सिंधुदुर्गमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना भाजपचे मंत्री नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत अनेक धक्कादायक दावे केले. ठाकरे गटातील खासदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत का गेले, यामागे केवळ राजकीय कारण नव्हते तर विचारांचा संघर्ष हेही मोठे कारण होते, असे सांगताना त्यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या काँग्रेसमध्ये विलीनीकरणाच्या हालचाली सुरू असल्याचा आरोप केला.
नितेश राणे म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे काँग्रेसमध्ये विलिनीकरण करण्याबाबत गंभीर चर्चा सुरू होती. यासंदर्भात आदित्य ठाकरे आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यात अनेक बैठका झाल्या होत्या. या बैठकींमध्ये आदित्य ठाकरे यांना काँग्रेसमध्ये राष्ट्रीय सरचिटणीसपदाची जबाबदारी देण्याचाही प्रस्ताव पुढे आला होता, असा दावा त्यांनी केला. बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्ववादी विचारांवर उभ्या राहिलेल्या पक्षाचे काँग्रेसमध्ये विलिनीकरण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे लक्षात आल्यानंतर अनेक खासदार आणि नेते अस्वस्थ झाले. त्यामुळेच त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत वेगळा मार्ग स्वीकारला, असेही राणे यांनी म्हटले.
हे ही वाचा:
अयोध्येतील राम मंदिराच्या व्यवस्थापनात आमूलाग्र बदल हवाय!
अभिनेते प्रकाश राज आणि पत्रकार एकमेकांना भिडले
‘धुरंधर’मधून सांख्यिकीचा धडा! चित्रपट ठरला क्लासरूमचे पाठ्यपुस्तक
वडील आजारी, तरी देशासाठी झुंजतोय मेसी!
यावेळी त्यांनी संजय राऊत यांच्यावरही निशाणा साधला. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची भाषा करणाऱ्यांनी आधी स्वतःचे राजकीय आचरण तपासावे. जर काँग्रेसमध्ये जाण्याची तयारी सुरू होती, तर मग बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा उल्लेख करण्याचा अधिकार कोणाला आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. काँग्रेसमध्ये जाण्याची तयारी ठेवायची आणि दुसरीकडे हिंदुत्वाची भाषा करायची, हा दुटप्पीपणा असल्याचा आरोपही त्यांनी केला.
महाविकास आघाडीवर टीका करताना नितेश राणे म्हणाले की, हिंदुत्वाच्या विचारांवर घडलेले शिवसैनिक काँग्रेसची विचारधारा स्वीकारू शकत नाहीत. जेव्हा पक्षाची दिशा बदलत असल्याचे अनेकांना जाणवले, तेव्हा त्यांनी स्वतःचा राजकीय निर्णय घेतला. पैशांपेक्षा विचार मोठे असतात, हे काही लोकांना समजणार नाही, असा टोला त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनाही लगावला.
दरम्यान, ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चेवर बोलताना नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांची तुलना तृणमूल काँग्रेसचे नेते अभिषेक बॅनर्जी यांच्याशी केली. पश्चिम बंगालमध्ये जशी अभिषेक बॅनर्जी यांची प्रतिमा आहे, तशीच भूमिका आज उद्धव ठाकरे गटात आदित्य ठाकरे यांची असल्याचा दावा त्यांनी केला. ठाकरे गटातील खासदार पक्ष का सोडून गेले, याचा जाब आदित्य ठाकरे यांनाच विचारला पाहिजे, असेही ते म्हणाले.
याचवेळी त्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर टीकास्त्र डागत वादग्रस्त विधान केले. पश्चिम बंगालमध्ये अभिषेक बॅनर्जी यांना जसे हेल्मेट घालून फिरावे लागते, तसेच एक हेल्मेट आपण आदित्य ठाकरे यांना भेट म्हणून पाठवणार आहोत. महाराष्ट्रात फिरताना कुठून अंडी किंवा चपला येतील याचा अंदाज नसतो, त्यामुळे त्यांना हेल्मेटची गरज भासू शकते, असा टोला त्यांनी लगावला.
नितेश राणे यांच्या या आरोपांमुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले असून ठाकरे गटाकडून या दाव्यांना काय उत्तर दिले जाते, याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.







