भारताच्या मच्छिमारांवर समुद्रात श्रीलंकन चाच्यांनी हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात १७ जण जखमी झाले असून त्यांच्यावर सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेदरम्यान मच्छिमारांच्या अनेक वस्तूंचे नुकसान झाल्याचेही समोर आले आहे. ‘इंडिया टुडे’ने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.
शुक्रवारी (२ मे) कोरोमंडेल किनाऱ्यावर तामिळनाडूच्या नागापट्टिनम जिल्ह्यातील ३० हून अधिक मच्छीमार मासेमारी करत होते. यावेळी या मच्छिमारांवर श्रीलंकेच्या चाच्यांच्या गटाने हल्ला केल्याचा आरोप होत आहे. ३० हून अधिक मच्छीमार मासेमारी करत असताना या हल्ल्यात १७ जण जखमी झाले आहेत. हे मच्छीमार फायबर बोटीने समुद्रात गेले होते. त्यांनी सांगितले की, ते कोडियाकराईच्या आग्नेय दिशेला होते तेव्हा एक स्पीड बोट त्यांच्या दिशेने आली. या बोटीतील सहा जणांनी अचानक त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला करण्यास सुरुवात केली.
हे ही वाचा..
आतंकवाद्यांविरुद्ध भारत निर्णायक कारवाई करणार
पाकिस्तानमधून येणाऱ्या सर्व पोस्टल, पार्सल सेवांवर भारताकडून बंदी
पावसाळ्यात उगवणारे रहस्यमय औषधी वनस्पती कोणते ? जाणून घ्या फायदे
भारतीय बंदरांवर पाकिस्तानी झेंडाधारी जहाजांना ‘नो एन्ट्री’
हल्लेखोरांनी जीपीएस उपकरणे आणि मासेमारीची जाळी लुटल्याचा आरोप आहे. शिवाय त्यानंतर त्यांनी परिसरातील इतर अनेक बोटींना लक्ष्य केले. चोरी झालेल्या वस्तूंची किंमत सुमारे १० लाख रुपये असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. किनाऱ्यावर परतल्यानंतर १७ जखमी मच्छिमारांना जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मच्छिमारांनी दावा केला की, हा हल्ला भारतीय सागरी हद्दीतच झाला आहे. “श्रीलंकेच्या चाच्यांनी आमच्यावर हल्ला केला आणि अनेक मच्छिमारांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आम्ही राज्य आणि केंद्र सरकारला हस्तक्षेप करण्याची विनंती करतो. आम्ही सध्या संपावर आहोत आणि जर असे हल्ले सुरू राहिले तर आम्ही अनिश्चित काळासाठी निषेध करू,” असे सेरुधुर येथील मच्छीमार गजेंद्रन म्हणाले.