दिल्लीतील राऊज ॲव्हेन्यू न्यायालयाने बिहारमधील साहेबगंज मतदारसंघाचे भाजप आमदार राजू कुमार सिंह यांना २०१८ मधील हर्ष फायरिंग प्रकरणात दोषी ठरवत चार वर्षांच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने त्यांच्यावर २५ लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी आयोजित करण्यात आलेल्या एका पार्टीदरम्यान झालेल्या बेदरकार गोळीबारात महिला डॉक्टर अर्चना गुप्ता यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात न्यायालयाने राजू कुमार सिंह यांना गैरइरादतन मनुष्यवध आणि शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत दोषी ठरवले.
न्यायालयाने आपल्या निर्णयात स्पष्ट केले की, गर्दीच्या ठिकाणी आनंदोत्सवाच्या नावाखाली केलेला गोळीबार हा अत्यंत धोकादायक प्रकार असून त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. तपासादरम्यान अनेक प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांच्या जबाबांवरून मृत्यूला कारणीभूत ठरलेली गोळी राजू कुमार सिंह यांनीच झाडल्याचे सिद्ध झाल्याचे न्यायालयाने नमूद केले.
हे ही वाचा:
चिंबई…मुंबईसह आसपासच्या सर्व शहरात मुसळधार, पालघर, वसई, विरार पाण्यात
भांडूपमध्ये रस्ता खचला; टेम्पो, झाड गेले वाहून
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रुग्णालयात दाखल
वैभव सूर्यवंशीवर दबाव टाकू नका!
शिक्षा कमी करण्यासाठी बचाव पक्षाने न्यायालयात युक्तिवाद करताना हा प्रकार हेतुपुरस्सर नसून वैज्ञानिक माहितीच्या अभावामुळे गोळीचा मार्ग समजू शकला नाही, असा दावा केला होता. तसेच प्रोबेशनवर मुक्त करण्याची विनंतीही करण्यात आली होती. मात्र न्यायालयाने हा युक्तिवाद फेटाळून लावत चार वर्षांच्या कारावासाची शिक्षा कायम ठेवली. शिक्षा सुनावल्यानंतर राजू कुमार सिंह यांना न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले.
या निर्णयानंतर त्यांच्या आमदारकीवरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. लोकप्रतिनिधी कायद्यानुसार दोन वर्षांपेक्षा अधिक शिक्षा झाल्यास सदस्यत्व रद्द होण्याची तरतूद आहे. त्यामुळे या निकालाचे राजकीय पडसादही उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
