समुद्र किनारी फिरण्यासाठी आलेल्या चार जणांपैकी तिघेजण जुहू चौपाटी येथील समुद्रात बुडाल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. उशिरा पर्यंत तटरक्षक दलाच्या मदतीने या तिघांचा शोध घेण्याचे काम सुरू होते. मात्र अद्याप कोणीही मिळून आलेले नसल्याची माहिती सांताक्रूझ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब तांबे यांनी दिली.
तिघेही चेंबूर वाशीनाका येथे राहणारे असून त्यात दोन सख्ख्या भावांचा समावेश आहे. प्रथम गणेश गुप्ता (१६),कौस्तुभ गणेश गुप्ता (१८) आणि अमन सिंह (२१) अशी बुडालेल्या तिघांची नावे असून अभिषेक शर्मा हा वाचला आहे. त्याने लाइफगार्डच्या मदतीमुळे स्वतःचे प्राण वाचविले, पण इतर तिघे मात्र पाण्यात बुडाले.
वाशीनाका येथील अमन आशियाना या इमारतीत राहणारे हे चौघे राहातात. हे सगळे विद्यार्थी असून दुपारी २.३० ते ३ या वेळेत ते पोहोण्यासाठी गेले होते. जे डब्ल्यू मॅरियट आणि ट्युलिप हॉटेलच्या जवळ असलेल्या लेनकडून ते समुद्राकडे निघाले होते. ही जागा मुख्य जुहू समुद्रकिनाऱ्यापासून ५०० मीटरवर आहे. ही घटना घडली कमी उंचीच्या लाटा होत्या. पण या लाटांनी या चौघांनाही ओढून नेले. अभिषेकने मात्र स्वतःला वाचविण्यात यश मिळविले. आता बुधवारी बुडालेल्या तिघांचा शोध पुन्हा घेण्यात येणार आहे.
हे ही वाचा:
मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याशेजारी सापडला अजगर; सर्पमित्रांनी वाचवले
‘देशात विकास आणि आराध्य एकत्र पुढे गेलं पाहिजे’
प्रत्येक काळाच्या नव्या बदलांना वृत्तपत्रांनी जपले आहे!
लाइफगार्डने सांगितले की, कोरोनाच्या काळात हा किनारा पूर्णपणे बंद होता पण लॉकडाऊन उठविण्यात आल्यानंतर किनाऱ्यावर गर्दी वाढू लागली आहे. पोलिसांनी सांगितले की, अनेक लोक समुद्रकिनाऱ्यावर येतात पण सगळ्यांवर नियंत्रण ठेवणे कठीण असते.