
-
प्रशांत कारुळकर
पश्चिम बंगालमध्ये भाजपने मिळवलेला विजय हा रणनीतीचा विजय आहे. निर्विवादपणे भाजप नेते, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह या रणनीतीचे शिल्पकार आहेत; ज्यांनी असंभव ते संभव करून दाखवले आहे. जिथे विजयाची शक्यता ५ टक्केही नव्हती, तिथे अमितभाईंनी भाजपच्या जागा दोनशेपार नेल्या. त्यासाठी त्यांनी वापरलेली रणनीती एक उद्योजक म्हणून मला भुरळ पाडते आहे.
निवडणूक असो वा नसो, तुमच्या रणनीतीचा आधार हा गणित आणि आकडेवारी असते. अमितभाईंना हे गणित जमलेले आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्यावर उत्तर प्रदेशची जबाबदारी होती. उत्तर प्रदेशमध्ये त्यांनी ८० पैकी ७१ (सहयोगी पक्षांसह ७३) जागा जिंकल्या. हा विक्रम होता. त्यांनी विरोधकांना तोंडात बोटे घालायला लावली. नंतर त्यांनी हे अनेकदा करून दाखवले. अमितभाई असतील तर अशक्य ते शक्य होते, याचा अंदाज आता विरोधकांनाही आला आहे.
पश्चिम बंगालमध्ये त्यांनी गेल्या दहा वर्षांत भाजपला शून्यातून एका मोठ्या शक्तीपर्यंत पोहोचवण्यासाठी जे प्रयत्न केले, त्याचे प्रतिबिंब २०२६ च्या विधानसभा निवडणुकांच्या निकालात स्पष्ट दिसते. राजकारणात ज्यांना यशस्वी व्हायचे आहे, त्यांनी या रणनीतीचा अभ्यास करायलाच हवा.
पश्चिम बंगालच्या निवडणुकीत भाजपला मिळालेली घसघशीत मते हा अमित शाह यांच्या रणनीतीचा सर्वात मोठा विजय आहे. २०१६ विधानसभा निवडणुकीत भाजपची मतटक्केवारी केवळ १०.१६% होती. २०२१ विधानसभा निवडणुकीत हा आकडा थेट ३८.१% वर पोहोचला. २०२६ च्या निवडणुकीचे निकाल पाहता भाजपच्या मतांचा टक्का ४५.८४ टक्क्यांपर्यंत गेला आहे.
मुस्लिम मतदार भाजपला मत देत नाही, हे अमित शाह यांना माहिती आहे. त्यामुळे ते तिथेच प्रयत्न करतात जिथे यशाची शक्यता आहे. पश्चिम बंगालमध्ये त्यांनी असे २०५ हिंदू बहुल मतदारसंघ निवडले आणि त्यावर लक्ष केंद्रित केले. पूर्ण २९४ जागांवर ताकद खर्च करण्याऐवजी, जिथे हिंदू लोकसंख्या निर्णायक आहे अशा २०५ जागांवर लक्ष केंद्रित केले. जिथे मुस्लिम मतदार आहेत, तिथे मतविभाजन होईल असे प्रयत्न केले.
ते इतके रणनीतीकुशल आहेत की त्यांनी काँग्रेस आणि डाव्यांना अज्ञात मार्गाने रसद पोहोचवली असेल, जेणेकरून त्यांनी तृणमूलशी ताकदीने लढावे आणि त्यांची मते खावीत. ही माझी माहिती नाही, केवळ अंदाज आहे; परंतु अशी खेळी ते खेळू शकतात. दक्षिण बंगालमधील नदिया, उत्तर २४ परगणा आणि मेदिनीपूर या तृणमूलच्या बालेकिल्ल्यांमध्ये भाजपने मोठी मजल मारली. २०२१ आणि त्यानंतरच्या निवडणुकांमध्ये ‘इंडियन सेक्युलर फ्रंट’ (ISF) सारख्या पक्षांच्या प्रभावामुळे काही जागांवर मुस्लिम मतांचे त्रिभाजन झाले, ज्याचा थेट फायदा भाजपला हिंदू बहुल जागांवर झाला. यावेळी त्याची मुर्शिदाबाद, मालदा, दिनाजपूरमध्ये पुनरावृत्ती झाली. मुस्लिम मते फुटली.
नागरिकत्व दुरुस्ती कायदा (CAA) लागू करण्याचे आश्वासन देऊन मतुआ समाजाचा प्रभाव असलेल्या सुमारे ४० ते ५० जागांवर भाजपची पकड मजबूत केली. ‘मेरा बूथ, सबसे मजबूत’ मोहिमेअंतर्गत भाजपने राज्यातील ८० हजारपेक्षा जास्त बूथपर्यंत कार्यकर्त्यांचे जाळे पोहोचवले. पक्षांतर करून आलेल्या नेत्यांपेक्षा आपल्या निष्ठावान कार्यकर्त्यांना संधी देण्याचे धोरण त्यांनी राबवले.
हेही वाचा :
सोन्याच्या दरात हलकी घसरण; १० ग्रॅमसाठी दर ₹१.४९ लाखांच्या आसपास
विमान चुकल्याचे कारण सांगत मुंबई विमानतळावरच तरुणीला हातोहात बनवले
‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान पाक सैन्य हाफिज सईद, मसूद अझरसाठी लढले
नागरिक आणि पायाभूत सुविधांना लक्ष्य करणे अस्वीकार्य!
अमित शाह यांना प्रश्नाची अचूक जाण आहे. महिलांना सुरक्षा, तरुणांना रोजगार आणि सर्वांसाठी विकास हे सूत्र ठेवले. बांगलादेशींच्या घुसखोरीचा मुद्दा फार आरडाओरडा न करता लोकांच्या मनावर बिंबवला. बांग्ला अस्मितेची तुतारी फुंकून भाजपला नामोहरम करण्याचा ममता यांचा डाव होता, परंतु गेल्या काही वर्षांत शुभेंदु अधिकारी, दिलीप घोष यांच्यासारखे नेते तृणमूलचा सामना करीत असल्यामुळे त्यांना फार यश मिळाले नाही. भाजपचा हा विजय देशाचे भाग्य बदलणारा आहे. इतिहास घडवणारा आहे.







