भारतीय शेअर बाजाराने बुधवारी दमदार पुनरागमन करत मोठी उसळी घेतली. पश्चिम आशियातील तणाव कमी होण्याच्या शक्यतेमुळे कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण झाली आणि त्याचा सकारात्मक परिणाम भारतीय बाजारावर दिसून आला. बीएसई सेन्सेक्स तब्बल ९४०.७३ अंकांनी वाढून ७७,९५८.५२ वर बंद झाला, तर एनएसई निफ्टी २९८.१५ अंकांनी उसळी घेत २४,३३०.९५ या पातळीवर स्थिरावला.
अमेरिका आणि इराण यांच्यात संघर्ष कमी करण्यासाठी चर्चेला वेग आल्याच्या बातम्यांमुळे जागतिक बाजारात सकारात्मक वातावरण निर्माण झाले. यामुळे ब्रेंट क्रूडच्या किमती जवळपास ७ टक्क्यांनी घसरून प्रति बॅरल सुमारे १०२ डॉलरपर्यंत आल्या. भारत हा मोठा तेल आयातदार देश असल्याने कच्च्या तेलातील घसरण भारतीय अर्थव्यवस्थेसाठी दिलासादायक मानली जाते.
हे ही वाचा:
जागतिक आर्थिक वादळातही भारत ठाम
तिकीटासाठी तृणमूलकडून पाच कोटींची मागणी
१० वर्षे चालू होता लैंगिक अत्याचार; नंतर बुर्का घालण्यासाठी दबाव
राजनीतीच्या विद्यार्थ्यांनी अभ्यासावी अशी रणनीती
बाजारातील तेजीमध्ये बँकिंग, ऑटो, फार्मा आणि रिअल्टी क्षेत्रातील समभागांनी आघाडी घेतली. विशेषतः खासगी बँकांच्या शेअर्समध्ये मोठी खरेदी दिसून आली. एचडीएफसी बँक, एसबीआय आणि महिंद्रा अँड महिंद्रा यांच्या शेअर्समध्ये चांगली वाढ झाली. विमान वाहतूक क्षेत्रातील इंडिगोच्या शेअरमध्ये सुमारे ७ टक्क्यांची उसळी पाहायला मिळाली.
मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकांमध्येही एक टक्क्यांपेक्षा अधिक वाढ झाली. जवळपास सर्वच क्षेत्रीय निर्देशांक हिरव्या निशाणावर बंद झाले. बाजारातील ही तेजी केवळ परदेशी संकेतांमुळे नाही, तर देशांतर्गत आर्थिक वातावरणही सुधारत असल्याचे संकेत मानले जात आहेत. सरकारकडून सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी (एमएसएमई) जाहीर करण्यात आलेल्या क्रेडिट गॅरंटी योजनांमुळेही गुंतवणूकदारांचा विश्वास वाढल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
दरम्यान, रुपयातही मोठी मजबुती दिसून आली. डॉलरच्या तुलनेत रुपया जवळपास ०.७ टक्क्यांनी मजबूत होत ९४.६१ या पातळीवर पोहोचला. गेल्या महिन्यातील हा रुपयाचा सर्वात मोठा एकदिवसीय वाढीचा आकडा ठरला. तेलाच्या किमती घसरल्याने आणि परदेशी गुंतवणुकीचा ओघ वाढण्याची शक्यता निर्माण झाल्याने रुपयाला आधार मिळाला.
तज्ज्ञांच्या मते, पश्चिम आशियातील परिस्थिती स्थिर राहिली आणि कच्च्या तेलाच्या किमती आणखी कमी झाल्या, तर भारतीय बाजारात पुढील काही दिवस सकारात्मक वातावरण कायम राहू शकते. मात्र भू-राजकीय घडामोडींवर गुंतवणूकदारांचे लक्ष कायम राहणार असून बाजारातील चढ-उतार सुरू राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.
