30 C
Mumbai
Monday, May 6, 2024
घरसंपादकीयआता एसआयटीची गरज काय?

आता एसआयटीची गरज काय?

Google News Follow

Related

अल्पसंख्यकांचे राजकारण करण्यासाठी शरद पवारांनी कायम हिंदुत्वाला विरोध केला. परंतु फक्त एवढेच कारण नाही. हिंदुत्वाची भावना जेव्हा जेव्हा प्रबळ झाली, तेव्हा जातीच्या राजकारणाचा बाजार उठला. जातीच्या समीकरणातून सत्तेच्या राजकारणापर्यंत पोहोचणाऱ्यांसाठी हिंदुत्व हा कायम अडथळा होता. आयुष्यभर पुरोगामी म्हणून वावरलेले आणि कायम जातीचे राजकारण करणारे शरद पवार कारकीर्दीच्या अखेरच्या टप्प्यावर पोहोचले आहेत. याच वळणावर त्यांचा नातू रोहीत पवार यांच्यामुळे कर्तृत्वामुळे थोरल्या पवारांच्या राजकारणाचा हिडीस चेहरा लोकांसमोर आलेला आहे.

भाजपा नेते आणि विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गाडण्याची भाषा करणारा व्हीडीयो एका यूट्युब चॅनेलवर आला. तो पवार गटाच्या योगेश सावंत नावाच्या पदाधिकाऱ्याने व्हायरल केला. शिवसेनेच्या युवा सेनेचा पदाधिकारी अक्षय पनवेलकर याने सांताक्रुझ पोलिस ठाण्यात याप्रकरणी तक्रार केल्यानंतर योगेश सावंतला अटक केली. त्याच्यावर कारवाई केली जाऊ नये म्हणून रोहीत पवारांनी त्याच्यासाठी पोलिसांना फोन केला. त्याने फक्त व्हीडीयो व्हायरल केला आहे, अशी मखलाशी करण्यात आली. फ़ॉर्वर्ड करण्याचे पाप केल्याबद्दल जितेंद्र आव्हाडांनी आपल्या गुंडांसह अनंत करमुसे यांची पिटाई केली होती. केतकी चितळेला तुरुंगात डांबण्यात आले होते. तिच्या चेहऱ्यावर शाईफेक करण्यात आली होती.

 

अशा प्रकारच्या पोस्ट शेअर करणाऱ्यांची पाठराखण रोहित पवार यांनी पहिल्यांदा केलेली नाही. ब्राह्मणांच्या विरोधात सतत गरळ ओकणाऱ्यांचे त्यांनी यापूर्वीही जाहीर समर्थन केलेले आहे. हा विद्वेष त्यांच्या डीएनएमध्ये आहे. रोहित पवार ज्यांचे समर्थन करतात ते देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात अर्वाच्च गरळ ओकत असतात. ब्राह्मणांना लाखोली वाहात असतात. रोहित पवार जातीय विद्वेषाची शरद पवारांची परंपरा पुढे नेत आहेत.

जे जे शरद पवारांना आव्हान देतात त्यांच्या विरोधात जातीचे हे शस्त्र शरद पवारांनी वापरलेले आहे. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत सुरेश धस विरुद्ध गोपिनाथ मुंडे असा सामना झाला होता. धस मराठा समाजाचे होते, मुंडे वंजारी समाजाचे. बीडमध्ये मराठा विरुद्ध वंजारी अशी सूक्ष्म तेढ होतीच. ती अधिक मोठी करून मुंडेना मात देण्याची शरद पवारांची योजना होती. वाजवा तुतारी, हटवा वंजारी ही घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसने या निवडणुकीत घाऊक प्रमाणात वापरली. मुंडे यांनी ही निवडणूक जिंकली. परंतु त्यांना पूर्ण ताकद लावावी लागली. हा पवारांचा इतिहास आहे. जेव्हा देवेंद्र फडणवीस जड जातायत तेव्हा त्यांचीही जात काढण्यात आली. कधी पेशवे, कधी पुणेरी पगडी असे सांकेतिक शब्द वापरण्यात आले. याच काळात समर्थ रामदास, राम गणेश गडकरी, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन ब्राह्मणांवर शरसंधान करण्यात आले होते.

जातीच्या राजकारणाचा प्रछन्नपणे वापर करणारे पवार हिंदुत्वाच्या नावाने कायम बोटं मोडताना दिसतात. कारण मराठा समाजात पवारांच्या ब्रिगेडी मानसिकतेचे लोक मूठभर आहेत. बहुसंख्य हिंदुत्व मानणारे आहेत. औरंगजेबाची आणि अफजल खानाची भलामण करणाऱ्या पवारांचे तत्वज्ञान हे मराठे नाकारतात. अनाजी पंत आणि कृष्णाजी भास्कर कुलकर्णी हे खलनायक ब्राह्मणांमध्ये जसे होते तसे बाजी घोरपडे सारखे भोसल्यांच्या जीवावर उठणारे मराठेही होते. धर्मवीर संभाजी महाराजांशी गद्दारी करणारा, त्यांची खबर औरंगजेबाला देणारा कोण होता, हे मराठा समाजाला माहिती आहे. तांदळात एखादा दगड आल तर तांदुळ फेकून द्यायचा नसतो. दगड फेकून द्यायचा असतो. कृष्णाजी कुलकर्णी, अनाजी आणि बाजी घोरपेड हे दगड होते.

रोहित पवारांनी योगेश सावंतची पाठराखण केली. शरद पवार किंवा सुप्रिया सुळे यांनी याप्रकरणी मौन बाळगलेले आहे. याला राजकारणाच्या भाषेत मूक संमती म्हणतात. मराठा आंदोलनाचे कर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची एसआयटी मार्फत चौकशी करण्याची घोषणा महायुती सरकारने केलेली आहे. त्यांचेही बरेच तपशील बाहेर आलेले आहेत. आंदोलनकर्त्यांचे खाण्यापिण्याचे बिल ८७ लाख रुपये झाल्याचे वृत्त जय महाराष्ट्र या वृत्त वाहिनीने दिले आहेत. जेसीबीच्या बिलाचे आकडेही लवकरच बाहेर येतील. जरांगेंची भाषा आणि योगेश सावंतने फॉर्वर्ड केलेल्या व्हीडिओची भाषा सारखीच असणे हा काही योगायोग नाही. जरांगे यांच्या आंदोलनादरम्यान अनेक नेत्यांनी त्यांची भेट घेतली, परंतु त्यांच्या कानात सांगणारे शरद पवार एकमेव. ज्यांच्या ऊर्जेबद्दल जरांगेनी कौतुक केले, असे शरद पवार हे एकमेव नेते. मांजर डोळे बंद करून दूध पित असली तरी जनतेने डोळे बंद केलेले नाहीत.

हे ही वाचा:

मुंबईत पोलीस निरीक्षकाविरोधात बलात्काराचा गुन्हा

“संजय राऊतांनी रोखल्यामुळेच उद्धव ठाकरे २०२१ मध्ये भाजपासोबत गेले नाहीत”

इस्रोच्या लाँचपॅडवरील ‘चिनी ध्वजा’ च्या मुद्यावरून स्टॅलिन यांना चिनी भाषेत शुभेच्छा!

संदेशखळी परिसरात मोठ्या प्रमाणावर जमिनी बळकावल्या

ब्राह्मणामुळे तुमचे नुकसान झाले आहे, असे जरांगे आणि शरद पवारांचे समर्थक एका सुरात बोलतात. वस्तुस्थिती वेगळी आहे. नामदेव जाधवांसारखा मराठा समाजातील अभ्यासू माणूस जेव्हा ही वस्तूस्थिती मांडण्याचा प्रयत्न करतो, मराठा आऱक्षणाचे खलनायक हे शरद पवारच आहेत हे सत्य लोकांसमोर मांडतो तेव्हा पवारांचे गुंड त्यांचे तोंड काळे करण्याचा प्रयत्न करतात. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून शरद पवार केवळ जातीय विद्वेषाची तुतारी फुंकत आहेत. कधी ही तुतारी बंजारा समाजाच्या विरोधात असते तर कधी ब्राह्मणांच्या विरोधात. उच्चवर्णीय, मनुवादी म्हणून ब्राह्मणांना मोडीत काढण्याचे धंदे तुम्ही करता, त्यात वेळी ओबीसींमध्ये मोडणाऱ्या बंजारा समाजालाही लक्ष्य करता. म्हणजे जे काही करता ते फक्त आपली पोळी भाजण्यासाठी.

बरं हे धंदे करून त्यांना मराठा समाजाचे भले करायचे आहे, असेही काही नाही. मराठा आरक्षणाच्या बाबत पवारांची भूमिका जगजाहीर आहे. मराठा आरक्षण कायद्याच्या चौकटीत बसत नाही, असे त्यांनी जाहीरपणे सांगितलेले आहे. चौकटीत बसणारी कामे करून त्यांनी मराठा समाजाचे काही भले केले असेही नाही. ते केले देवेंद्र फडणवीसांनी, मग ते अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ असो किंवा सारथी सारखी योजना. मग शरद पवार हा जातीचा वणवा कशाला पेटवतात. याचे उत्तर सोपे आहे. माझे कुटुंब माझी जबाबदारी ही फक्त ठाकरेंची घोषणा नाही, ती पवारांचीही आहे. ते आणि सुप्रिया सुळे यांच्या राजकीय पोळ्या सुखेनैव भाजपा याव्यात आणि जातीच्या नावावर अवघा महाराष्ट्र झुंजत राहावा ही त्यांची सदिच्छा आहे. सुशील कुलकर्णी यांचा एनलायझर न्यूज या यूट्यूब चॅनल हॅक करण्यामागे हीच प्रेऱणा असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

रोहित पवारांचे बिंग फुटले म्हणजे शरद पवारांचे बिंग फुटले आहे. तेही पुराव्यानिशी. अजित पवार शरद पवारांपासून बाजूला गेले त्याचे कारण पवारांचे जातवादी राजकारण असू शकते. अजित पवारांच्या तोंडून जातीय द्वेषाचे शब्द महाराष्ट्राने कधी ऐकलेला नाही. कारकीर्दीच्या अखेरच्या टप्प्यावर महाराष्ट्राचे आशीर्वाद घ्यायचे सोडून शरद पवार छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, श्रीमंत बाजीराव पेशवे, स्वातंत्र्यवीर सावरकर, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, ज्योतिबा फुले यांच्या पवित्रभूमीला द्वेषाच्या वणव्यात पेटवण्याचे धंदे करतायत. जरांगेंची चौकशी करण्यासाठी स्थापन केलेल्या एसआयटीतून जे समोर येणार होते ते आता रोहित पवारांनी स्वकर्तृत्वामुळे पुढे आलेले आहे. सिनेमाच्या मध्यंतरालाच खलनायक कोण याचा उलगडा झालेला आहे.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
150,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा