30 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
घरसंपादकीयराष्ट्रवादी काँग्रेसच्या दाऊद कनेक्शनचे आणखी किती पुरावे हवेत?

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दाऊद कनेक्शनचे आणखी किती पुरावे हवेत?

याकूब मेमन कबरप्रकरणातून वास्तव आले समोर

Google News Follow

Related

टायगर मेमन हा मुंबईत १९९३ मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट कटातील एक प्रमुख आरोपी. त्याचा भाऊ याकूबच्या कबरीवरून शिल्लक सेनेने भाजपाला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. परंतु हे प्रकरण बुमरॅंग होण्याची चिन्हं आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात दाऊद टोळी कशी मोकाट सुटली होती, यावर यानिमित्ताने पुन्हा एकदा प्रकाश पडला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पूर्णपणे दाऊदच्या कह्यात गेले होते आणि तथाकथित हिंदुत्ववादी उद्धव ठाकरे यासर्व प्रकाराकडे डोळ्यावर कातडे ओढून बसले होते, असा निष्कर्ष या प्रकरणातून समोर येतोय.

याकूबच्या कबरीवर करण्यात आलेल्या रोषणाईचा विषय माध्यमांनी उघड केल्यानंतर आमदार आदित्य ठाकरे यांनी भाजपावर निशाणा साधला. एका दहशतवाद्याचा मृतदेह राज्यात आणि केंद्रात सत्तेवर असलेल्या भाजपा सरकारने कुटुंबियांच्या ताब्यात दिला कसा? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. इथून याप्रकरणात तू तू मै मै सुरू झाली.

कबर प्रकरणाची पाळेमुळे २०२० मधील काही घटनांमध्ये आहेत. या काळात राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तारुढ होते. २२ ऑगस्ट २०२० मध्ये या प्रकरणातील लोकमान्य टिळक मार्ग पोलिस ठाण्याचे जलील नवरंगे आणि परवेज सरकारे या दोघांनी टायगर मेमनच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. हे दोघे जुम्मा मस्जिद ऑफ बॉम्बे ट्रस्टचे ट्रस्टी आहेत. मरीन लाईन्स येथील बडा कब्रस्तान याच ट्रस्टच्या अंतर्गत येते. येथेच याकूबचा मृतदेह पुरण्यात आला होता. कबरीची ही जागा मेमन कुटुंबियांच्या ताब्यात द्यावी असा तगादा या दोघांच्या मागे लावण्यात आला होता.

ए.आर.मेमन या इसमाने नवरंगे यांच्याशी संपर्क साधला. याकूबच्या कबरीची जागा मेमन कुटुंबियांना विकण्याची विनंती केली. परंतु ही बाब ट्रस्टच्या नियमात बसत नाही, असे स्पष्ट केल्यानंतरही मेमन यांनी हेका सोडला नाही. वारंवार फोन आणि मेसेज करून ट्रस्टींवर दबाव वाढवण्याचे काम तो करत राहिला. काही केल्या ट्रस्टी ऐकत नाहीत असे वाटल्यानंतर त्याने उघड उघड त्याना धमकावायला सुरूवात केली.

‘मी टायगर मेमनचा चुलत भाऊ आहे. बऱ्या बोलाने तुम्ही ऐकला नाहीत तर तो तुम्हाला कुठे गायब करेल कळणारही नाही. जर तुम्ही ऐकला नाहीत तर मी तुम्हाला ट्रस्टमध्ये बदनाम करेन’, अशी धमकी या इसमाने दिली. बोलल्याप्रमाणे या दोघांच्या विरोधात ट्रस्टमध्ये तक्रारही नोंदवली. हो दोघेही आपल्याकडे पैशाची मागणी करतायत असा दावा ए.आर.मेमन याने ट्रस्टकडे केला.

याप्रकारामुळे हादरलेल्या जलील नवरंगे आणि परवेज सरकारे यांनी पोलिस ठाण्यात २२ ऑगस्ट २०२० तक्रार दाखल केली.
वक्फ बोर्डाकडेही या संदर्भात एक तक्रार दाखल करून परवेज सरकारे यांनी ट्रस्टमधील काही लोक कब्रस्तानातील जमिनीच्या गैरव्यवहारात गुंतल्याचा आरोप केला होता. ६ जानेवारी २०२० रोजी ही तक्रार दाखल करण्यात आली होती.
वक्फ बोर्ड अल्पसंख्यांक मंत्रालयाच्या अंतर्गत येते. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्याकडे हे खाते होते. त्यांनी बडा कब्रस्तान प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या तक्रारीची दखल घेतली नाही.

हे ही वाचा:

बेस्ट सबस्टेशनला आग लागल्यानंतर रहिवाशांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

डोवाल याच कारणाने मुंबईत आले होते का ?

‘त्या’ कोसळलेल्या वीजेमुळे इमारतीतील फ्रीज, टीव्ही, कॉम्प्युटर झाले खराब

लालबागला गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये चोरांचा विळखा

 

लोकमान्य टिळक पोलिस ठाण्यात करण्यात आलेल्या तक्रारीवरही कोणतीही कारवाई झाली नाही. योगायोगाने गृहखातेही राष्ट्रवादी काँग्रेसच्याच अनिल देशमुख यांच्याकडे होते. मुंबईतील एका पोलिस ठाण्यात देशातील मोस्ट वॉण्टेड दहशतवाद्याच्या विरोधात तक्रार होते. या दहशतवाद्याचा चुलत भाऊ एका मशिदीच्या ट्रस्टीला धमक्या देतो, जबरदस्तीने त्याचे पाकिस्तानात दडी मारून बसलेल्या टायगरशी फोनवर बोलणे करून देतो, तरीही पोलिसांना याप्रकरणात कारवाई करण्याची ईच्छा होत नाहीत. गृहमंत्री या प्रकरणात लक्ष घालणे टाळतात.

याबाबी माफीया दाऊद इब्राहीमच्या टोळीशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या साटेलोट्यावर झळझळीत प्रकाश टाकणाऱ्या आहेत.
ज्या बडा कब्रस्तानमध्ये याकूबचे दफन झाले. त्याच कब्रस्तानमध्ये १९९३ च्या साखळी बॉम्बस्फोटात मृत्यू झालेल्या फैजल खत्री याचे दफन करण्यात आले होते. परंतु दोन वर्षात त्याला जिथे दफन केले होते, तो ओटा दुसऱ्या कबरीसाठी देण्यात आला. त्याचा भाऊ डॅनिअल न्यूज डंकाशी बोलताना म्हणाला, आम्ही १९९३ च्या बॉम्बस्फोटाचे बळी आहोत, पण माझ्या भावाला कबरीसाठी कायमस्वरुपी जागा मिळाली नाही, परंतु ज्याने ते स्फोट घडवले तो मात्र इथे सुखाने चिरनिद्रा घेतोय.

नवाब मलिक यांनी दाऊदची बहीण हसीना पारकर हिच्यासोबत कुर्ल्यातील जमिनीचा व्यवहार उघड झाला आहे. मलिक मंत्री असलेल्या वक्फ बोर्डाचा सदस्य मुदस्सीर लांबे याचे दाऊद टोळीशी असलेले संबंध समोर आणणारी एक ऑडियो क्लीप अलिकडेच व्हायरल झाली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल यांनी केंद्रातील युपीए सरकारमध्ये मंत्री असताना २००७ मध्ये इक्बाल मिर्ची उर्फ इक्बाल मेमन याची पत्नी हाजरा हीच्याकडून वरळीच्या सीजे हाऊसमधील मालमत्ता विकत घेतली होती. या सर्व घटना राष्ट्रवादी काँग्रेस आणि दाऊद टोळीचे किती घट्ट संबंध आहेत हे ओरडून ओरडून सांगतायत.

राष्ट्रवादी काँग्रसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे दाऊदशी संबंध आहेत, असा आरोप पालिकेचे बहुचर्चित निवृत्त उपायुक्त गो.रा.खैरनार यांनी केले होते. परंतु ते त्यांना सिद्ध करता आले नाहीत हे सत्य आहे. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची दाऊद टोळीशी असलेली कनेक्शन दिसत असूनही शरद पवार त्यांचे जोरदार समर्थन करत होते. मलिक, देशमुख, प्रफुल पटेल यापैकी एकाही नेत्यावर त्यांनी पक्ष पातळीवर कारवाई केली नाही, त्यांचा साधा निषेधही केला नाही. उलट ते किती निरपराध आहेत, असे सांगून शक्य तेवढे समर्थनच केले.

एक आंतराष्ट्रीय दहशतवादी आणि भारताचा मोस्ट वॉण्टेड गुन्हेगार असलेल्या दाऊद टोळीच्या कारवायांबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहमंत्री इतके उदासीन का होते? त्यांना दाऊद टोळीच्या विरोधात कारवाई न करण्याचे आदेश होते का? टायगर मेमन आणि दाऊदच्या विरोधीत कारवाई करण्याचे त्यांना भय वाटत होते का? हे स्पष्ट झाले पाहीजे.

शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये मुख्यमंत्री असलेले उद्धव ठाकरे यासर्व प्रकारांबाबत मूग गिळून बसले होते. त्यांची अडचण समजण्यासारखी आहे. एक तर ते अडीच वर्ष घरी बसून होते. शिवसेनाप्रमुखांची ईच्छा पूर्ण करण्यासाठी मिळवलेले मुख्यमंत्री पद टिकवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेससोबत जुळवून घेणे त्यांना भाग होते. मुस्लिम मतदार जोडण्यासाठी त्यांचेही जोरदार प्रयत्न सुरू असल्यामुळे टायगर मेमनशी पंगा घेणे त्यांनी टाळले असण्याची शक्यता आहे. जे उद्धव ठाकरे नवाब मलिक यांचा संपूर्ण व्यवहारसमोर आल्यानंतर, त्यांना ईडीने अटक केल्यानंतरही त्यांच्या मंत्रीपदाला हात लावू शकले नाहीत, ते टायगर मेमनच्या विरोधात काही कारवाई करतील ही अपेक्षाच चुकीची होती.

दाऊद पाकिस्तानात असला तरी त्याचे हस्तक, त्याचे पाठीराखे हिंदुस्तानात आहेत, एका राजकीय पक्षातील नेत्यांना मुठीत ठेवण्या इतपत ते शक्तीशालीही आहेत. माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यासोबत मेमनचा भाऊ रौफ याचे फोटो झळकल्यानंतर शिवसेने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबतही त्यांचा फोटो जारी केला आहे. मुळात कोणाचा कोणासोबत फोटो आहे, त्यापेक्षा कोणाचे कोणाशी संबंध आहेत हे महत्वाचे. मेमनने दिलेल्या धमकी प्रकरणाची चौकशी होणार अशी घोषणा उपमुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली आहे. दाऊदची पिलावळ पोसण्याचे काम महाविकास आघाडी सरकारच्या काळात झाले. ही पिलावळ साफ करण्याचे काम फडणवीस करतील अशी अपेक्षा आहे.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा