी तासनतास रांगेत उभं राहावं लागत आहे. सीएनजी तुटवड्याचा थेट परिणाम प्रवाशांवर झाला आहे. रिक्षा-टॅक्सी कमी मिळत असल्याने भाडेवाढ आणि प्रतीक्षासुद्धा वाढली आहे. पूर्ण स्थिती पूर्ववत होण्यासाठी आणखी काही वेळ लागू शकतो. त्यामुळे रिक्षा व टॅक्सी चालकांसह प्रवाशांना मोठा फटका बसला आहे.







