उत्तराखंडची राजधानी देहरादून येथील बैरागीवाला परिसरात पाण्याच्या वादातून झालेल्या रक्तरंजित संघर्षाने संपूर्ण राज्य हादरले आहे. या घटनेत भाजप कार्यकर्ते विनोद कुमार यांची निर्घृण हत्या करण्यात आल्याने परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. किरकोळ वाटणाऱ्या वादाने काही क्षणांत हिंसक स्वरूप धारण केले आणि त्याचे रूपांतर थेट जीवघेण्या हल्ल्यात झाले. या हल्ल्यात विनोद कुमार यांचा मृत्यू झाला, तर त्यांच्या कुटुंबातील काही सदस्य गंभीर जखमी झाले आहेत.
माहितीनुसार, सिंचनासाठी पाण्याच्या वापरावरून दोन गटांमध्ये वाद निर्माण झाला होता. सुरुवातीला झालेली बाचाबाची हळूहळू वाढत गेली आणि अखेर काही जणांनी एकत्र येत विनोद कुमार व त्यांच्या कुटुंबीयांवर हल्ला चढवला. वादानंतर ४० हून अधिक लोकांचा एक गट लाठ्या, लाकडी फळ्या, हातोडे आणि फावडे घेऊन विनोद यांच्या घरावर चालून आला. पोलिसांच्या माहितीनुसार, शनिवारी सायंकाळी ६ ते ६.३० वाजण्याच्या दरम्यान विनोद यांचा त्याच गावातील इम्तियाज याच्याशी शेजारच्या शेताला पाणी देण्याच्या कारणावरून वाद झाला. या हल्ल्यात विनोद कुमार गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले.
हे ही वाचा:
ॲनालॉग पनीरवर बारीक नजर…अस्सल पनीरपेक्षा कोणती आहे कमतरता?
दोरी बांधलीच नाही…बंजी जंपिंग करताना १३० फूट दरीत कोसळली तरुणी
निष्क्रिय सोन्यातून कमाई की जोखीम ?
अयातुल्ला खामेनींना दफन करण्याची तारीख झाली निश्चित
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. आरोपींना तात्काळ अटक करून कठोर शिक्षा देण्याची मागणी करत आंदोलकांनी रस्ते रोको आंदोलन सुरू केले. अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प झाली, तर काही भागांत आंदोलक आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की व दगडफेकीच्या घटना घडल्या. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून पोलिसांनी अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला आणि संवेदनशील भागांमध्ये सतत गस्त सुरू केली.
दरम्यान, या हल्ल्याचे काही सीसीटीव्ही फुटेज समोर आल्याचे सांगितले जात आहे. या फुटेजमध्ये दोन गटांतील संघर्षाचे दृश्य दिसत असल्याने तपासाला महत्त्वाचे धागेदोरे मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मृताच्या कुटुंबीयांनी हा वाद केवळ पाण्यापुरता मर्यादित नसून त्यामागे जुन्या वैमनस्याची आणि जमीनविषयक मतभेदांची पार्श्वभूमी असल्याचा आरोप केला आहे. यापूर्वीही धमक्या मिळाल्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली होती, असा दावाही करण्यात आला आहे.
या प्रकरणी पोलिसांनी १२ नामनिर्देशित आरोपींसह काही अज्ञात व्यक्तींविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला असून आरोपींच्या शोधासाठी विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. आरोपींमध्ये एफआयआरमध्ये रज्जाक, इम्तियाज, अमन, युनूस, शहबाज, शराफत अली, मासूम, आदिल, शमून, सलमान, जावेद आणि इंतजार यांची नावे नमूद करण्यात आली आहेत. विविध ठिकाणी छापेमारी सुरू असून दोषींना लवकरच अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलिस प्रशासनाने व्यक्त केला आहे. भाजप कार्यकर्त्याच्या हत्येमुळे राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली असून पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे. सध्या बैरागीवाला परिसरात तणावपूर्ण शांतता असून प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.







