पुण्यातील व्यावसायिक केतन अग्रवाल याच्या हत्या प्रकरणात मुख्य आरोपी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांना न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर दोघांना शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आले. तपासासाठी आवश्यक पुरावे मोठ्या प्रमाणात गोळा झाल्याचे सांगत पोलिसांनी न्यायालयीन कोठडीची मागणी केली होती. या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे.
पोलिसांच्या तपासानुसार, १८ जून रोजी लोहगड किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या केतन अग्रवाल यांना नियोजनबद्ध कट रचून दरीत ढकलून ठार मारण्यात आले. या कटामागे केतनची मंगेतर सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी असल्याचा आरोप आहे.
पोलिसांच्या तपासात सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्यातील जवळचे संबंध समोर आले आहेत. दोघांनी गेल्या काही महिन्यांत हजारो वेळा फोनवर संवाद साधला होता. तपासात त्यांच्या मोबाइलमधून डिलीट केलेला डिजिटल डेटा, कॉल रेकॉर्ड आणि सोशल मीडिया संवादही तपासण्यात आला आहे. पोलिसांच्या मते, केतनला मार्गातून हटवण्यासाठी दोघांनी अनेक दिवस आधीपासून कट रचला होता.
तपासादरम्यान पोलिसांनी धक्कादायक माहिती उघड केली आहे. आरोपींनी लोहगड परिसरात हत्येपूर्वी ‘रिहर्सल’ केल्याचा दावा तपास यंत्रणांनी केला आहे. योग्य ठिकाणाची पाहणी करून केतनला दरीत कसे ढकलायचे, याची रंगीत तालीमही करण्यात आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. घटनेच्या दिवशी सिया एका ठरलेल्या इशाऱ्याद्वारे चेतनला संकेत देताच त्याने केतनला दरीत ढकलल्याचा आरोप आहे.
पोलिसांनी तपासादरम्यान आरोपींचे मोबाईल, कपडे आणि इतर साहित्य जप्त केले आहे. डिलीट केलेला डेटा पुन्हा मिळवण्याचे काम सुरू असून फॉरेन्सिक तपासालाही वेग देण्यात आला आहे. याशिवाय केतनचा बेपत्ता पासपोर्ट, कॉल रेकॉर्ड आणि आर्थिक व्यवहारांचीही चौकशी सुरू आहे. सत्य समोर आणण्यासाठी पॉलीग्राफ चाचणी आणि गेट अॅनालिसिस (चालण्याच्या पद्धतीचे विश्लेषण) करण्याची तयारीही पोलीस करत आहेत.
हे ही वाचा:
बिसूरमध्ये मशिदीशेजारी राहणाऱ्या हिंदू कुटुंबांना प्रचंड त्रास
सोफी एक्लेस्टोनचा विश्वविक्रम!
श्री तुळजाभवानीदेवीच्या जमीन महाघोटाळ्याच्या चौकशीचे महसूलमंत्र्यांचे निर्देश
दरम्यान, सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्या वकिलांनी पोलिसांच्या आरोपांना विरोध केला आहे. या प्रकरणात कोणताही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नाही आणि आरोपींविरुद्ध थेट पुरावेही उपलब्ध नाहीत, असा दावा बचाव पक्षाने केला आहे. पोलिसांनी केवळ परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे गुन्हा सिद्ध करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही त्यांनी केला. न्यायालयीन कोठडीदरम्यान पोलीस फॉरेन्सिक अहवाल, डिजिटल पुरावे आणि इतर तांत्रिक तपास पूर्ण करणार आहेत. या प्रकरणात आणखी काही व्यक्तींचा सहभाग होता का, याचाही तपास सुरू असून तपास पूर्ण झाल्यानंतर आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहे.







