काँग्रेसने गुरुवारी तृणमूल काँग्रेस (टीएमसी) सोबत संभाव्य विलीनीकरणाच्या चर्चांना स्पष्टपणे फेटाळून लावत अशा बातम्यांना निराधार अफवा म्हटले आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेसचे सरचिटणीस के सी वेणूगोपाल यांनी सांगितले की, अलीकडेच पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि त्यांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत केवळ राष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा झाली होती. दोन्ही पक्षांच्या विलीनीकरणाबाबत कोणतीही चर्चा झाली नव्हती.
“या पूर्णपणे निराधार बातम्या आहेत. टीएमसी आणि काँग्रेस नेत्यांमधील बैठक फक्त राष्ट्रीय मुद्दे अधिक प्रभावीपणे कसे मांडता येतील यावर चर्चा करण्यासाठी होती,” असे वेणुगोपाल म्हणाले.
इंडी आघाडीच्या बैठकीनंतर चर्चांना उधाण
सोमवारी नवी दिल्लीत झालेल्या इंडी आघाडीच्या बैठकीला ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी उपस्थित राहिल्यानंतर टीएमसी आणि काँग्रेसच्या संभाव्य विलीनीकरणाबाबतच्या चर्चांना वेग आला.
यानंतर दोघांनी काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासोबत स्वतंत्र बैठका घेतल्या.
ममता बॅनर्जी या इंडी आघाडीच्या बैठकींना निवडक प्रसंगीच उपस्थित राहिल्या आहेत. अनेकदा त्यांनी टीएमसीचे वरिष्ठ नेते प्रतिनिधी म्हणून पाठवले होते. जून २०२३ मध्ये पाटणा येथे झालेल्या इंडी आघाडीच्या पहिल्या बैठकीलाही त्या अनुपस्थित होत्या.
टीएमसीतील फुटीच्या पार्श्वभूमीवर चर्चा
पश्चिम बंगालमध्ये सत्तेवरून बाहेर पडल्यानंतर आणि २९४ सदस्यीय विधानसभेत केवळ ८० जागा मिळाल्यानंतर टीएमसीच्या विधिमंडळ आणि संसदीय गटात फूट पडली आहे. याच पार्श्वभूमीवर विलीनीकरणाच्या चर्चांना उधाण आले.
टीएमसीनेकडून विलीनीकरणाच्या चर्चांना नकार
तृणमूल काँग्रेसने अधिकृतपणे विलीनीकरणाबाबत भाष्य केले नसले तरी पक्षाचे खासदार सौगत रॉय यांनी सांगितले की काँग्रेससोबत काम करणे महत्त्वाचे आहे, मात्र ते सहकार्य आघाडीच्या स्वरूपात असेल की विलीनीकरणाच्या स्वरूपात, हे अद्याप स्पष्ट नाही.
दरम्यान, पश्चिम बंगालमधील ८० पैकी ६४ टीएमसी आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा करणारे ऋतूव्रत बॅनर्जी यांनीही काँग्रेससोबतच्या विलीनीकरणाच्या बातम्या फेटाळून लावल्या.
“विलीनीकरणाबाबत बोलायचे झाल्यास, आमचा विधिमंडळ गट निश्चितच काँग्रेसमध्ये जाणार नाही. संसदेतील दोन-तृतीयांशपेक्षा अधिक खासदारही काँग्रेसमध्ये विलीन होत नाहीत. मग नेमके कोण कोणामध्ये विलीन होत आहे?” असा सवाल त्यांनी केला.
ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसमध्ये दोन दशकांहून अधिक काळ काम केले. मात्र, राज्यातील काँग्रेस नेतृत्वाशी मतभेद वाढल्यानंतर त्यांनी १९९७ मध्ये पक्ष सोडला.
त्यांना असे वाटत होते की काँग्रेसचे केंद्रीय नेतृत्व पश्चिम बंगालकडे दुर्लक्ष करत आहे आणि सीपीआय (M)-नेतृत्वाखालील डाव्या आघाडीच्या सरकारला प्रभावी आव्हान देण्याची पक्षाची इच्छाशक्ती कमी आहे.
१९९८ मध्ये त्यांनी अखिल भरतीय तृणमूल पक्षाच ची स्थापना केली. पुढे हा पक्ष राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष बनला आणि २०११ च्या ऐतिहासिक विधानसभा निवडणुकीत डाव्या आघाडीची ३४ वर्षांची सत्ता संपुष्टात आणली.
हे ही वाचा:
पश्चिम आशियातील तणावामुळे शेअर बाजारात अस्थिरता
आकाशात झेपावला ‘आत्मनिर्भर भारता’चा नवा योद्धा
इराणकडून अमेरिकेच्या एफ-35, एफ-15 आणि एफ-16 तळांवर क्षेपणास्त्र हल्ला
भारतात ‘फिफा विश्वचषक’ मोफत पाहता येणार?
सध्या दोन्ही पक्षांचा स्पष्ट नकार
सध्या काँग्रेस आणि टीएमसी या दोन्ही पक्षांनी विलीनीकरणाच्या सर्व चर्चांना स्पष्टपणे नकार दिला आहे. मात्र, टीएमसीमध्ये सुरू असलेली अंतर्गत अस्थिरता आणि निवडणुकीतील पराभव लक्षात घेता, भविष्यात ममता बॅनर्जी काँग्रेससोबत अधिक व्यापक राजकीय पुनर्रचना करण्याचा प्रयत्न करतात का, याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.







