पंजाबच्या राजकारणात शनिवारी (९ मे) मोठी खळबळ उडाली असून अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मनी लॉन्ड्रिंग आणि १०० कोटी रुपयांहून अधिकच्या बनावट GST खरेदी बिल प्रकरणात मंत्री संजीव अरोरा यांना अटक केली. अटकेपूर्वी ईडी ने चंदीगडमधील त्यांच्या सरकारी निवासस्थानासह अनेक ठिकाणी तब्बल ६ ते ७ तास छापेमारी केली. माहितीनुसार, सकाळी सुमारे ७ वाजता ईडीचे पथक जवळपास २० वाहनांच्या ताफ्यासह चंदीगडमधील सेक्टर-२ येथील सरकारी निवासस्थानी पोहोचले. कारवाईदरम्यान संपूर्ण परिसरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. CIA, CISF आणि विशेष पथकाचे जवानही तैनात करण्यात आले होते. तपास यंत्रणेने यावेळी विविध कागदपत्रे, इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि आर्थिक व्यवहारांचे रेकॉर्ड तपासले.
कारवाई धनशोधन प्रतिबंधक कायदा (PMLA), २००२ अंतर्गत करण्यात आली. ईडीने चंदीगड, दिल्ली आणि गुरुग्रामसह एकूण ४ ते ५ ठिकाणी एकाचवेळी छापे टाकले. यामध्ये मंत्र्यांशी संबंधित कंपन्या आणि हॅम्पटन स्काय रिअॅल्टी लिमिटेडच्या कार्यालयांचाही समावेश असल्याचे सांगितले जात आहे. तपास यंत्रणेला संशय आहे की, मोबाईल फोन व्यवसायाशी संबंधित नेटवर्कद्वारे १०० कोटी रुपयांहून अधिक रकमेची बनावट GST खरेदी दाखवण्यात आली. अस्तित्वात नसलेल्या कंपन्यांच्या नावाने बनावट बिले तयार करून इनपुट टॅक्स क्रेडिट (ITC) घेतले गेले आणि नंतर निर्यात प्रक्रियेच्या माध्यमातून ती रक्कम दुबईमार्गे भारतात परत आणली गेली, असा आरोप आहे. ईडी आता कथित आर्थिक व्यवहारांची आणि मनी ट्रेलची सखोल चौकशी करत आहे.
गेल्या एका वर्षात संजीव अरोरा यांच्याशी संबंधित ठिकाणांवर ही तिसरी ईडी कारवाई असल्याचे सांगितले जात आहे, तर महिनाभरात दुसऱ्यांदा तपास यंत्रणा त्यांच्या ठिकाणांवर पोहोचली आहे. पंजाबमधील बिल्डर आणि व्यावसायिक नेटवर्कशी संबंधित अनेक प्रकरणांतही अलीकडे ईडी सक्रिय झाली आहे. मोहालीतील वेस्टर्न टॉवरमध्ये तब्बल ४० तास चाललेले सर्च ऑपरेशनही याच तपासाशी संबंधित मानले जात आहे.
हे ही वाचा:
अखेर ममतांनी पराभव स्वीकारलाच!
शुभेंदू अधिकारी बनले भाजपचे पहिले मुख्यमंत्री!
९८ वर्षीय माखनलाल यांच्या पायाला मोदींनी केला स्पर्श, दिले आलिंगन…
ऑपरेशन सिंदूरदरम्यान चीनी एव्हिएशन अभियंते पाकिस्तानमध्ये उपस्थित!
या कारवाईनंतर पंजाबच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोपांना वेग आला आहे. मुख्यमंत्री भगवंत मान यांनी केंद्र सरकार आणि भाजपवर निशाणा साधत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर लिहिले की, “एका वर्षात तिसऱ्यांदा आणि एका महिन्यात दुसऱ्यांदा ईडी संजीव अरोरा यांच्या घरी पोहोचली आहे, पण अजूनपर्यंत काहीच सापडलेले नाही.” त्यांनी भाजप आणि ईडी विरोधी पक्षांच्या नेत्यांना घाबरवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला.







