पश्चिम बंगालमधील पुरुलिया जिल्ह्यात भाजपचे सक्रिय पदाधिकारी आणि शक्ती केंद्र प्रमुख असलेले ४५ वर्षीय हाबूलाल गोप यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याने राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे. गुरुवारी रात्री लग्नसमारंभासाठी घराबाहेर पडलेले हाबूलाल गोप शुक्रवारी सकाळी मृतावस्थेत आढळून आले. या घटनेनंतर त्यांच्या कुटुंबियांनी हा राजकीय हेतूने केलेला नियोजित खून असल्याचा गंभीर आरोप केला आहे.
हाबूलाल गोप हे पुरुलिया जिल्ह्यातील बेलडी गावचे रहिवासी होते आणि स्थानिक स्तरावर भाजपचे सक्रिय कार्यकर्ते म्हणून ओळखले जात होते. कुटुंबीयांच्या माहितीनुसार, ते गुरुवारी एका लग्नसमारंभासाठी घरातून बाहेर पडले होते. मात्र रात्री उशिरापर्यंत ते परत न आल्याने नातेवाईकांनी शोध सुरू केला. शुक्रवारी सकाळी कनाली गावाजवळ रस्त्याच्या कडेला त्यांचा मृतदेह आढळून आला.
हे ही वाचा:
पारस डिफेन्स विकसित करणार ‘RayStrike-9’ हाय-पॉवर लेझर शस्त्रप्रणाली
फ्रीजमध्ये वस्तू उघड्या ठेवताय? आरोग्यासाठी किती धोकादायक ठरू शकते ही सवय?
सातवे सोनेरी पान लिहीले जात आहे…
पश्चिम बंगालमधील शपथविधीच्या मंचावर पंतप्रधान मोदींचा साष्टांग दंडवत
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पुरुलिया सरकारी वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात पाठवला. पोलिसांनी मृत्यूचे नेमके कारण पोस्टमॉर्टम अहवालानंतर स्पष्ट होईल, असे सांगत तपास सुरू केला आहे. अद्याप या प्रकरणात कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
दरम्यान, हाबूलाल गोप यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा असल्याचा दावा केला आहे. चेहरा, छाती आणि पोटावर जखमांचे निशाण असल्याचे सांगत त्यांनी हा अपघाती मृत्यू नसून राजकीय सूडातून करण्यात आलेली हत्या असल्याचा आरोप केला. “हाबूलाल गोप हे भाजपशी सक्रियपणे जोडलेले होते. त्यांची नियोजनपूर्वक हत्या करण्यात आली,” असे कुटुंबीयांनी म्हटले आहे.
या घटनेनंतर भाजप युवा मोर्चा आणि स्थानिक भाजप नेत्यांनी संताप व्यक्त करत निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे. दोषींना तातडीने अटक करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली. पुरुलिया परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकांनंतर वाढलेल्या राजकीय हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर ही घटना अत्यंत संवेदनशील मानली जात आहे. काही दिवसांपूर्वी भाजप नेते शुभेंदू अधिकारी यांचे निकटवर्तीय चंद्रनाथ रथ यांच्या हत्येनंतर राज्यातील राजकीय संघर्ष अधिक तीव्र झाला होता.







