भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेच्या कसोटी मालिकेच्या तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात दक्षिण अफ्रिकेने बाजी मारली असून ही मालिका २- १ ने जिंकली आहे. दक्षिण आफ्रिकेने ७ गडी राखून हा सामना जिंकला आणि विजयावर शिक्कामोर्तब केले. पहिली सेंच्युरियनमधील कसोटी जिंकल्यामुळे २९ वर्षानंतर मालिका विजयाचे स्वप्न साकार होईल, अशी आशा निर्माण झाली होती. मात्र, पहिले जोहान्सबर्ग आणि त्यानंतर केपटाऊन कसोटीत दक्षिण आफ्रिकेने विजय मिळवला. त्यामुळे विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघाचे दक्षिण अफ्रिकेत कसोटी मालिका जिंकण्याचे स्वप्न भंगले आहे.
भारताने दक्षिण अफ्रिकेसमोर विजयासाठी २१२ धावांचे आव्हान ठेवले होते. हे आव्हान दक्षिण अफ्रिकेने ७ गडी राखून पूर्ण केले. पहिल्या डावात भारताने सर्व गडी गमवून २२३ धावा केल्या होत्या. पहिल्या डावात कर्णधार विराट कोहली याने ७९ धावांची खेळी करून भारताचा डाव सावरला होता. चेतेश्वर पुजारा याने ४३ धावा तर ऋषभ पंत याने २७ धावांची खेळी केली होती. दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज कागिसो रबाडा याने सर्वाधिक चार गडी बाद केले तर जेनसन याने तीन गडी बाद केले.
त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या दक्षिण अफ्रिकन संघाने सर्वबाद २१० धावा केल्या. भारताला १३ धावांची आघाडी मिळाली. जसप्रीत बुमराह याने दक्षिण आफ्रिकेच्या पाच फलंदाजांना तंबूत धाडले होते.
हे ही वाचा:
आठवी पास पठ्ठ्याने ३० हजारांत बनवली फोर्ड कार
भारत बायोटेकच्या संस्थापकांनी तिरुमला देवस्थानला दिली ‘ही’ देणगी
आता भारतीय ५९ देशांत करू शकणार व्हिसाशिवाय प्रवास
तो काश्मीरी तरुण करत होता हिंदू देवतांची तस्करी
भारताने दुसऱ्या डावात १९८ धावा केल्या. ऋषभ पंत याने नाबाद शतकी खेळी करत दक्षिण अफ्रिकेसमोर विजयासाठी २१२ धावांचे आव्हान ठेवले होते. या डावात जेनसन याने चार भारतीय फलंदाजांना माघारी धाडले होते. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या एडन मारक्रम १६ धावा करून बाद झाला. त्यानंतर डीन एल्गार आणि किगन पीटरसनने संपूर्ण मोर्चा सांभाळला. मात्र बुमराहच्या गोलंदाजीवर डीन ३० धावा करून माघारी परतला. किगन आणि ड्युसेनने मोठी भागीदारी केली. मात्र, किगन ८२ धावांवर बाद झाला आणि त्यानंतर ड्युसेन आणि बवुमा या जोडीने दक्षिण आफ्रिकेला विजय मिळवून दिला.