फेब्रुवारी २०२० मधील ईशान्य दिल्ली दंगलीदरम्यान इंटेलिजन्स ब्युरो (आयबी) अधिकारी अंकित शर्मा यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी आम आदमी पक्षाचे (आप) माजी नगरसेवक ताहीर हुसेन आणि इतर चार दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. दिल्लीतील करकरडूमा न्यायालयाने हा निर्णय दिला असून शिक्षा सुनावताना न्यायालयाने या हत्येचे स्वरूप अत्यंत क्रूर असल्याचे नमूद करत हा गुन्हा “अत्यंत दुर्मिळ स्वरूपाचा” असल्याचे निरीक्षण नोंदवले.
न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटले की, या प्रकरणात केवळ हत्या करून गुन्हा थांबला नाही, तर मृतदेह जवळच्या गटारात ओढून नेऊन टाकण्यात आला. जणू काही आरोपींचा द्वेष मृत्यूनंतरही संपला नव्हता, अशा शब्दांत न्यायालयाने या घटनेचे वर्णन केले. गुन्ह्याचे अमानुष स्वरूप हे शिक्षेत सवलत देणाऱ्या बाबींपेक्षा अधिक गंभीर असल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले. पीडिताच्या मृतदेहाची जी अवस्था झाली, त्याबद्दल बोलताना न्यायालयाने म्हटले की, अंकित शर्माचा मृतदेह चांद बाग पुलियापर्यंत ‘जनावराप्रमाणे’ फरफटत नेण्यात आला आणि नंतर गटारात फेकून देण्यात आला. शिक्षा सुनावताना न्यायाधीशांनी टिप्पणी केली, केलेली अमानुषता किळसवाणी आणि घृणास्पद आहे.
फेब्रुवारी २०२० मध्ये ईशान्य दिल्लीत नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या (CAA) पार्श्वभूमीवर उसळलेल्या हिंसाचारात आयबीमध्ये सुरक्षा सहाय्यक म्हणून कार्यरत असलेले २६ वर्षीय अंकित शर्मा यांना जमावाने घेरल्याचा आरोप आहे. त्यांना चाकू, काठ्या, लोखंडी सळ्या आणि दगडांनी मारहाण करण्यात आली. त्यानंतर त्यांचा मृतदेह जवळील गटारात फेकून देण्यात आला. दुसऱ्या दिवशी त्यांचा मृतदेह सापडला असता त्यावर तब्बल ५१ चाकूचे वार असल्याचे शवविच्छेदनातून समोर आले होते. आरोपपत्रानुसार, २५ फेब्रुवारी २०२० रोजी सायंकाळी सुमारे ५ वाजता अंकित शर्मा हे ताहीर हुसेन यांच्या घराजवळ दोन गटांमधील तणाव शांत करण्याचा प्रयत्न करत असताना जमावाने त्यांना घेरले आणि त्यांच्यावर हल्ला करण्यात आला.
न्यायालयाच्या निर्णयानंतर दिल्लीचे कायदा मंत्री कपिल मिश्रा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रतिक्रिया देताना म्हटले की, “ताहीर हुसेनला झालेली जन्मठेप ही न्यायाची केवळ सुरुवात आहे. अंकित शर्मा यांची ज्या क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली, त्यानंतरही त्यांच्या मृतदेहावर वार करून तो गटारात फेकण्यात आला. हा गुन्हा निश्चितच अत्यंत दुर्मिळ स्वरूपाचा आहे. उच्च न्यायालयात या शिक्षेचे रूपांतर फाशीच्या शिक्षेत होईल, अशी अपेक्षा आहे.”
हे ही वाचा:
कोकण रेल्वेचे तिकीट नाही…तीन गाड्या, चाकरमानी वाऱ्यावर; बेलापूरमध्ये उपोषण
पश्चिम बंगालमध्ये जैशच्या संशयित दहशतवाद्याला अटक
ममतांच्या काळातील जमीन लीज व्यवहारांची होणार छाननी
मुंबई उच्च न्यायालयातील कँटीनला ‘स्टॉप बिझनेस’ नोटीस
दुसरीकडे, ताहीर हुसेन यांच्या वकिलांनी न्यायालयाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. त्यांच्या मते, हुसेन हे केवळ घटनास्थळी उपस्थित असलेल्या गर्दीचा भाग होते आणि हत्येशी त्यांचा थेट संबंध नाही. ताहीर हुसेन यांनीही निवेदन जारी करत आपण निर्दोष असल्याचा दावा केला असून न्याय मिळवण्यासाठी कायदेशीर लढा पुढेही सुरू ठेवणार असल्याचे म्हटले आहे.







