30 C
Mumbai
Wednesday, April 24, 2024
घरसंपादकीयराज म्हणतात, जपून रहा उद्धव म्हणतात बदला घेणार!

राज म्हणतात, जपून रहा उद्धव म्हणतात बदला घेणार!

Google News Follow

Related

लोकमतने आयोजित केलेल्या सोहळ्यात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुलाखत झाली. भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काय सल्ला द्याल? असा सवाल जेव्हा त्यांना विचारला, तेव्हा जपून राहा, असा सल्ला राज यांनी दिला. तो का दिलाय हे आज शिउबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे भाषण ऐकल्यावर स्पष्ट झाले. पाठीत खंजीर खुपसला त्यांचा सूड घेणार, बदला घेणार असे उद्धव ठाकरे म्हणालेत. सूडाने पेटलेला विरोधी व्यक्ती समोर असल्यामुळे एकनाथ शिंदे यांना खरोखरच जपून राहण्याची गरज आहे.

मुख्यमंत्रीपदी असताना उद्धव ठाकरे हे विचारी आणि सुसंस्कृत असल्याच्या आरत्या मीडियातील अनेकजण ओवाळत होते. प्रत्यक्षात त्यांचा कारभार हा अत्यंत अहंकारी आणि सूडबुद्धीने करण्यात येत होता. अर्णब गोस्वामी, कंगणा राणावत, डॉ.स्वप्ना पाटकर अशी अनेक उदाहरणे देता येतील. आता विचारी आणि सुसंस्कृत असल्याचा मुखवटा पुन्हा सत्ता मिळवून देऊ शकत नाही, याची उपरती झाल्यामुळे ते आता सूडाने पेटलेल्या चेहऱ्याने लोकांना सामोरे जातायत.

काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते, आपल्यासोबत दगाफटका करण्यात आला होता, सरकार पाडून त्याचा बदला घेतला. ठाकरे सरकार उलथवणारे देवेंद्र फडणवीस आहेत हे ठाकरे पिता-पुत्रांना चांगल्याप्रकारे ठाऊक आहे. परंतु त्यांना खुन्नस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जास्त आहे.

आदित्य ठाकरे यांनी २२ फेब्रुवारीला एक विधान केले आहे. देवेंद्र फडणवीसांबाबत आमच्या मनात कटुता नाही. आज उद्धव ठाकरेंचे विधान आहे. ज्यांची जोडे पुसण्याची लायकी नाही, ते राज्य चालवतायत. उद्धव यांनी ज्या प्रकारची शेलकी भाषा वापरली आहे, ती त्यांच्या सूडबुद्धी व्यक्तिमत्वाला साजेशी आहे. ती कोणासाठी वापरली आहे, हे उघड गुपित आहे. उद्धव यांच्या शिंदेंवर असलेला राग लपून राहिलेला नाही.

एकनाथ शिंदे यांच्याविरोधात जोरदार वातावरण निर्मिती करण्याचे प्रयत्न फक्त ठाकरे पिता-पुत्रांकडूनच नाही तर मविआच्या सगळ्या नेत्यांकडून सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे ताजे विधान वानगीदाखल घ्या. राज्यात भाकरी परतण्याची वेळ आली आहे, असे पवार म्हणाले. ही रणनीती साधी, सरळ, परंतु अत्यंत परिणामकारक आहे. राज्यात शिवसेना-भाजपाची सत्ता आहे. या सरकारकडे बहुमताचा आकडा आहे. हे सरकार उलथवायचे असेल तर दोन भागीदारांपैकी एकाच्या मनात संशय निर्माण करणे गरजेचे आहे.

देवेंद्र फडणवीस हे अत्यंत धूर्त आहेत, त्यामुळे त्यांना बिथरवणे कठीण, त्यामुळे विरोधकांनी शिंदेंकडे मोर्चा वळवला आहे. ते साताऱ्याला त्यांच्या गावी गेले तेव्हा, त्यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत लोकांच्या मनात प्रश्नचिन्ह निर्माण होईल, असे ट्वीट करण्यात आले. काही विधाने करण्यात आली. अजित पवार हा भाजपाचा प्लान बी आहे, एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांना सर्वोच्च न्यायालयाने अपात्र ठरवले तर अजित पवारांना भाजपा मुख्यमंत्री बनवणार, अशा बातम्या पेरल्या जातायत. देवेंद्र फडणवीस हा गेम प्लान पूर्णपणे ओळखून आहेत. म्हणून त्यांनी स्पष्ट केले आहे की २०२४ ची निवडणूक एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालीच आम्ही लढवणार आहोत.

हे ही वाचा:

२०१९ला जोडे पुसायला कोण गेले होते?

माहूरगडावर रेणुकामातेच्या दर्शनाला जा आता लिफ्टने!

मुंबई क्रिकेट क्लब, अवर्स यांच्यात अंतिम झुंज

देशभरात १५७ नवीन नर्सिंग महाविद्यालये होणार सुरू

फडणवीसांचे विधान एकनाथ शिंदे यांच्या भोवती निर्माण करण्यात आलेले संशयाचे ढग दूर करण्यासाठीच आहे. उद्धव ठाकरे आता उघडपणे सूडाची भाषा करतायत, याचा अर्थ आता हातघाईची लढाई सुरू झालेली आहे. एकनाथ शिंदे यांचे सरकार अत्यंत विकृत आणि दहशतवादी आहे. बारसूमधले आंदोलक हटले नाहीत तर त्यांच्यावर गोळ्या चालवल्या जातील. जालियनवाला बाग हत्याकांडाप्रमाणे बारसू हत्यांकांड होईल. हे संजय राऊत यांचे विधान आहे. म्हणजे राज्यात वातावरण पेटवण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले जात आहेत. बारसूमध्ये किंवा अन्य ठिकाणी एखादे कांड घडावे यासाठी शिउबाठाचे नेते देव पाण्यात घालून बसले आहेत.   सूड घेण्याची ठाकरेंची भाषा दुर्लक्ष करण्याजोगी निश्चितपणे नाही. राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांनी दिलेला इशाऱ्याची पार्श्वभूमी ही असू शकते.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा