उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे एका लग्नसोहळ्यात आनंदाचे वातावरण काही क्षणांतच भीषण संघर्षात बदलले. डीजेवर गाणे लावण्याच्या वादातून सुरू झालेला तणाव जेवणाच्या वेळी अधिकच वाढला आणि अखेर चिकनच्या “लेग पीस”वरून झालेल्या भांडणात एका २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण परिसर हादरला आहे. सध्या लग्नाच्या घटनेत वादाचे अनेक घटना घडत आहे पण अशा प्रकारे मृत्यू झाल्याने सर्वत्र चिंता व्यक्त केली जात आहे.
गोरखपूरमधील शाहपूर परिसरातील एका मॅरेज हॉलमध्ये हा प्रकार घडला. महापालिका कर्मचाऱ्याच्या मुलीचा विवाहसोहळा सुरू होता. वरात मोठ्या उत्साहात आली होती. डीजेच्या तालावर नाच, गाणी आणि जल्लोष सुरू असतानाच वर आणि वधूपक्षातील काही तरुणांमध्ये गाणे बदलण्यावरून शाब्दिक वाद झाला. उपस्थितांनी तो वाद मिटवण्याचा प्रयत्न केला आणि काही वेळ वातावरण शांतही झाले. मात्र जेवणाच्या वेळी पुन्हा किरकोळ कारणावरून वादाला ठिणगी पडली.
हे ही वाचा:
काश्मीरमध्ये गोल्फ टुरिझमला मोठी चालना
वाद, नोटीस आणि बंदी… तरीही विनेश फोगाट ठाम
वादग्रस्त हुमायून कबीर आता नवे मुख्यमंत्री शुभेंदूना देतायत धमकी
द्रविड विचारधाराविरहित थलपती विजय यांचे सरकार तामिळनाडूत स्थापन
जेवण वाढताना एका वाढपीकडून “मला चिकनचा लेग पीस का दिला नाही?” असा सवाल करण्यात आला. त्यानंतर दोन्ही बाजूंतील तरुणांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. काही मिनिटांतच हा वाद हातघाईवर आला. संतप्त झालेल्या लोकांनी एकमेकांवर बेल्ट, खुर्च्या, दगड आणि लाठ्यांनी हल्ला सुरू केला. लग्नमंडपात अचानक आरडाओरड आणि गोंधळ उडाला. महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले, तर अनेक पाहुण्यांनी जीव वाचवण्यासाठी पळ काढला.
या मारामारीत सुमित नावाचा २५ वर्षीय तरुण गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. आणखी एक युवक गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. विशेष म्हणजे सुमितचे लग्न अवघ्या तीन महिन्यांपूर्वी झाले होते. तो मोबाईल दुकान चालवत कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. त्याच्या अचानक मृत्यूमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
घटनेनंतर पोलिसांनी तातडीने मॅरेज हॉल गाठून परिस्थिती नियंत्रणात आणली. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे सात जणांना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. एका छोट्याशा कारणावरून सुरू झालेला वाद एका निष्पाप तरुणाचा जीव घेऊन गेला आणि आनंदाचा सोहळा काही क्षणांत शोकसभेत बदलला.







