38 C
Mumbai
Sunday, April 28, 2024
घरसंपादकीयतोंड काळे करण्याचा शौक...

तोंड काळे करण्याचा शौक…

गुजरातविरोधात गरळ ओकण्याचे काम करणे हेच मराठी हित आहे, अशी ठाकरेंची भूमिका आहे

Google News Follow

Related

काही लोकांना थोबाड काळे करून घेण्याचा शौक असतो. इतका की लोकांना वेळ नसेल तर ही मंडळी कोळश्याच्या पोत्यात तोंड खूपसून काळे करून घेतात. माजी बेश्ट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचे नाईट लाईफ फेम चिरंजीव आदित्य ठाकरे यांनी हा शौक बाणवून घेतला आहे. संगतीमुळे बहुधा खासदार शरद पवारांनाही हा गुण लागलेला दिसतो. ठाकरे पवारांकडून काही शिकतील अशी अपेक्षा होती. झाले उलटेच, पवार आता ठाकरेंसारखे वागू लागलेत. डायमंड बोर्स प्रकरणात दोघांची व्यवस्थित हजामत करण्यात आलेली आहे.

 

१७ डिसेंबर २०२३ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरत डायमंड बोर्सचे उद्घाटन केले. ही जगातील सगळ्यात मोठी कॉर्पोटरेट इमारत आहे. यापूर्वी हा बहुमान अमेरिकेतील पेंटॅगॉनच्या इमारतीला होता. सुरत डायमंड बोर्समुळे तो आता भारताकडे आला आहे. ७१ लाख चौ.फूटांवर इमारत पसरलेल्या या इमारतीची नोंद गिनेज बुकात झालेली आहे. उद्धव ठाकरे जेव्हा कलानगरमध्ये मातोश्री-२ उभारत होते. तेव्हा सुरतमध्ये डायमंड बोर्सचे काम सुरू होते. सत्तेवर असताना ज्यांना फक्त ‘माझे कुटुबं’ सुचत होते, त्या ठाकरेंना सत्ता गेल्यावर महाराष्ट्रातील उद्योगांचा प्रचंड कळवळा आलाय.

 

महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्यात फक्त खंडणी, वसूली आणि टक्केवारी या तीन उद्योगांचा बोलबाला होता. मुख्यमंत्री घरी बसलेले होते. एकनाथ शिंदे यांनी या बेश्ट मुख्यमंत्र्यांना कायमस्वरुपी घरी बसवले आणि राज्याची सूत्रे हाती घेतली. मुख्यमंत्रीपदाची खुर्ची गेल्यानंतर यांना राज्यातील उद्योगांचा विचार सुचला. बाप-बेट्यांनी उद्योग गुजरातमध्ये जातायत, तरुण बेरोजगार होतायत, अशी हाकाटी पिटायला सुरूवात केली. रोज उठायचे आणि फॉक्सकॉन गेले, वेदांता गेला, अमुक गेले आणि तमुक गेले अशी ओरड करायची असा प्रकार सुरू झाला. महाराष्ट्र सरकारने उद्योगांबाबत श्वेत पत्रिका काढून यांच्या तोंडावर फेकली.

 

गुजरात मध्ये डायमंड बोर्सच्या भव्य इमारतीची निर्मिती झाल्यानंतर ठाकरेंच्या पोटात पुन्हा मुरडा आला. मुळात यांच्यात काही भव्य दिव्य करण्याची क्षमता नाही. दुसरा करतोय त्याचे कौतुक करण्याइतपत मनाचा मोठे पणा नाही. गुजरात जणू पाकिस्तान आणि चीनचाच भाग आहे, अशा थाटात गुजरातविरोधात गरळ ओकण्याचे काम करणे हेच मराठी हित आहे, असा समज मराठी माणसाच्या गळी उतरवण्याचे काम ठाकरे कायम करत असतात. याच अजेंड्याला धरून मुंबईतील सगळा हिरे व्यापार गुजरातमध्ये जाणार अशी आवई ठाकरे पिता-पुत्रांनी उठवायला सुरूवात केली. मुंबईतील हिरे व्यापार गुजरातमध्ये स्थलांतरीत झाल्यामुळे लाखो तरुण रोजगाराला मुकणार आहेत, असे विधान करून खासदार शरद पवार यांनी त्यांची तळी उचलली.

 

‘आपल्याला अर्थकारणातील काही कळत नाही’, अशी जाहीर कबुली ठाकरेंनी दिलेली आहे. परंतु शरद पवारांनी मात्र अशी कबुली दिल्याचे ऐकीवात नाही, तरीही शरद पवारांसारखा नेता ठाकरेंच्या सुरात सूर मिसळतो हे आश्चर्यकारक आहे.
एखाद्या प्रश्नावर बोलताना किमान तो प्रश्न काय हे तरी समजून घ्यावा, ही ठाकरेंची मानसिकता नाही. कारण त्यासाठी अभ्यास करावा लागतो. समजून घेण्याची क्षमता लागते. किमान बुद्धीमत्तेची गरज असते. इतके सगळे पेच असल्यामुळे ठाकरे पिता-पुत्र कधी अभ्यासपूर्ण बोलण्याच्या भानगडीत पडत नाही. म्हणूनच ते शक्यतो विधानसभेत बोलणे टाळतात. कारण तिथे बोलले म्हणजे रेकॉर्डवर येते. त्यापेक्षा पत्रकारांसमोर बोलणे सोपे असते. कारण पत्रकार प्रश्न विचारत नाहीत. गपगुपमान माना डोलावतात. एखाद्याने धीर करून प्रश्न विचारलाच तर त्याच्यावर डाफरून गप्प करता येते. शरद पवार तर हा प्रयोग वारंवार करताना दिसतात.

 

हे ही वाचा:

कुस्ती फेडरेशनच्या निवडणुकीनंतर साक्षी मलिक, विनेश फोगटचा कुस्तीला रामराम!

जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला, ३ जवान जखमी!

संसद भवनाची सुरक्षा आता ‘सीआयएसएफ’ करणार

शपथ पूर्ण झाली, ५०० वर्षांनंतर क्षत्रिय घालणार पगडी आणि चामड्याचे जोडे!

ठाकरेंनी सुरतमध्ये डायमंड बोर्सच्या निमित्ताने उपस्थित केलेल्या प्रश्नांचे, त्याचे सविस्तर उत्तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिले. राज्यातील अडीच वर्षांचे मविआ सरकार ही किती मोठी ब्याद होती. ठाकरेंनी राज्याला भीकेला लावण्यासाठी कोणतीही कसर कशी शिल्लक ठेवली नव्हती, याचा उलगडा फडणवीसांच्या उत्तरातून झाला. ठाकरेंना स्वत:चे तोंड काळे करण्याची हौस असल्यामुळे ते अशा प्रकारचे मुद्दे उपस्थित करतात याचाही उलगडा झाला. जसा वरवंटा ठाकरेंनी मेट्रो कारशेड, बुलेट ट्रेन, रत्नागिरी रिफायनरीवर चालवला तसाच वरवंटा त्यांनी हिरे व्यापारावरही चालवला होता, ही माहिती फडणवीसांच्या उत्तरामुळे जनतेला समजली.

 

सुरत हे हिऱ्यांची मोठी बाजारपेठ आहे. मार्केट शिवाजी महाराजांच्या काळापासूनचा हा लौकीक आहे. इथे डायमंड बोर्स २०१३ पासून आहे. यंदाच्या वर्षी १७ डिसेंबर रोजी डायमंड बोर्सच्या नव्या इमारतीचे उद्घाटन झाले. तिथे डायमंड बोर्सची भव्य इमारत उभी झाली असली तरी आपल्या इथला एकही व्यवसाय तिथे गेलेला नाही. बीकेसीमध्ये भारत बोर्सची भव्य इमारत आहे. इथल्या व्यापाऱ्यांनी आम्ही सुरतमध्ये जाणार, उलट आम्ही इथेच विस्तार करीत आहोत असे स्पष्ट केल्याचे फडणवीसांनी स्पष्ट केले.

 

देशातून दरसाल मुंबईतून ३८ अब्ज डॉलर्सचे हिरे आणि हिऱ्यांच्या दागिन्यांची निर्यात होते. ही निर्यात एकूण निर्यातीच्या ७५ टक्के आहे. उर्वरीत १२ टक्के सुरतमधून आणि ३.११ टक्के जयपूरमधून होते. पॉलिश हिऱ्यांच्या निर्यातीपैकी ९७ टक्के मुंबईतून आणि २ टक्के सुरतमधून होत होती. कोरोनाच्या काळात उद्धव ठाकरेनी भारत बोर्स आठ महिने बंद ठेवला. वारंवार विनंती करूनही आठ महिने कार्यालयं बंद ठेवली. त्याच काळात सुरतमध्ये व्यवसाय सुरू असल्यामुळे मुंबईतून होणारी निर्यात ९४ टक्क्यांवर आली. सुरतमधून होणारी निर्यात दोन वरून सात टक्क्यांवर गेली. ही सर्व आकडेवारी विधानसभेत देण्यात आलेली आहे. त्यामुळे ती चुकीची असण्याची किंचितही शक्यता नाही.

 

मुंबईत हिऱ्यांच्या निर्यातीचे काम होते. सुरतमध्ये पॉलिश आणि कटींग म्हणजे उत्पादनाचे काम होते. कोरोनाच्या काळात फक्त कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी भारत बोर्स उघडण्याची परवानगी सरकारकडे मागण्यात आली होती. परंतु ही परवानगी नाकारण्यात आली. आठ महिने तंगवल्यानंतर अखेर भारत बोर्स उघडण्यात आले. हे तेच उद्धव ठाकरे आहेत, ज्यांनी कोरोनाच्या काळात मंदिरांच्या आधी दारुची दुकाने उघडण्याची परवानगी दिली.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
149,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा