भारताला इंधनाच्या बाबत स्वयंपूर्णतेकडे एक पाऊल नेणाऱ्या पश्चिम बंगालमधील अशोकनगर विभागातील तेल आणि वायू साठ्यांचे राष्ट्रार्पण- पेट्रोलियम, नैसर्गिक वायू आणि स्टील मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केले. धर्मेंद्र प्रधान यांनी ‘सकर रॉड पंप’ (एसआरपी) चालू करून उत्पादनाला औपचारिक प्रारंभ केला.
भारतात शोधल्या गेलेल्या आठपैकी सात खोऱ्यांत उत्पादन चालू आहे. भारतातील उपलब्ध तेल आणि वायू साठ्यांपैकी ८३ टक्के साठे ‘ओएनजीसी’च्या अखत्यारीत येतात. ओएनजीसी ही भारतातील सर्वात मोठी इंधन उत्पादक कंपनी आहे.
अशोकनगर येथील तेल आणि वायू साठे हे भारताच्या उर्जा सुरक्षेच्या दृष्टीने आणि नरेंद्र मोदी यांच्या इंधनाच्या आयातीवरील अवलंबित्व कमी करण्याचे लक्ष्य गाठण्यासाठी महत्त्वाचे ठरतील, असे याप्रसंगी बोलताना श्री. धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितले.
बंगाल खोऱ्यातील साठे १.२२ लक्ष वर्ग किलोमीटर परिसरात पसरले असून त्यापैकी दोन तृतीयांश बंगालच्या उपसागरात आहे. हे साठे शोधण्यासाठी ओएनजीसीने ₹३,३६१ कोटींचा गुंतवणूक यापूर्वीच केली असून पुढील दोन वर्षे अजून ₹४२५ कोटी संशोधन कार्यासाठी गुंतवणार आहे. अशोकनगरच्या तेलसाठ्यांच्या उपलब्धतेमुळे ओएनजीसीच्या प्रदीर्घ कष्टांना यश आले आहे. या विहीरींचा तपासणी करण्यासाठी काढलेले पहिले उत्पादन दिनांक ५ नोव्हेंबर २०२० रोजी हल्दीया येथील तेल शुध्दीकरण कारखान्यात रवाना झाले होते.