27.4 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
घरसंपादकीयजे.पी.नड्डा-चव्हाण यांची बंद दाराआड चर्चा...

जे.पी.नड्डा-चव्हाण यांची बंद दाराआड चर्चा…

Google News Follow

Related

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा कालपासून दोन दिवस मुंबई दौऱ्यावर होते. सह्याद्री निवासस्थानी मुक्कामाला असलेल्या नड्डा यांनी नुकतेच भाजपामध्ये दाखल झालेले काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्यासोबत बंद दारा आड चर्चा झाली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. चव्हाण यांच्या भाजपा प्रवेशानंतर काँग्रेसमध्ये पळापळ होणार अशी शक्यता व्यक्त करण्यात येत असताना ही भेट झालेली आहे. काँग्रेसमध्ये भगदाड पडणार ही बाब आता निश्चित झालेली आहे.

१५ फेब्रुवारी रोजी लोणावळ्यात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे चिंतन शिबीर झाले या शिबीराला अनेक आमदार अनुपस्थित होते. नेमका आकडा काय हे झाकून ठेवण्याचा प्रयत्न झाला. उपस्थित आमदारांची संख्या ३० पेक्षा कमी होती, असे वृत्त आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी १० आमदारांना कारणे दाखवा नोटीस जारी करण्यात आली आहे. यामध्ये नांदेडमधील तीन आमदारांचा समावेश आहे.

वांद्र्याचे काँग्रेस नेते झियाउद्दीन उर्फ बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेस सोडली आहे. त्यानंतर त्यांचे चिरंजीव आणि वांद्र्याचे आमदार झिशान सिद्दीकी यांची मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून उचलबांगडी करण्यात आली. कोण कोण पक्षातून फुटू शकते याची चाचपणी सुरू आहे. नांदेडमध्ये काँग्रेसचे आमदार माधवराव जवळकर, मोहन हंबर्डे, रावसाहेब अंतापूरकर हे अशोकराव चव्हाण यांच्या जवळचे मानले जातात. या शिवाय सुलभा खोडके, अमीन पटेल, झिशान सिद्दीकी, अमित झणक यांचीही नावे आहेत. भोकर मतदार संघाचे आमदार अशोक चव्हाण यांनी सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे.

आपण काँग्रेसच्या एकाही आमदाराशी संपर्क केला नाही, असे अशोक चव्हाण म्हणाले आहेत. परंतु खदखद इतकी आहे की हवेची एक झुळूक सुद्धा वणवा पेटवू शकते. लोकसभा निवडणूक तोंडावर असताना पक्षात काहीच हालचाल नाही. एका बाजूला भाजपाचे राष्ट्रीय नेते महाराष्ट्राचे एका पाठोपाठ एक दौरे करीत असताना काँग्रेसमध्ये मात्र निवडणुकीच्या दृष्टीने कोणतीही हालचाल होताना दिसत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी विविध प्रकल्पांच्या उद्घाटन सोहळ्यानिमित्त, विविध कार्यक्रमांच्या निमित्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जात आहेत. गेल्या १४ महिन्यांचा हिशोब केला तर मोदी ६ वेळा महाराष्ट्रात आले. साधारणपणे ७० दिवसांनी ते महाराष्ट्रात येतात असे ही आकडेवारी सांगते. गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा हे नेते देखील महाराष्ट्रात दौरे करत असतात. या दौऱ्यांमध्ये या नेत्यांचा भर बैठकांवर असतो. काल नड्डा यांनी मुंबईच्या लोकसभा निवडणूक संचालन समितीची बैठक घेतली. अशोक चव्हाण यांच्यासोबत त्यांनी सह्याद्री अतिथीगृहात चर्चा केली. त्यानंतर वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतही त्यांनी स्वतंत्र चर्चा केली.

भाजपा नेत्यांच्या तुलनेत राहुल गांधी यांचे महाराष्ट्र दौरे संख्येने कमी आहेत. ते एखादी सभा, भारत जोडो यात्रा अशा कार्यक्रमांसाठी महाराष्ट्रात येतात. कार्यक्रम आटोपले की रवाना होतात. कार्यकर्त्यांसोबत चर्चा मीठापुरती होते. त्यामुळे पक्षाची सद्यस्थिती, निवडणुकीची तयारी, इच्छुकांसोबत चर्चा, पक्षासमोर असलेली आव्हाने याबाबत राहुल गांधींना क्वचितच माहिती असते. मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे पक्षाचे अध्यक्षपद असले तरी ते रबरस्टँप आहेत. निर्णय करण्याचे अधिकार राहुल गांधी यांच्याकडेच आहेत. ते एकूणच निवडणूक प्रक्रियेबाबत गंभीर नाहीत. पक्ष सोडल्यानंतर अशोक चव्हाण यांनी ज्या विविध चॅनलला मुलाखती दिल्या त्यात जे काही म्हटले आहे त्यात हीच भावना व्यक्त केलेली आहे. लढण्याची तयारी कुठेच दिसत नाही, असे त्यांचेही म्हणणे आहे.

हे ही वाचा:

पंतप्रधान नरेंद्र मोदी संदेशखाली येथील पीडितांची घेणार भेट!

शेतकरी-पोलिसांच्या चकमकीत शेतकऱ्याचा मृत्यू

शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण; एक मृत्यू, १२ पोलिस आणि ५८ शेतकरी जखमी

“मनोज जरांगेंच्या आंदोलनामागे शरद पवारांचा हात”

काँग्रसेचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथल यांच्या उपस्थिती आज मुंबईमध्ये काही प्रमुख आमदारांची बैठक झाली. लोकसभा निवडणुकीच्या रणनीती बाबत चर्चा करण्यासाठी ही बैठक असल्याचे सांगण्यात येत असले तरी फूट टाळण्याच्या दृष्टीने या बैठकीत चर्चा झाल्याचे समजते. मार्चच्या पहिल्या आठवड्यात लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर होण्याची शक्यता आहे. राज्यात निवडणूक आचार संहीता लागू करण्यात येईल. त्याच्या आधी काँग्रेसमध्ये मोठे भगदाड पडण्याची शक्यता आहे. काँग्रेस पक्षामध्ये लढण्या इतपतही जोर उरलेला नसल्यामुळे आमदार नसलेले परंतु २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत निसटत्या फरकाने पराभूत झालेल्या काँग्रेस नेत्यांचा समावेश आहे.

काँग्रेसमधून बाहेर पडणाऱ्या नेत्यांच्या नावांत विजय वडेट्टीवार यांच्यापासून संजय निरुपम यांच्या पर्यंत अनेक नावांची चर्चा आहे. यात सत्य किती वावड्या किती हे समजण्यासाठी फार काळ थांबण्याची गरज नाही. काँग्रेसच्या बैठकीला दहा आमदार अनुपस्थित होते, काँग्रेससाठी काही चांगले लक्षण नाही. लोकसभा निवडणुकी आधी काँग्रसमध्ये भगदाड पडणार हे नक्की. नड्डा, अशोक चव्हाण आणि देवेंद्र फडणवीस यांच्या झालेल्या चर्चेत काँग्रेसची दुखरी नस कोणती, फटी आणि भेगा कुठे कुठे आहेत, याची माहिती आता भाजपाच्या शीर्ष नेतृत्वापर्यंत पोहोचलेली आहे. आता फक्त एका जबरदस्त प्रहाराची गरज आहे.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
149,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा