नोएडामध्ये औद्योगिक कामगारांच्या आंदोलनाने सोमवारी (१३ एप्रिल) व्यापक आणि हिंसक स्वरूप धारण केले. हजारो कामगारांनी कमी वेतन, साप्ताहिक सुट्टीचा अभाव आणि खराब कामकाजाच्या परिस्थितीविरोधात आवाज उठवला. हे आंदोलन मुख्यतः फेज-2 आणि सेक्टर-63 या औद्योगिक भागांत सुरू झाले आणि नंतर अनेक ठिकाणी हिंसाचारात बदलले. मिळालेल्या माहितीनुसार, हिंसाचारात सहभागी असलेल्या सुमारे ३०० जणांना अटक करण्यात आली आहे.
सोमवारी अनेक भागांत आंदोलन हिंसक झाले. दगडफेक, तोडफोड आणि जाळपोळीत ५० हून अधिक कारखान्यांचे आणि १५० पेक्षा जास्त वाहनांचे नुकसान झाले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज आणि अश्रुधुराचा वापर करावा लागला, ज्यामुळे वाहतूक व्यवस्थेवरही मोठा परिणाम झाला. नोएडा पोलिसांनी रात्रीभर छापेमारी करून सुमारे ३०० जणांना अटक केली, तर १०० हून अधिक जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी आरोपींचे मोबाईल फोन जप्त करून त्यांची फॉरेन्सिक तपासणी सुरू केली आहे. सायबर सेल सोशल मीडियावरील भडकाऊ पोस्ट आणि अफवांवर लक्ष ठेवून आहे.
नोएडा पोलिस आयुक्त लक्ष्मी सिंह यांनी इशारा दिला की, “कोणताही व्यक्ती सार्वजनिक सुव्यवस्थेला बाधा आणताना किंवा कायदा हातात घेताना आढळल्यास त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल.” दुसरीकडे, उत्तर प्रदेशचे कामगार मंत्री अनिल राजभर यांनी या हिंसाचाराला सुनियोजित कट असल्याचे म्हटले. त्यांनी सांगितले, “राज्याच्या विकास आणि कायदा-सुव्यवस्थेला बाधा आणण्याच्या उद्देशाने ही घटना घडवून आणली गेल्याचे दिसते. अलीकडे मेरठ आणि नोएडा येथून चार संशयित दहशतवाद्यांना अटक करण्यात आली असून त्यांचे संबंध पाकिस्तानस्थित सूत्रधारांशी असल्याचे आढळले आहे. त्यामुळे राज्यात अस्थिरता निर्माण करण्याचा कट असण्याची शक्यता अधिक बळावते. संबंधित यंत्रणा या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत.”
पोलिसांच्या मते, सुमारे ४०,००० ते ४५,००० कामगार ८० पेक्षा अधिक ठिकाणी एकत्र आले होते, ज्यामुळे कायदा-सुव्यवस्थेची स्थिती बिघडली. अधिकाऱ्यांनी सांगितले की आता परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे आणि नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये.
हे ही वाचा:
बंगाल कोळसा घोटाळा संबंधित प्रकरणात आय-पॅकच्या सह-संस्थापकांना अटक
इराणसोबतच्या व्यापारात हस्तक्षेप नको!
झांसीत हिंदू विद्यार्थिनींना धर्मांतरित करू पाहणारा शिक्षक सोहेलला अटक
अयोध्या राम जन्मभूमी मंदिरातील ‘ज्योती स्वरूप’वरून वाद
किमान वेतनात २१% वाढ
कामगारांच्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश सरकारने मोठा निर्णय घेत, नोएडा आणि गाझियाबाद येथे किमान वेतनात २१ टक्क्यांपर्यंत अंतरिम वाढ जाहीर केली आहे. गौतम बुद्ध नगरमधील औद्योगिक भागांमध्ये अलीकडे झालेल्या कामगार आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारच्या माहितीनुसार, ही वाढ १ एप्रिलपासून लागू होणार असून यात मूळ वेतनासोबत महागाई भत्ताही समाविष्ट आहे. नव्या दरांनुसार अकुशल कामगारांसाठी वेतन १३,६९० रुपये, अर्धकुशल कामगारांसाठी १५,०६९ रुपये आणि कुशल कामगारांसाठी १६,८६८ रुपये निश्चित करण्यात आले आहे.







