‘राजकारणात धर्म आणू नका’, असा सल्ला आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला आहे. ते स्वत: मे महीन्यात कुटुंबियांसोबत अयोध्येला जाऊन आले होते. मुख्यमंत्र्यांचा दौराही कौटुंबिक हवा, असे पवार आडून आडून सुचवतायत. पवार घराण्याच्या राजकारणाची मूळं काँग्रेसमध्ये आहेत. शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नावाने वेगळं दुकान थाटलं असलं तरी त्यांची विचारधारा आणि वारसा काँग्रेसचाच आहे. हा वारसा ते अभिमानाने मिरवत असतात.
काँग्रेसची विचारधारा हिंदुत्वाला नाकारणारी आहे, किंबहुना हिंदुत्वाशी उभा दावा सांगणारी आहे. ही अशी विचारधारा आहे कि ज्यांना भारताचा इतिहास म्हटलं की मुघल काळ आठवतो, तीर्थक्षेत्र म्हटलं की अजमेरचा दर्गा आठवतो. सण म्हटलं की इफ्तार पार्ट्या आठवतात. बाबरी मशिदीसाठी लढणे आणि राम मंदिराला प्रत्यक्ष वा छुपा विरोध करणे ही इथे धर्मनिरपेक्षता असते. परंतु असे राजकारण करण्याचे दिवस आता संपले आहेत. याची जाणीव रोहित पवारांना आहे. त्यामुळे ते मे २०२२ मध्ये अयोध्येला गेले. तिथे जाताना हा आपला कौटुंबिक दौरा असून धर्म हा वैयक्तिक मामला आहे, असे सांगायला ते विसरले नाहीत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता नोव्हेंबरमध्ये अयोध्येला जात आहेत. या दौऱ्याचे राजकारण नको असा सल्ला रोहित पवार यांनी दिला आहे.
रोहित पवार यांचा राजकारणातील अनुभव जेमतेम आहे, परंतु त्यांच्या वयापेक्षा जास्त अनुभव असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ते सल्ला देऊ शकतात, तर मुख्यमंत्री महोदयांना सल्ला देणे त्यांच्यासाठी खूप सोपी आणि क्षुल्लक बाब आहे. रोहित पवार जेव्हा अयोध्येला गेले होते, तेव्हा आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याची घोषणा झाली होती. आदित्य ठाकरे तेव्हा राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये पर्यावरण मंत्री होते. हिंदुत्व सोडले नसल्याचे जगाला दाखवण्यासाठी आदित्य यांनी या दौऱ्याचा प्रचंड गाजावाजा केला. तेव्हा सोबत संजय राऊतही होते. आदित्य यांनीही मी रामाच्या दर्शनासाठी आलो आहे, हा आस्थेचा विषय आहे. इथे राजकारणावर चर्चा नको अशीच भूमिका घेतली होती. तेही आपल्या कुटुंबासोबत म्हणजे आई-बाबा आणि भावासोबत दौऱ्यावर गेले नव्हते. तरीही अयोध्या दौऱ्यापूर्वी किंवा नंतर या दौऱ्याचे राजकारण नको असा सल्ला रोहित पवार यांनी आदित्य यांना दिल्याचे ऐकीवात नाही. बहुधा ते विसरले असतील.
अयोध्या हा हिंदुत्वाचा परमोच्च बिंदू बनला आहे. त्यामुळे हिंदुत्ववादी इथे येणारच, हिंदुत्ववादी असल्याचा दावा करणारेही इथे येणार. आम्ही हिंदूविरोधी नाही असे ज्यांना ठसवायचे आहे तेही इथे येणार. परंतु आता ते मुख्यमंत्र्यांना सल्ला देऊन मोकळे झाले आहेत. भारतात धर्म आणि राजकारण कधीच वेगळे नव्हते. काँग्रेसच्या काळातही एखाद्या प्रकल्पाचे उद्घाटन मुहूर्त पाहून, नारळ वाढवूनच केला जात होता. आषाढीच्या दिवशी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय पूजा काँग्रेसच्या काळापासून सुरू आहे. परंतु हे सर्व ठाऊक असताना रोहित पवारांनी मानभावीपणा केला आहे.
धर्म आणि आस्था ही वैयक्तिक बाब असेल तर स्वगृही आणि बारामती एग्रोमध्ये केलेल्या लक्ष्मी पूजनाचे आणि मंदिरात दर्शनाचे फोटो समाज माध्यमांवर टाकायची गरज का भासते?
हे ही वाचा:
अवघ्या तीन रुपयांसाठी महिलेची केली हत्या
पय्याडे स्पोर्ट्स क्लब आणि वेंगसरकर अकादमीची दमदार कामगिरी
एकाच वेळी एकाच हाताने ‘तिने’ काढली १५ महापुरुषांची चित्रं, आनंद महिंद्रांनी केले कौतुक
संरक्षण मंत्र्यांचा पाकव्याप्त काश्मीरबाबत पुन्हा एकदा अल्टिमेटम
रोहित पवार हे कौटुंबिक दौऱ्यावर अयोध्येला जातात, परंतु तरीही त्याची बातमी होते, पत्रकारांना बाईटही दिले जातात. आस्था हा व्यक्तिगत विषय आणि अयोध्या दौरा हा कौटुंबिक असेल तर त्याचा बोभाटा का होतो? रोहित पवार कुटुंबासह परदेश दौऱ्यावर जातात, तेव्हा त्याचा बोभाटा होतो का?
राज्यात जेव्हा शिंदे – फडणवीस सरकार सत्तेवर आले होते. तेव्हा हे हिंदुत्ववादी सरकार आहे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी उच्चारवात सांगितले होते. हिंदुत्ववादी मुख्यमंत्र्याला जय श्रीरामच्या गजरात वाजतगाजत अयोध्येला जाण्याचा पूर्णपणे नैतिक अधिकार आहे. राम मंदिराच्या नावाने ज्यांनी बोटं मोडली त्यांनी हवे तर लोकांच्या नकळत गपचूप जाऊन यावे.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)