एशियन गेम्स २०२६ साठी भारतीय महिला क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली असून, अनुभवी हरमनप्रीत कौर हिच्याकडे पुन्हा एकदा नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली आहे. बीसीसीआयने मंगळवारी १५ सदस्यीय संघ जाहीर केला असून, २०२३ मध्ये हांगझोऊ येथे जिंकलेल्या ऐतिहासिक सुवर्णपदकाचे संरक्षण करण्याचे मोठे आव्हान भारतीय संघासमोर असणार आहे.
निवड समितीने बहुतांश त्या खेळाडूंवरच विश्वास कायम ठेवला आहे, ज्यांनी नुकत्याच झालेल्या महिला टी-२० विश्वचषकात भारताचे प्रतिनिधित्व केले होते. संघात केवळ एक बदल करण्यात आला असून, यास्तिका भाटियाच्या जागी डावखुरी फलंदाज आणि यष्टिरक्षक जी. कामलिनी हिला संधी देण्यात आली आहे.
यंदाचे एशियन गेम्स १९ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर या कालावधीत जपानमधील आयची-नागोया येथे होणार आहेत. गत स्पर्धेत भारताने महिला क्रिकेटमध्ये इतिहास रचत सुवर्णपदक जिंकले होते.
फलंदाजीची जबाबदारी उपकर्णधार स्मृती मंधाना, शेफाली वर्मा आणि जेमिमा रॉड्रिग्ज यांच्यावर असेल. अष्टपैलू दीप्ती शर्मा मधल्या फळीत महत्त्वाची भूमिका बजावणार असून, ऋचा घोष प्रमुख यष्टिरक्षक म्हणून संघात आहे. तिच्यासोबत बॅकअप यष्टिरक्षक म्हणून जी. कामलिनीचा समावेश करण्यात आला आहे.
वेगवान गोलंदाजीत रेणुका सिंह ठाकूर आणि अरुंधती रेड्डी यांच्यावर मदार असेल, तर फिरकी विभागात राधा यादव आणि श्रेयंका पाटील प्रतिस्पर्धी फलंदाजांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतील.
दरम्यान, टाचेच्या दुखापतीतून सावरत असलेल्या श्रेयंका पाटीलचा अंतिम सहभाग तिच्या फिटनेस चाचणीवर अवलंबून असल्याचे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे.
एशियन गेम्स २०२६ साठी भारतीय महिला संघ
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, दीप्ती शर्मा, ऋचा घोष (यष्टिरक्षक), जी. कामलिनी (यष्टिरक्षक), भारती फुलमाळी, श्री चरणी, रेणुका सिंह ठाकूर, क्रांती गौड, अरुंधती रेड्डी, श्रेयंका पाटील (फिटनेसवर अवलंबून), राधा यादव आणि नंदनी शर्मा.







