34 C
Mumbai
Friday, April 26, 2024
घरसंपादकीयपगारी चाणक्य, नाक कापलेला राजा

पगारी चाणक्य, नाक कापलेला राजा

स्वत:चं हे असं माकड करून घेण्याचे श्रेय राऊतांकडेच जाते.

Google News Follow

Related

एका राजावाड्यात माकडाचे पिल्लू होते. हे पिल्लू राजाचे खूप लाडके होते. राजवाड्यात ते वाढत होते. राजाला स्वारी-शिकारीचे वावडे होते. दिवसभर घरबसल्या लाडक्या जनावराच्या माकडचेष्टांमुळे राजाचा वेळ सुद्धा बराच जायचा. हे प्रेम इतके वाढले कि त्याने माकडाला मंत्री बनवले. रात्री झोपल्यावर स्वत:च्या सुरक्षेची जबाबदारी त्याच्यावर सोपवली. हातात तलवार दिली, एका रात्री माशी मारण्याच्या प्रयत्नात माकडाने तलवारीने राजाचे नाक कापले.
केवळ माकडचेष्टा या गुणवत्तेवर पगारी चाणक्यांची नियुक्ती होते. तेव्हा राज्याच्या नशीबी हे असे नाक कापून घेणे येते. उद्धव ठाकरेंची स्थिती सध्या तशीच झाली आहे.

निवडणूक आयोगाच्या निर्णयासाठी दोन हजार कोटी रुपयांचा सौदा झाल्याचा ताजा आरोप उद्धव यांचे चाणक्य संजय राऊत यांनी केला आहे. मीडियासमोर वाट्टेल ते बोलले की मीडियावाले त्याची भलीमोठी बातमी बनवतात आणि प्रसिद्धी मिळते.

शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण ही निशाणी एकनाथ शिंदे यांना देण्याच्या आयोगाच्या निर्णयामुळे बुडाला लागलेली आग सर्वोच्च न्यायालयात जाऊन विझेल असा ठाम विश्वास असल्यामुळे उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. याचिकेची तातडीने सुनावणी घेण्याची मागणी केली. परंतु सर्वोच्च न्यायालयातही सणसणीत लाथ बसली आहे, सर्वोच्च न्यायालयाने याचिकेची तातडीने सुनावणी घेण्याच्या मागणीला वाटाण्याच्या अक्षता लावल्या. या याचिकेत दोन हजार कोटींच्या डीलचा कुठेही उल्लेख नाही. कारण तिथे बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल असा मामला असतो. सर्वोच्च न्यायालयाने पुराव्यांची मागणी केली असती. कुठल्याशा नशेच्या अंमलाखाली केलेले बिनबुडाचे आरोप तिथे चालत नाहीत.

भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी संजय राऊतांच्या दोन हजार कोटींच्या आरोपाची निवडणूक आयोगाने दखल घ्यावी अशी मागणी केली आहे. म्हणजे राऊतांना बुडवण्यासाठी त्यांनीच लावलेल्या काडीचा पुन्हा सोमय्यांनी आधार घेतला आहे.
निवडणूक आय़ोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह गोठवल्यावर राऊत जे बोलतायत त्याला फक्त बेताल म्हणता येत नाही. पिसाळणे हा त्यासाठी योग्य शब्द आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कुणाचे ढुंगण हुंगतायत असा सवाल करून त्यांनी या पिसाळण्यावर शिक्कामोर्तब केले आहे. विरोधक सुद्धा राऊत यांची योग्यता जाणून गेले आहेत. त्यामुळे राऊतांना त्यांच्यासारख्या शेलक्या भाषेत उत्तर दिले जात आहे. त्यांच्या पातळीवर येऊन त्यांना चेपले जात आहे. पत्राचाळीची जमीन परस्पर बिल्डरांना विकण्यासाठी कितीची डील झाली, हे सोडून राऊतांना बाकी सर्व डीलची माहीती असते. सत्ता गमावली, सत्तेमुळे असलेला तोरा उतरला, त्यामुळे राऊतांना प्रचंड नैराश्य आलेले दिसते.

शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी राऊतांचा यथायोग्य समाचार घेतला आहे. कुत्रा पिसाळला, चावत सुटला तरी आपण त्यांना चावतो का? असा सवाल करून त्यांनी राऊतांची लायकी दाखवून दिली आहे. अशा कुत्र्याला औषध दिले जाते. फक्त आठ दिवस वाट पाहा, असे सूचक वक्तव्य शिरसाट यांनी केले आहे. थोडक्यात सांगायचे तर आठ दिवसात राऊतांची वाट लावण्याचे प्लानिंग एकनाथ शिंदे यांनी तयार केलेले आहे. नेमके कोणते औषध देणार याबाबत मात्र काही अंदाज लागत नाही.

हे ही वाचा:

व्हीपवरून शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यात कलगीतुरा

या खासदाराच्या घरी आहेत ५० घरटी.. १०० चिमण्यांचा रोज चिवचिवाट

शिवसेनेचे विधीमंडळातील कार्यालय शिंदे गटाच्या ताब्यात..शिवालयही येणार

शिवसेनाभवन ही विश्वस्त संस्था असेल तर मग राजकीय कार्यालय कसे?

ढुंगण हुंगण्याच्या विधानावरून राऊतांच्या विरोधात नाशिक पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुन्हा एकदा तुरुंगाच्या उंच भिंती राऊतांना खूणावू लागल्या आहेत. स्वत:चं हे असं माकड करून घेण्याचे श्रेय राऊतांकडेच जाते. उद्धव ठाकरें यांचा बाजार उठल्यानंतर ते काय करतात याचा एक पॅटर्न ठरलेला आहे. ते आधी मातोश्रीमध्ये बसून संवाद साधतात. नंतर ते टप्प्या टप्प्याने शिवसेनाभवनपर्यंत जातात. नंतर ते पुन्हा घरी बसतात. निवडणूक आय़ोगाच्या निर्णयानंतरही ते त्याच मार्गाने चाललेले आहेत. पहिल्या दिवशी मातोश्रीमध्ये पत्रकार परिषद, दुसऱ्या दिवशी मातोश्रीबाहेरच्या कालेलकर रोडवर चौक सभा, तिसऱ्या दिवशी शिवसेनाभवन. आता काही दिवस आलटून पालटून शिवसेना भवन-मातोश्री झाल्यानंतर पुढे मग मातोश्री एके मातोश्री असा सिलसिला सुरू होईल.

निवडणूक आयोग बरखास्त करा, निवडणूक आयुक्तांची नियुक्ती नको, त्यांचीही निवडणूक घ्या अशी भारी सूचना ठाकरे यांनी केलेली आहे. २०२४ नंतर देशात निवडणुका होणार नाही, मोदी देशात यादवी माजेल, शिवसेना हे नाव शिंदेंना बहाल केल्याच्या मुद्यावरून देश पेटेल अशी इशारेवजा विधाने करून आजही त्यांनी पत्रकारांचे आणि जनतेचे पूर्ण मनोरंजन होईल याची काळजी घेतली. इव्हीएमवर आमचा विश्वास नाही, हे सांगून येत्या निवडणुकीत पराभव झाला तरी काय सांगायचे हेही त्यांनी स्पष्ट केले आहे. पत्रकार परिषदेदरम्यान पगारी चाणक्य बाजूला होते. येत्या काळात उद्धव ठाकरे कसे लढणार याची झलक पुन्हा एकदा लोकांनी पाहिली.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा