दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग आला असून गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेले ‘ऑपरेशन टायगर’ आता प्रत्यक्षात सुरू आहे का अशा अटकळी बांधल्या जात आहेत. ठाकरे गटाचे खासदार फुटीच्या उंबरठ्यावर असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. यामुळे २०२२ ची पुनरावृत्ती होणार का असा सवाल देखील विचारला जात आहे.
जून २०२२ मध्ये ४० आमदारांना बरोबर घेऊन एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारत थेट शिवसेना पक्षावर दावा सांगितला. यातून सावरण्याआधीच आता २०२६ च्या जून महिन्यात पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंचा गट फुटीच्या उंबरठ्यावर आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अनेक खासदार हे दिल्लीला पोहचल्याची चर्चा आहे. माहितीनुसार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रात्री उशिरा दिल्लीला पोहचले आहेत. या खासदारांसह एकनाथ शिंदे हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटणार असल्याचे बोलले जात आहे.
तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अरविंद सावंत यांनी लोकसभेचे स्पीकर ओम बिर्ला यांना पत्र लिहिलं आहे. खासदार अरविंद सावंत, संजय राऊत आणि खासदार अनिल देसाई हेदेखील दिल्लीला पोहचले आहेत. ठाकरेंचे खासदार फुटणार या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु होत्याच. त्यात खासदार संजय राऊत यांनी सूचक पोस्ट लिहिली ज्यामुळे या चर्चांना आणखी उधाण आलं आहे.
“अपना सपना मनी मनी, महुआजी खासदारांची किंमत प्रत्येकी ५० कोटी अशी ठरली आहे.(पन्नास खोके) १५ कोटी हा फक्त अॅडव्हान्स आहे. खरंतर या लोकांची किंमत ५० हजारही नाही. त्यांना एवढी किंमत मिळते आहे कारण ते शिवसेनेत आहेत. तुमच्या पक्षातल्या लोकांना किंमत मिळाली कारण ते तृणमूल काँग्रेसमध्ये होते,” असं म्हणत महुआ मोईत्रांच्या एका पोस्टला संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे.
हे ही वाचा:
विवान कारुळकर यांच्याकडून विद्यार्थ्यांना नव्या शैक्षणिक भवनाची भेट
घोडबंदरला वीर चिमाजी आप्पा यांचे नाव द्या!
जसपाल राणाच्या मृत्यूनंतर आईनेही प्राण त्यागले
आंतरराष्ट्रीय बास्केटबॉलपटू सिराज यांनी केले खेळाडूंना मार्गदर्शन
दोन दिवसांपूर्वीच ऑपरेशन टायगरच्या चर्चा संजय राऊत यांन फेटाळल्या होत्या. तसंच चार दिवसांपूर्वीच सगळे खासदार हे उद्धव ठाकरेंनी बोलवलेल्या बैठकीत उपस्थित होते. काही थेट आले होते काही जण ऑनलाइन उपस्थित होते. कुणी मुलीची शपथ घेतली, कुणी वडिलांची, आईची शपथ घेतली. कुणी साईबाबांची शपथ घेतली आणि उद्धव ठाकरेंना सांगितलं की तुमच्यावरच आमची निष्ठा आहे. शिवाय कुणी कुणाला भेटलं म्हणून चर्चा का करत आहात? खासदारांनी सांगितलं आहे की आम्ही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार नाही असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं होतं. मात्र आता १५ कोटी अॅडव्हान्स मिळाला असल्याची पोस्टही त्यांनी केली आहे.







