28 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
घरसंपादकीयबेटकुळ्या दाखवणाऱ्यांना महायुतीचे नेते वेसण घालतील काय?

बेटकुळ्या दाखवणाऱ्यांना महायुतीचे नेते वेसण घालतील काय?

Google News Follow

Related

देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा शपथ घेतली. काल मोदी- ३.O च्या दमदार वाटचालीची सुरूवात झाली. मोदींना सत्तेवरून हटवण्यासाठी विरोधकांनी सर्व प्रकारची आयुधं वापरून सुद्धा मोदी सत्तेवर आले ही बाब समाधानकारक आहे. परंतु, महाराष्ट्रातील दारुण पराभव नजरेआड कसा करता येईल? महायुतीतील भाजपाच्या मित्र पक्षांकडून सुरू असलेली विधाने पाहिली तर त्यांनी या पराभवापासून काही धडा घेतलेला दिसत नाही. काही नेते विधानसभेआधी बेटकुळ्या दाखवत शड्डू ठोकू लागले आहेत.

राज्यात महायुतीचे सरकार चालवणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खंबीरपणे नरेंद्र मोदी यांचे समर्थन करतात. देशासाठी मोदी सत्तेवर असणे गरजेचे आहे, असे वारंवार सांगतात. रालोआच्या बैठकीत त्यांनी छोटेखानी भाषणात सुंदर कविता सादर करून पुन्हा एकदा मोदींचा गौरव केला. अजित पवार यांची भूमिकाही नेहमीच मोदींच्या समर्थनाची असते, संयमी असते. महायुतीत कोणताही गोंधळ निर्माण होईल अशी विधाने हे दोघेही नेते करत नाहीत. देवेंद्र फडणवीस यांनीही भाजपा आमदारांसमोर केलेल्या भाषणात पराभवाची जबाबदारी स्वीकारली. मित्र पक्षावर खापर फोडण्याचे धंदे केले नाहीत. या तीनही नेत्यांत असलेले सामंजस्य खाली मात्र झिरपलेले दिसत नाही. परंतु, चाय से किटली गरम… असा अनुभव महाराष्ट्रातील जनता घेते आहे. अनेक नेते नसलेल्या बेटकुळ्या काढून दाखवतायत. कार्यकर्त्यांमध्ये अनावश्यक संभ्रम निर्माण करतायत.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पाच पैकी रायगडची एकमेव जागा जिंकता आली, तरी सुद्धा विधानसभा निवडणुकीत ८० जागा मिळाव्यात अशी अपेक्षा मंत्री अनिल पाटील यांनी व्यक्त केलेली आहे. शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी शिवसेनेला कॅबिनेट मंत्रीपद का नाही ? असा सवाल विचारलेला आहे. चिराग पासवान यांच्या लोकजन शक्ती पार्टीचे पाच खासदार असून त्यांना एक कॅबिनेट मंत्रीपद मिळते मात्र शिवसेनेचे सात खासदार असून त्यांना एक राज्यमंत्री पद का? असा प्रश्न त्यांना पडलेला आहे.

कालच्या शपथग्रहण सोहळ्याआधी राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यमंत्री पद नाकारलेले आहे. भविष्यात आम्हाला कॅबिनेट मंत्री पद मिळेल असा विश्वासही व्यक्त केलेला आहे. भविष्यात काय होईल, हे कुणाला ठाऊक. परंतु, सत्तेत अधिक वाटा हवा असेल तर निवडणुकीत परफॉर्मन्स दाखवायला हवा, तुमच्याकडे आकडा हवा. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ही बाब लक्षात घेणार आहेत का?

महाराष्ट्रात शिवसेनेकडे ४० आमदार असताना त्यांना मुख्यमंत्री पद का असा प्रश्न त्यांना का पडत नाही? ठाणे लोकसभा मतदार संघात भाजपाचे नवी मुंबईत संजीव नाईक, बेलापूरमध्ये मंदा म्हात्रे, ठाण्यात संजय केळकर, भायंदरमध्ये भाजपाच्या अपक्ष गीता जैन, यांची ताकद असताना नरेश म्हस्के यांनी तिकीट का मिळाले? असा प्रश्न त्यांना पडत नाही. महायुतीच्या सुदैवाने हा प्रश्न भाजपाच्या आमदारांनाही पडला नाही.

म्हस्के यांना तिकीट मिळाल्यानंतर भाजपा नेते गणेश नाईक यांनी नाराज असलेल्या नगरसेवकांची समजूत काढली. त्यांना म्हस्के यांच्या विरोधात जाणारे कोणतेही पाऊल उचलण्यापासून रोखले. गणेश नाईक स्वतः ताकदीने मैदानात उतरले, त्यांचा फायदा फक्त ठाण्यात नाही तर कल्याण डोंबिवलीमध्ये श्रीकांत शिंदे यांनाही झाला. कारण या दोन्ही मतदार संघात आगरी समाजाचा टक्का मोठा आहे. गणेश नाईक फॅक्टर इथे प्रभावी ठरला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जमीनीवर असलेले हे वास्तव ठाऊक आहे. त्यामुळे ते निवडणुकीच्या काळात स्वतः गणेश नाईकांच्या नियमित संपर्कात होते. मावळमधून विजयी झालेल्या श्रीरंग बारणे यांच्या विजयात पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, चिंचवडच्या आमदार अश्विनी जगताप या दोघांच्या मतदार संघातून ते तरले. ठाकरे गटाचे उमेदवार संजोग वाघेरे यांनी घेतलेली आघाडी याच दोन मतदार संघातून मोडून काढता आली.

हे ही वाचा:

भारत- पाक सामन्यात रोहित शर्माने भारतीय संघाचे वाढवले मनोधैर्य

ही तर काँग्रेसची लाचखोरीची गॅरंटी?

राष्ट्रपती भवनात शपथविधीला पोहचला बिबट्या? व्हिडिओ व्हायरल!

‘ठाणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन अथलेटिक्स’च्या खेळाडूंची दमदार कामगिरी!

उत्तर पश्चिम मुंबईत शिवसेनेचे उमेदवार रवींद्र वायकर यांचा विजयही मावळते खासदार गजानन किर्तिकर यांच्यामुळे झालेला नाही. निवडणुकीच्या काळात किर्तिकर केवळ संभ्रम निर्माण करणारी विधाने करत होते. ठाकरे गटाचे उमेदवार असलेल्या चिरंजीवांबद्दल सहानुभूती व्यक्त करत होते. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत मिशांना पिळ देण्यापेक्षा निवडणुकीची आकडेवारी लक्षात घेऊन काम करणे गरजेचे आहे.

अफवांचा धुरळा उठवून मुस्लीम, मराठा आणि दलित हे समीकरण बनवण्यात शरद पवारांना लोकसभा निवडणुकीत यश आले. विधानसभा निवडणुकीपर्यंत ते अधिक मजबूत करण्याचे प्रयत्न पवार करणार. हे समीकरण मोडीत काढण्याचे काम महायुतीला करावे लागणार आहे. त्यामुळे बीडचे खासदार बजरंग सोनावणे, धुळ्याच्या खासदार शोभा बच्छाव, संजय जाधव दर्ग्यावर चादरी चढवून, मुल्ला मौलवींचे पाय धरून आभार व्यक्त करतायत. मुस्लीमांमुळे जिंकलो असे अभिमानाने सांगतायत. अशावेळी जातीभेदाच्या भिंती तोडण्याची ताकद फक्त हिंदुत्वात आहे. जातीच्या भिंती तोडून हिंदू समाजाला एकवटण्याचे काम महायुतीला करावे लागणार आहे. ते न करता एकमेकांवर कुरघोड्या करण्याचे धंदे बारणे यांच्यासारख्या नेत्यांना बंद करावे लागणार आहेत. लोकसभा निवडणुकीत भाजपाला खिंडीत गाठण्याचा प्रयत्न झाला. त्याचे परिणामही समोर आहेत. त्याची पुनरावृत्ती न करता विधानसभेच्या निवडणुकांना एकदिलाने आणि ताकदीने सामोरे जातील अशी आशा हिंदू मतदार बाळगून आहे.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
167,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा