इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेपूर्वी माजी भारतीय फलंदाज चेतेश्वर पुजारा यांनी कर्णधार श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाचे कौतुक केले असले, तरी त्याच्या फलंदाजीची खरी परीक्षा आता इंग्लंडच्या आव्हानात्मक परिस्थितीत होणार असल्याचे मत व्यक्त केले आहे.
जिओस्टारशी बोलताना पुजारा म्हणाले, “विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यानंतर इंग्लंडमध्ये टी-२० मालिका जिंकणारा तिसरा भारतीय कर्णधार होणे श्रेयससाठी सोपे नसेल. इंग्लंडमधील परिस्थिती नेहमीच वेगळी आणि आव्हानात्मक असते. दोन वर्षांनंतर तो भारतीय टी-२० संघात पुनरागमन करत आहे आणि प्रथमच या संघाचे नेतृत्व करत आहे.”
पुजारा यांनी श्रेयसच्या नेतृत्वगुणांवर मात्र पूर्ण विश्वास व्यक्त केला. “कर्णधार म्हणून मला त्याच्याबद्दल कोणतीही शंका नाही. आयपीएलमध्ये पंजाब किंग्सचे नेतृत्व करताना त्याने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. तो संघाला पुढे नेतो आणि खेळाडूंना मोकळेपणाने खेळण्याचे स्वातंत्र्य देतो,” असे ते म्हणाले.
मात्र, त्यांनी स्पष्ट केले की या मालिकेत श्रेयसच्या फलंदाजीवरच सर्वाधिक लक्ष असेल. “टी-२० संघातील त्याचे पुनरागमन किती यशस्वी ठरते, हे त्याच्या फलंदाजीवर अवलंबून असेल. मधल्या फळीत त्याला स्वतःला सिद्ध करावे लागेल. हीच त्याची खरी परीक्षा असेल,” असे पुजारा म्हणाले.
याशिवाय, भारतीय संघाचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी याला तातडीने पदार्पणाची संधी मिळण्याची शक्यता कमी असल्याचेही पुजारा यांनी सांगितले. सध्याच्या भारतीय संघातील अव्वल फळी मजबूत असल्याने त्याला प्रतीक्षा करावी लागू शकते, असे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली भारताची सुरुवात अपेक्षेप्रमाणे झाली नव्हती. आयर्लंडविरुद्धची दोन सामन्यांची टी-२० मालिका भारताने गमावली होती. आता इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेत दमदार पुनरागमन करण्याचे आव्हान टीम इंडियासमोर आहे. मालिकेतील पहिला सामना बुधवारी रात्री १० वाजता (भारतीय वेळेनुसार) डरहॅम येथे खेळवला जाणार आहे.







