मुंबईसह संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशात मुसळधार पावसाने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत केले आहे. पहाटेपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शहरातील अनेक सखल भाग पाण्याखाली गेले असून रस्ते, रेल्वे आणि दैनंदिन वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. हवामान विभागाने मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडसाठी रेड अलर्ट जारी केल्यानंतर राज्य सरकार आणि प्रशासन पूर्णपणे सतर्क झाले आहे. या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, प्रशासनाकडून वेळोवेळी जारी होणाऱ्या एसएमएस अलर्ट, हवामान सूचना आणि सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन केले आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले की, मुसळधार पावसाचा जोर पुढील काही तास कायम राहण्याची शक्यता असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत माहितीवरच अवलंबून राहावे. राज्य आपत्ती व्यवस्थापन विभाग, मुंबई महानगरपालिका, पोलीस, अग्निशमन दल आणि एनडीआरएफची पथके विविध संवेदनशील ठिकाणी तैनात करण्यात आली असून परिस्थितीवर चोवीस तास लक्ष ठेवले जात आहे. सखल भागातील नागरिकांना सतर्क राहण्याचे, समुद्रकिनाऱ्यांपासून दूर राहण्याचे आणि पाण्याखाली गेलेल्या रस्त्यांवरून प्रवास टाळण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.
हे ही वाचा:
हर्ष फायरिंग प्रकरणात भाजप आमदार राजू कुमार सिंह दोषी
चिंबई…मुंबईसह आसपासच्या सर्व शहरात मुसळधार, पालघर, वसई, विरार पाण्यात
भांडूपमध्ये रस्ता खचला; टेम्पो, झाड गेले वाहून
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रुग्णालयात दाखल
दरम्यान, मुसळधार पावसामुळे अंधेरी, सायन, कुर्ला, चेंबूर, साकीनाका, पवई, गोरेगाव, वांद्रे, दादर आणि इतर अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचले. काही ठिकाणी झाडे कोसळणे, भिंती ढासळणे आणि रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक कोंडी निर्माण झाली. लोकल रेल्वेच्या काही मार्गांवरही पाणी साचल्यामुळे गाड्या उशिराने धावत असून कार्यालयीन वेळेत प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. काही उड्डाणांच्या वेळापत्रकावरही पावसाचा परिणाम झाल्याचे समोर आले आहे.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून मुंबईतील अनेक शाळा आणि महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. प्रशासनाकडून पाणी उपसण्याचे काम, वाहतूक सुरळीत करण्यासाठी उपाययोजना आणि आपत्कालीन मदतकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. विविध नियंत्रण कक्षही कार्यरत ठेवण्यात आले असून नागरिकांना कोणतीही अडचण आल्यास तातडीने हेल्पलाइनवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी नागरिकांनी संयम बाळगावा, प्रशासनाला सहकार्य करावे आणि हवामान सुधारत नाही तोपर्यंत अनावश्यक प्रवास टाळावा, असे पुन्हा एकदा स्पष्ट केले. हवामान विभागाच्या सूचनांकडे दुर्लक्ष करू नये, मोबाईलवर येणारे एसएमएस अलर्ट नियमित तपासावेत आणि स्वतःच्या तसेच कुटुंबाच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे सांगत त्यांनी राज्य यंत्रणा कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यास पूर्णपणे सज्ज असल्याचा विश्वासही व्यक्त केला.







