पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इंडोनेशिया दौऱ्यादरम्यान भारत आणि इंडोनेशिया यांनी संरक्षण, सागरी सुरक्षा, अवकाश, डिजिटल तंत्रज्ञान, ऊर्जा, महत्त्वाची खनिजे, शेती आणि व्यापार यांसह विविध क्षेत्रांमध्ये तब्बल २० सामंजस्य करारांवर (MoUs) स्वाक्षऱ्या केल्या. या दौऱ्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र प्रणालीसंदर्भातील संरक्षण सहकार्याला अधिकृत चालना मिळाली. या करारांमुळे दोन्ही देशांतील सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी (Comprehensive Strategic Partnership) अधिक मजबूत होणार असल्याचे मानले जात आहे.
पंतप्रधान मोदी आणि इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो यांच्यात जकार्ता येथे झालेल्या द्विपक्षीय चर्चेनंतर या करारांची घोषणा करण्यात आली. दोन्ही नेत्यांनी हिंद-प्रशांत क्षेत्रातील शांतता, सागरी सुरक्षा, संरक्षण सहकार्य आणि आर्थिक भागीदारी अधिक बळकट करण्याचा निर्धार व्यक्त केला.
दौऱ्यातील सर्वात महत्त्वाची घडामोड म्हणजे इंडोनेशियासाठी ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र प्रणालीच्या सहकार्याचा करार. या करारानुसार इंडोनेशियाच्या संरक्षण मंत्रालयाने भारताच्या ब्रह्मोस एरोस्पेससोबत करार केला असून भविष्यात टप्प्याटप्प्याने क्षेपणास्त्र प्रणालीची खरेदी, प्रशिक्षण, देखभाल आणि आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्याचाही समावेश असणार आहे. याशिवाय भारतात विकसित करण्यात आलेल्या ‘अस्त्र’ हवा-ते-हवा क्षेपणास्त्र प्रणालीबाबतही सहकार्य करण्यात येणार आहे. या करारामुळे फिलिपिन्स आणि व्हिएतनामनंतर इंडोनेशिया ब्रह्मोस प्रणाली स्वीकारणाऱ्या देशांच्या यादीत महत्त्वाचे स्थान मिळवणार असून भारताच्या संरक्षण निर्यातीसाठी हा मोठा टप्पा मानला जात आहे.
२० सामंजस्य करारांमध्ये संरक्षण क्षेत्राबरोबरच सागरी सुरक्षा, अवकाश संशोधन, महत्त्वाच्या खनिजांचा पुरवठा, पोलाद उद्योग, कृषी, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण आणि क्षमता विकास अशा अनेक क्षेत्रांचा समावेश आहे. दोन्ही देशांनी इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील सहकार्य अधिक मजबूत करण्यावरही भर दिला.
भारत आणि इंडोनेशिया यांनी द्विपक्षीय व्यापाराला नवी चालना देण्याचेही ठरवले. प्राधान्य व्यापार करार (Preferential Trade Agreement) लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यावर दोन्ही देशांचे एकमत झाले. ऊर्जा सुरक्षा, गुंतवणूक, उत्पादन क्षेत्र आणि पुरवठा साखळी मजबूत करण्यावरही चर्चेत भर देण्यात आला. २०२४-२५ या आर्थिक वर्षात भारत-इंडोनेशिया द्विपक्षीय व्यापार सुमारे २८.१५ अब्ज अमेरिकी डॉलर इतका होता.
हे ही वाचा:
पंतप्रधान मोदींना इंडोनेशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान
सावधान! पाकिस्तानी ‘गोरी’सह तीन ब्युटी क्रीम आरोग्यासाठी घातक
भारत-बांगलादेश सीमेतून अवैध घुसखोरी करणाऱ्या रॅकेटमधील १५ जणांना कारावास
दोन दिवसांच्या पावसानंतर मुंबईला उसंत; जनजीवन अजूनही मंदावलेले
या दौऱ्यामुळे भारताच्या ‘ॲक्ट ईस्ट’ धोरणाला आणि हिंद-प्रशांत क्षेत्रातील धोरणात्मक उपस्थितीला अधिक बळ मिळाल्याचे मानले जात आहे. चीनचा वाढता प्रभाव लक्षात घेता भारत आणि इंडोनेशिया यांनी संरक्षण आणि सागरी सहकार्य अधिक व्यापक करण्याचा निर्णय घेतला असून त्यामुळे या प्रदेशातील सामरिक समतोल राखण्यास मदत होईल, असे तज्ज्ञांचे मत आहे.







