इव्हेंट अर्थव्यवस्थेचे आर्थिक मूल्य
बुक माय शोच्या
या वर्षअखेरच्या अहवालानुसार मुंबईची ‘लाईव्ह एंटरटेनमेंट’ची (थेट मनोरंजन) ओढ २०२५ मध्ये अधिकच वाढली आहे. शहराच्या मनोरंजन वापरात (consumption) वार्षिक १८% वाढ झाली असून, यामुळे भारतातील सर्वात प्रगल्भ आणि लवचिक मनोरंजन बाजारपेठ म्हणून मुंबईचे स्थान अधिक भक्कम झाले आहे.
मुंबईत एका मोठ्या संगीत महोत्सवात ३,०००-५,००० तिकिटे विकली जातात (प्रति तिकीट १,५००-५,००० रुपये). या कार्यक्रमांच्या आयोजकांना प्रायोजक(जाहिराती देणाऱ्या कंपन्या), विविध वस्तूंची विक्री, विविध पेये आणि खाद्यपदार्थांच्या स्टॉल्समधून प्रचंड अतिरिक्त उत्पन्न मिळते. सर्वसामान्य मित्र, कुटुंबासोबत चांगला आनंदी अनुभव घेण्यासाठी हजारो लाखो लोक महागडी तिकिटे विकत घेऊन अशा कार्यक्रमांना सहभागी होतात.
इव्हेंट इकॉनॉमी आणि ‘ड्रग्स इकॉनॉमी’
मुंबईतील कार्यक्रमांमध्ये अमली पदार्थांचा वापर ही बाब नवीन नाही. सनबर्न फेस्टिव्हल (जो २०२५ मध्ये शिवडी, मुंबई येथे झाला) च्या इतिहासात २००९, २०१४, २०१९ आणि २०२४ मध्ये अमली पदार्थांच्या अतिसेवनामुळे (ड्रग ओव्हरडोझ) मृत्यू झाल्याच्या घटनांची नोंद झाली आहे. २०१३ मध्ये अमली पदार्थ विरोधी पथकाने (अँटी-नार्कॉटिक्स सेल) १,००० पेक्षा अधिक लोकांना पडकून केटामाइनच्या ४५० बाटल्या जप्त केल्या होत्या.
मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने (ANC) गेल्या ४ वर्षांत ६,७३८ कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले आहेत. युवकांमध्ये (१८-३० वयोगट) कृत्रिम अमली पदार्थांचा (MDMA, LSD, मेफेड्रोन) वापर वाढला आहे. कारण ते ‘ट्रेंडी’ आहेत. तरुण लोक मजा म्हणून ‘आनंदासाठी’ या वस्तूंचे सेवन करतात असे दिसून आले आहे.
ताज्या नेस्को प्रकरणातही एमडीएमए आणि मेफेड्रोन सारखी कृत्रिम अंमली पदार्थ औषधे युवकांमध्ये (विशेषतः महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये) प्रचलित असल्याचे दिसून आले आहे. हे अंमली पदार्थ ‘पार्टी पिल्स’ म्हणून विकले जातात. या रंगीत गोळ्या स्वस्त (प्रति गोळी ५००-१,५०० रुपये) असून त्यांची वितरण पद्धत (कुरियर ॲप्स, स्नॅपचॅट, व्हॉट्सॲप) अत्यंत सोपी आहे असे दिसून आले आहे. यावरून हा प्रकार आपल्या अगदी दारात पोहोचला आहे, त्याचे सर्वसामान्यीकरण अत्यंत वेगाने घडवले जात आहे हेच सिद्ध होते आहे.
अमली पदार्थांची तस्करी, काळा पैसा, करचोरी आणि आयोजक-विक्रेते यांच्यातील गुप्त भागीदारी अनेक प्रकरणांच्या तपासात निष्पन्न झाली आहे. नेस्को प्रकरणात पोलिसांनी “आयोजक आणि विक्रेते एकमेकांच्या संगनमताने काम करत होते.” असे स्पष्टपणे सांगितले. अमली पदार्थांच्या विक्रीतून कार्यक्रमात २०-३०% इतकी प्रचंड अतिरिक्त ‘अनधिकृत’ कमाई होते असे आढळून आले आहे. काही आयोजक सुरक्षा तपासणी जाणीवपूर्वक शिथिल ठेवतात किंवा आपल्या कर्मचाऱ्यांमार्फत (इनसाइडर्स) अमली पदार्थ कार्यक्रमस्थळी पोहोचवतात असेही लक्षात आले आहे.
याचा अर्थ असा होतो की मोठ्या कार्यक्रमांच्या निमित्ताने अंमली पदार्थ विक्रीच्या अवैध धंद्यालाही मोठी चालना मिळत आहे. एखाद्या संगीत महोत्सवात सहभागी होणाऱ्या ३,७०० लोकांपैकी २०-२५ जण अमली पदार्थांचे सेवन करत असतील, तर ते ‘सामान्य’ मानले जाऊ लागले आहे. हे एक प्रकारचे सांस्कृतिक विषारीकरण आहे.
आणि ही बाब महाराष्ट्रातील सर्वानीच अत्यंत गांभीर्याने घेण्याची गोष्ट आहे.
यात कोणते लोक सामील आहेत?
१. युवक आणि विद्यार्थी: नेस्को प्रकरणात प्रतीक पांडे आणि रोनक खंडेलवाल सारखे एमबीए विद्यार्थी वितरक होते. ते स्वतः सेवन करतात आणि मित्रांनाही विकतात.
२. ग्लॅमर आणि बॉलिवूड: अश्विनी पॉल बार डान्सर आहे, तर जिया जेकब चरित्र अभिनेत्री आहे. व्यवसायाच्या निमित्ताने अशा व्यक्ती अनेक लोकांच्या संपर्कात येतात. त्यामुळे त्यांचा वापर ड्रग्जचे वितरण, विक्री यासाठी करून घेतला जातो.
३. स्थानिक पुरवठादार आणि विक्रेते : मोठमोठे अंमली पदार्थ विक्रीचे नेक्सस चालवणारे लोक चीन किंवा युरोपमधून कृत्रिम अमली पदार्थ आयात करतात. पुढे ते कुरियर ॲप्स आणि पोर्टर्सचा वापर करून व्यसनी लोकांपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था बसवतात.
४. इव्हेंट आयोजक आणि कर्मचारी: विहान सामल, विनोद जैन, बालकृष्ण कुरुप. हे लोक सुरक्षा तपासणी शिथिल ठेवतात किंवा ‘कमिशन’ घेतात. काही प्रकरणांत आयोजक स्वतः अमली पदार्थ पुरवतात.
५. गुन्हेगारी जगतातील अपराधी, डॉन आणि दहशतवादी: मुंबईचे पारंपारिक ‘डॉन’ नेटवर्क आणि अंमली पदार्थ विक्री यात अनेक वर्षे घनिष्ट संबंध राहिला आहे. मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने २०२५ मध्ये दाऊद इब्राहिम टोळीशी संबंधित सलीम डोला, ताहिर डोला यांना ड्रग पार्टीज आयोजित करण्यासाठी अटक केली. त्यांचे अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी, राजकारणी आणि रॅपर्सशी संबंध असल्याचे तपासात उघडकीस आले.
६. अन्य: बार मालक, टॅक्सी चालक (वाहनांतून पुरवठा करणे), सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्स (पार्टीचे प्रमोशन करणे).
हे ही वाचा:
‘आप’कडून पक्ष बदलूंविरोधात कारवाईसाठी पक्षांतर बंदी कायद्याची मागणी
रेशन वितरण घोटाळाप्रकरणी पश्चिम बंगालमध्ये नऊ ठिकाणी छापे
लग्नात छेड काढणाऱ्या तरुणाचा पाठलाग करताना टाकीत पडून मृत्यू
हावडा ब्रिज…मोदींचे बोटिंग…फोटोग्राफी
भारतातील ‘नार्को-टेररिझम’
भारतात ‘नार्को-टेररिझम’ अनेक दशके सुरु आहे. गुन्हेगारी टोळ्या अंमली पदार्थ विक्रीतून जमा झालेले पैसे गुन्हेगारी टोळ्यांकडून दाऊद इब्राहिमकडे सोपवतात. तेथून ते आयएसआयच्या मार्फत लष्कर ए तय्यबा, जैश ए मोहम्मद, खलिस्तान कमांडो फोर्स यासारख्या दहशतवादी संघटनांच्या माध्यमातून काश्मीर आणि पंजाबमध्ये दहशतवादी कारवाया करण्यासाठी वापरले जातात असे अनेक प्रकरणांच्या तपासात यापूर्वी निष्पन्न झाले आहे. मुंबईच्या १९९३ च्या बॉम्बस्फोटात अंमली पदार्थ तस्करी आणि विक्रीत सक्रिय असलेल्या दाऊद इब्राहिमच्या नेटवर्कचा वापर झाला होता.
समाजाची भूमिका
ड्रग्जचा वाढता प्रसार हा केवळ राष्ट्रीय सुरक्षेस धोका नाही तर त्यामुळे इतरही अनेक सामाजिक प्रश्न निर्माण होतात. त्यामुळे समाजात, विशेषतः तरुणांमध्ये अंमली पदार्थांच्या व्यसनाबाबत जनजागृती निर्माण होणे अत्यावश्यक आहे. यासाठी कुटुंबातील सदस्य आणि नातेवाईक, शैक्षणिक संस्था, सामाजिक संस्था अशा विविध माध्यमातून सातत्यपूर्ण प्रबोधन होणे आवश्यक आहे. पालकांनी तरुण पाल्यांशी सुसंवाद राखून ‘पार्टी कल्चर’चे आरोग्य आणि भविष्यावरील दुष्परिणाम मुलांना समजावून सांगणे महत्वाचे आहे.
समुदाय स्तरावर मोहल्ला समित्या, विद्यार्थी संघटना आणि अन्य सामाजिक संस्थांनी ‘ड्रग-फ्री झोन’च्या निर्मितीसाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे. सोशल मीडियावर त्यासाठी विशेष मोहिमा राबविण्यात येऊ शकतात. सामाजिक संस्था त्यांच्याकडील निधीमधून आणि सरकारकडून अर्थसहाय्य मिळवून व्यसनमुक्ती आणि पुनर्वसन करण्यासाठी केंद्रे सुरु करू शकतील.
सरकार आणि प्रशासनाची भूमिका
हे मोठमोठे कार्यक्रम अजून पूर्णतः ड्रग लॉर्ड्स आणि माफियांच्या ताब्यात गेले नसले तरी, जग वेगाने बदलत आहे. आजच्या तरुणाईला नाविन्यपूर्ण कार्यक्रमांची ओढ़ आहे. परंतु या ओढीचा गैरफायदा अंमली पदार्थांच्या प्रचारासाठी आणि समाज आणि राष्ट्रविरोधी विचारांच्या प्रचारासाठी होणार नाही यासाठी विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे अश्या कार्यक्रमांना परवानग्या देताना सरकारने सखोल छाननी करून तेथे काय सुरु आहे यावर करडी नजर ठेवणे आवश्यक झाले आहे.
वरकरणी सांस्कृतिक भासणाऱ्या कार्यक्रमांचा अशा समाज आणि राष्ट्रविघातक कृत्यांसाठी गैरवापर रोखण्यासाठी शासनाने नवीन ‘मार्गदर्शक सूचना’ बनवून त्यांची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. प्रत्येक कॉन्सर्टच्या आयोजकांना ‘ड्रग-फ्री सर्टिफिकेट’ घेणे बंधनकारक करणे देखील महत्वाचे आहे. समाज आणि राष्ट्रविरोधी विचारांच्या प्रचार किंवा अंमली पदार्थ विक्रीसारखी कृत्ये होतील त्या कार्यक्रमांच्या आयोजकांना त्यासाठी सह-दोषी ठरवण्याची तरतूद देखील आवश्यक आहे. शिक्षण खात्याने शैक्षणिक संस्थांशी आणि स्थानिक पोलीस दलाशी समन्वय साधून शैक्षणिक संस्थांमध्ये अंमली पदार्थांच्या संदर्भात विद्यार्थ्यांमध्ये जागृती पसरवण्यासाठी विशेष प्रयत्न करणे देखील आवश्यक आहे.







