महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती परिसरात कोळसा गॅसिफिकेशनवर आधारित दोन मोठे औद्योगिक प्रकल्प उभारले जाणार असून त्यातून देशातील पहिले “ग्रीन स्टील” उत्पादन केंद्र आणि एलपीजीला पर्याय ठरू शकणाऱ्या इंधनाचे उत्पादन होणार आहे. या प्रकल्पांचा भूमिपूजन समारंभ राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडला. या दोन प्रकल्पांच्या पहिल्या टप्प्यात सुमारे १५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे.
या उपक्रमांमुळे विदर्भातील औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळण्याची शक्यता असून पुढील टप्प्यांमध्ये एकूण गुंतवणूक ३० हजार कोटी रुपयांहून अधिक होऊ शकते. तसेच या प्रकल्पांमुळे सुमारे १० हजार रोजगारनिर्मिती होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
हे ही वाचा:
महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक काय सांगते?
बॅटरी मर्यादा नसलेले स्वदेशी ‘टेथर्ड ड्रोन’ लष्कराला सुपूर्द!
होर्मुज सामुद्रधुनी पार करुन ९२,७०० टन LPG लवकरच भारतात
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात ‘वनराणी’ची पुन्हा शिट्टी वाजली!
या दोन प्रकल्पांपैकी एक प्रकल्प ‘न्यू एरा क्लीन टेक प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीकडून उभारला जाणार आहे. या प्रकल्पात कोळसा गॅसिफिकेशन तंत्रज्ञानाचा वापर करून हायड्रोजन, युरिया, अमोनियम नायट्रेट यांसारख्या महत्त्वाच्या औद्योगिक उत्पादनांसह डायमेथिल इथर (DME) तयार केला जाणार आहे. DME हे इंधन एलपीजीला पर्याय म्हणून वापरता येऊ शकते, त्यामुळे देशातील इंधन आयात कमी करण्यास मदत होऊ शकते. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात सुमारे ८ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार असून पुढील टप्प्यात ती आणखी वाढवण्याची योजना आहे.
Maharashtra at the forefront of Energy Transition!
Delighted to be present at the bhoomipujan of Waaree Group’s 10 GW Integrated Solar Ingot and Wafer Manufacturing Facility in Nagpur.
Under the visionary leadership of Hon PM Narendra Modi Ji, India has committed to reducing… https://t.co/iAd5vzxpmE pic.twitter.com/iTAbSogCa7
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) March 14, 2026
दुसरा प्रकल्प ‘ग्रेटा एनर्जी’ या कंपनीकडून उभारला जाणार असून त्यामध्ये कोळसा गॅसिफिकेशनद्वारे तयार होणाऱ्या सिंथेसिस गॅसचा वापर करून ग्रीन स्टील उत्पादन केले जाणार आहे. या प्रकल्पात १०० टक्के परकीय गुंतवणूक (FDI) असणार असल्याचे सांगितले जाते. विशेष म्हणजे या प्रकल्पात निर्माण होणारा कार्बन पकडून त्याचे द्रवीकरण करून त्याचा पुढील औद्योगिक वापर केला जाणार आहे. त्यामुळे पर्यावरणीय परिणाम कमी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
केंद्रीय कोळसा मंत्री जी. किशन रेड्डी यांनी या प्रकल्पांमुळे देशात आयात होणाऱ्या अनेक महत्त्वाच्या रसायनांचे देशांतर्गत उत्पादन वाढेल, असे सांगितले. देशभर मंजूर करण्यात आलेल्या सात कोळसा गॅसिफिकेशन प्रकल्पांपैकी चार प्रकल्प भद्रावती परिसरात येणार असल्याने हा भाग देशातील महत्त्वाचे औद्योगिक केंद्र बनण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सरकारच्या मते, भारताकडे मोठ्या प्रमाणावर कोळशाचे साठे आहेत आणि त्याचा स्वच्छ व कार्यक्षम वापर करण्यासाठी गॅसिफिकेशन तंत्रज्ञान महत्त्वाचे ठरू शकते. या प्रकल्पांमुळे ऊर्जा सुरक्षा वाढण्यासोबतच “आत्मनिर्भर भारत” या संकल्पनेलाही बळ मिळेल.
हे दोन्ही प्रकल्प २०२९-३० पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा असून ते पूर्ण झाल्यानंतर भद्रावती आणि चंद्रपूर परिसर औद्योगिक आणि ऊर्जा क्षेत्रात देशाच्या नकाशावर महत्त्वाचे स्थान मिळवू शकतात.







