मकरसंक्रांतनिमित्ताने पतंगोत्सवाचा आनंद बालगोपाल घेत असतात. परंतु, जळगावमध्ये या दिवसाचा आंनद जास्त काळ टिकला नाही. ऐन मकरसंक्रातीला पतंगामुळे दोन बालकांनी प्राण गमावल्याच्या घटना जळगावात घडल्या आहेत.
पहिली घटना तर धक्कादायक आहे. मुलांना थोडासा विरोध केला तर, ते किती टोकाचे पाऊल उचलतात याची प्रचिती या घटनेतून आली आहे. घरच्यांनी पतंग उडवण्यासाठी जाऊ दिले नाही म्हणून एका १२ वर्षाच्या मुलाने चक्क गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
ही दुःखद घटना जळगावमधील कांचननगर येथे घडली आहे. यश रमेश राजपूत हा अवघ्या १२ वर्षाचा. घरच्यांनी पतंग उडवण्यासाठी न पाठवल्यामुळे संतप्त झालेल्या यशने रागाच्या भरात टोकाचे पाऊल उचलले. झोक्याच्या दोरीने गळफास घेत त्याने आपले आयुष्य संपवले आहे. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे. पोलीस याबाबत अधिक तपास घेत आहेत.
दुसरी घटना जळगावमधील कुसुंबा गावात घडली. पतंग उडवत असताना दहा वर्षीय मुलाचा विजेच्या तारेला धक्का लागल्यामुळे मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना आज दुपारी बाराच्या सुमारास घडली. यामुळे मुलाच्या कुटुंबावर दुःखाची संक्रात ओढवली आहे.
हे ही वाचा:
आठवी पास पठ्ठ्याने ३० हजारांत बनवली फोर्ड कार
तो काश्मीरी तरुण करत होता हिंदू देवतांची तस्करी
व्यावसायिकाला धमकी देण्यासाठी वापरला थेट अजित पवारांचाच मोबाईल नंबर
टीम इंडियाला साडेसाती; तिसरी कसोटीही दक्षिण आफ्रिकेने सात विकेट्सनी जिंकली
हितेश ओंकार पाटील ( १०) असे मृत मुलाचे नाव आहे. हितेश मित्रांसोबत मोकळ्या मैदानात पतंग उडवायला गेला होता. पतंग उडवत असताना पतंग विजेच्या तारांमध्ये अडकला. हितेश पतंग काढण्याचा प्रयत्न करीत असताना त्याला विजेच्या तारेचा शॉक लागला. ग्रामस्थांनी त्यास तात्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वप्निल कळसकर यांनी त्यास मृत घोषित केले.