29 C
Mumbai
Thursday, May 9, 2024
घरसंपादकीयमहाराष्ट्रात ‘शांतता’ आणि ‘सलोखा’ हाच त्या बैठकीचा अजेंडा...

महाराष्ट्रात ‘शांतता’ आणि ‘सलोखा’ हाच त्या बैठकीचा अजेंडा…

कुठल्या तरी जातीचा उत्कर्ष कसा होईल त्यापेक्षा कुठल्या तरी जातीच्या विरोधात या तमाम संघटनांचे उपक्रम

Google News Follow

Related

खलिस्तानच्या नावाखाली देशात नव्या विभाजनाची मागणी करणाऱ्या जरनेलसिंह भिंद्रनवालेचा खात्मा होऊन आता सुमारे चार दशकांचा काळ लोटला. परंतु त्यांची पिलावळ अजून वळवळ करते आहे. भिंद्रनवाले याला मानणारे फुटीरवादी महाराष्ट्रात सुद्धा आहेत हे मात्र संतापजनक आहे. भिंद्रनवालेला डोक्यावर घेण्याची तयारी असलेल्या लोकांना शरद पवारांसारखे ज्येष्ठ नेते भेटतात, तेव्हा ते का भेटले असावेत? ही भेट केव्हा झाली असावी? त्यांनी काय चर्चा केली असावी? असा प्रश्न निर्माण होणे स्वाभाविक आहे.

 

 

अलिकडेच बामसेफचे (ऑल इंडीया बॅकवर्ड एण्ड मायनॉरीटी फेडरेशन) अमृतसर येथे ३४ वे अधिवेशन झाले. या अधिवेशनाच्या प्रचार-प्रसिद्धीसाठी लावण्यात येणाऱ्या बॅनरवर भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोसह खलिस्तानी दहशतवाद्यांचा मुकूटमणी भिंद्रनवाले याचाही फोटो झळकला. पंजाबचा तुकडा तोडून स्वतंत्र खलिस्तान निर्माण करण्याची भिंद्रनवाले याची मागणी होती. त्यासाठी त्याने केलेल्या हिंसाचाराच्या आगीत पंजाब सुमारे दशकभर होरपळत होता.

 

 

या अधिवेशनाच्या आधी शरद पवार यांचा एक फोटो व्हायरल झाला होता. या फोटोमध्ये शरद पवार बामसेफचे अध्यक्ष वामन मेश्राम, भारत मुक्ती मोर्चाचे सचिन बनसोडे, संभाजी ब्रिगेडचे प्रविण गायकवाड चर्चा करताना दिसतायत. हा फोटो नेमका कधीचा ही बाब मात्र उघड होत नाही. कारण बैठकीत सामील असलेल्या कोणीच या बैठकीबाबत सोशल मीडियावर चर्चा केली नाही. बैठकीचा अजेंडा सांगितला नाही.

 

 

बामसेफच्या अधिवेशनात झळकलेला बॅनर मात्र काल-परवाचा आहे. बॅनरवर भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबत भिंद्रनवालेला स्थान देण्यात आले. हा बॅनर म्हणजे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा उघड उघड अपमान आहे. वामन मेश्राम ब्राह्मणविरोधी आहेत, मनुवादाच्या नावाखाली ब्राह्मण विरोधाचा कंड ते शमवत असतात. त्यांची संघटना फक्त भिंद्रनवालेचे उदात्तीकरण करते अशातला भाग नाही. उत्तर प्रदेशमध्ये माफीया अतीक अहमदची हत्या झाली तेव्हा याच माणसाने ही अतीक अहमदची हत्या नसून संविधानाची हत्या आहे, असा गळा काढला होता. वडाची साल पिंपळाला चिटकवणे ही त्यांची विशेषता आहे. शरद पवारांवर मेश्राम यांचा विशेष स्नेह आहे.

हे ही वाचा:

सरकार येईल जाईल पण हा देश टिकला पाहिजे !

रामदेव बाबांकडून आर्थिक लाभ मिळविण्यासाठी अग्रलेख !

रोहित शर्मा म्हणाला, आशिया कप जिंकला, आता लक्ष विश्वचषकाकडे

पेट्रोल भाववाढीने खचलेल्या पाकिस्तानने काढला ‘इराणी’ पेट्रोल पंपांवर राग

 

माफिया आणि दहशतवाद्यांची भलामण करणाऱ्या मेश्राम यांनी ऑक्टोबर २०२२ मध्ये भटक्या विमुक्त जाती संघटनेच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्यात शरद पवार यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहण्याची घोषणा केली होती. मेश्राम यांचा बहुजन क्रांती मोर्चा हा पक्ष आहे. हा पक्ष शरद पवार यांच्या पक्षाशी आघाडी करणार, अशी शक्यता या कार्यक्रमानंतर निर्माण झाली होती. बहुधा आता ती वेळ आलेली आहे. कारण महाराष्ट्रासह देशभरात महत्वाच्या निवडणुका होणार आहेत. शरद पवारांना मेश्राम यांच्या बळाची गरज आहे.

 

 

मेश्राम यांच्यासोबत जे आणखी दोन सज्जन पवारांना भेटले त्यापैकी एक संभाजी ब्रिगेडचा प्रमुख आहे. ज्या संघटनेचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या तमाम नेत्यांशी घट्ट संबंध आहेत. दुसरा भारत मुक्ती मोर्चाचा ज्याचे संस्थापक मेश्राम हेच आहेत. या सगळ्या संघटनांमध्ये जाती हा समान धागा आहे. कुठल्या तरी जातीचा उत्कर्ष कसा होईल त्यापेक्षा कुठल्या तरी जातीच्या विरोधात या तमाम संघटनांचे उपक्रम असतात.

 

 

सध्या महाराष्ट्र जातीच्या मुद्द्यावरून तापवण्याचा प्रयत्न सुरू आहे. मराठा आऱक्षणाच्या मुद्यावर मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू होते. या मुद्यावर सरकारची सकारात्मक मानसिकता पाहून त्यांनी उपोषण मागे घेतले. आता धनगर आरक्षणाच्या मुद्दयावर आरक्षण सुरू आहे. यशवंत सेनेचे कार्यकर्ते चौंडीत उपोषण करतायत. काँग्रेसने महाराष्ट्रात कित्येक दशके राज्य केले. साखर सम्राट, शिक्षण सम्राट, सहकार सम्राट निर्माण केले. परंतु या तमाम सम्राटांनी आपले आणि आपल्या नातेवाईकांच्या पलिकडे कुणाचे भले केले नाही. गोरगरीब लोकांना रोजगार, कामधंदा मिळाला असता तर उपोषणाच्या मार्गाने जाऊन कोणी कशाला जीव पणाला लावला असता?

 

 

गेल्या काही महिन्यांचा घटनाक्रम पाहा. १२ सप्टेंबर, सातारा पुसेसावळी, सातारा १८ ऑगस्ट, १३ जून अहमदनगर, ११ जून कागल, १० जून कोल्हापूर, १ जून घोटी नाशिक, ९ जून आष्टी बीड, ८ जून वाशिम, ६ जून सामनापूर (हिंदूंच्या मो
र्चावर दगडफेक), ३ जून पिंपळनेर धुळे, १६ मे अमरावती, १४ मे अकोला, ३१ मार्च मालाड मालवणी (रामनवमी), ३० मार्च पाळधी-जळगाव दिंडीवर दगडफेक, २९ मार्च संभाजीनगर रामनवमी, १३ मार्च शेवगाव येथे धार्मिक तणाव निर्माण करण्याचा पद्धतशीरपणे प्रयत्न झाला.

 

 

या सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकून या दंगली पेटवण्याचा प्रय़त्न झाला. कधी छत्रपती संभाजी महाराज, कधी छत्रपती शिवरायांचा अवमान तर कधी औंरगजेबाची भलामण. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात धार्मिक तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. ठिकठिकाणी पोलिसांनी परीस्थिती सक्षमपणे हाताळण्याचा प्रयत्न केला. एका बाजूला धार्मिक तणाव निर्माण व्हावा म्हणून पद्धतशीरपणे प्रयत्न सुरू असताना. जाती जातीत तेढ निर्माण व्हावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मराठा विरुद्ध ब्राह्मण, मराठा विरुद्ध ओबीसी मैदानात उतरावे म्हणून जोरदार प्रयत्न सुरू आहेत.

 

 

राज्यात अशा प्रकारे वातावरण टप्प्या टप्प्याने तापवत न्यायचे आणि ठिणगी टाकायची असा प्रयत्न दिसतो. राज्यात अशाप्रकारची स्थिती असताना पवारांचा हा फोटो व्हायरल झाला. चार जणांची भेट झाली. आश्चर्य म्हणजे या भेटीबाबत फार वाच्यता होऊ नये म्हणून प्रयत्न झालेले दिसतात. कारण या भेटीत सहभागी असलेल्या कोणाच्याही सोशल मीडियावरून हा फोटो अपलोड करण्यात आला नव्हता.

 

 

वामन मेश्राम यांची संघटना भिंद्रनवाले याला डोक्यावर घ्यायला तयार असली तरी पवार मात्र याबाबतीत त्यांच्याशी सहमत असतील असे नाही. नसतील असेही नाही. पवारांचे धोरण प्रत्येक बाबतीत तळ्यात मळ्यातले असते. अन्यायाला विरोध करणे म्हणजे नक्षलवाद नाही, असे म्हणत नक्षलवाद्यांचा समाचार घ्यायचा आणि सरकारच्याविरोधात घृणा निर्माण करण्याच्या कृतीला शहरी नक्षलवाद म्हणता येईल असेही म्हणायचे. नक्षलवादी स्टेन स्वामी याचा जेव्हा तुरुंगात मृत्यू होतो तेव्हा हळहळ व्यक्त करायची आणि सरकारवर अमानवी व्यवहाराचे खापर फोडायचे ही शरद पवारांची नीती आहे.

 

 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून शरद पवार महाराष्ट्रात जातीय सलोखा निर्माण करण्यासाठी प्रचंड मेहनत घेत आहेत. येत्या काही महिन्यांचा काळ हा निवडणुकांचा काळ आहे. या काळात महाराष्ट्रात दंगली पेटू नयेत म्हणून ते विशेष काळजी घेत असणार हे उघडच आहे. दंगली कशा टाळाव्यात याबाबत पवार सर्व संबंधितांना सूचना देत असणार हे निश्चित, पवार दक्ष असले तरी जनतेने बारीक लक्ष ठेवणेही गरजेचे आहे. कारण महाराष्ट्रात शांतता नांदणे आवश्यक आहे.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
151,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा