ऑपरेशन सिंदूरच्या पहिल्या वर्षपूर्तीनिमित्त भारतीय लष्करी नेतृत्वाने इस्लामाबादला ‘सीमेपलीकडील कोणताही दहशतवादी अड्डा भारताच्या आवाक्याबाहेर नाही’ असा इशारा दिल्यानंतर, पाकिस्तानचे संरक्षण दल प्रमुख फील्ड मार्शल असिम मुनीर यांनी पुन्हा एकदा गरळ ओकली आहे. भारतासोबतच्या गेल्या वर्षीच्या संघर्षाला ‘दोन विचारधारांमधील लढाई’ म्हटले.
भारतासोबतच्या चार दिवसीय संघर्षाला इस्लामाबादने दिलेल्या ‘मरका-ए-हक’ या नावाच्या पहिल्या वर्षपूर्तीनिमित्त रावळपिंडी येथील जनरल हेडक्वार्टर्समध्ये आयोजित एका समारंभात बोलताना, मुनीर यांनी दावा केला की, या संघर्षादरम्यान पाकिस्तानची रणनीती भारताच्या तुलनेत “श्रेष्ठ” होती. “मरका-ए-हक हे केवळ दोन देशांमध्ये किंवा सैन्यांमध्ये लढले गेलेले पारंपरिक युद्ध नव्हते, तर वास्तविक पाहता, ती दोन विचारप्रणालींमधील एक निर्णायक मरका (लढाई) होती, ज्यात अल्लाहच्या कृपेने सत्याचा विजय झाला आणि असत्याचा पराभव झाला,” असे ते म्हणाले.
अनेक हवाई तळ आणि लष्करी विमाने गमावूनही, पाकिस्तान अजूनही दावा करतो की या संघर्षात भारतावर त्यांचेच वर्चस्व होते. उपस्थितांना संबोधित करताना मुनीर म्हणाले, “आपल्या शत्रूंनी हे लक्षात ठेवले पाहिजे की, भविष्यात पाकिस्तानविरुद्ध कोणतेही घातपाती कृत्य करण्याचा प्रयत्न झाल्यास, युद्धाचे परिणाम मर्यादित न राहता अत्यंत व्यापक, धोकादायक, दूरगामी आणि वेदनादायी असतील.” आपल्या भाषणाच्या सुरुवातीला ते म्हणाले की, हा दिवस पाकिस्तान, तेथील जनता आणि सशस्त्र दलांसाठी “अभिमानाचा दिवस” आहे. मुनीर यांनी दावा केला की, ६-७ मे आणि १० मे च्या मध्यरात्री दरम्यान शत्रूंनी पाकिस्तानच्या सार्वभौमत्वाचे आणि भूभागाचे उल्लंघन करून आमच्या निर्धाराची परीक्षा घेण्याचा अयशस्वी प्रयत्न केला, त्याला “संपूर्ण राष्ट्रीय एकतेने आणि लष्करी बळाने” प्रत्युत्तर देण्यात आले.
गेल्या वर्षभरात मुनीर यांनी नवी दिल्लीला दिलेली ही पहिली धमकी नव्हती. गेल्या डिसेंबरमध्ये, संरक्षण दल प्रमुख (सीडीएफ) पदावर पदोन्नती मिळाल्यानंतर, मुनीर यांनी पाकिस्तानच्या युद्धसज्जतेबद्दल कोणताही “भ्रम” बाळगू नये असा इशारा नवी दिल्लीला दिला होता आणि “अधिक जलद, अधिक तीव्र आणि अधिक प्रखर” प्रत्युत्तर देण्याचे वचन दिले होते. एक पाऊल पुढे टाकत, त्यांनी सिंधू नदीकिनारी असलेल्या भारतीय पायाभूत सुविधा आणि धरणांना लक्ष्य करण्याची धमकी दिली होती. ऑगस्टमध्ये, अमेरिकी डायस्पोराच्या एका कार्यक्रमात भाषण देताना ते म्हणाले, “आपण एक अणुशक्तीशाली राष्ट्र आहोत. जर आपल्याला वाटले की आपला नाश होणार आहे, तर आपण अर्ध्या जगाला आपल्यासोबत खाली खेचू.”
हे ही वाचा:
१३ चेंडूत अर्धशतक! उर्विल पटेलची चेपॉकवर षटकारांची सुनामी
मोदी रेवंथ रेड्डींना म्हणाले, माझ्यासोबत या!
दुर्मिळ पक्ष्यांच्या शोधात गेले… आणि ठरले हंता व्हायरसचे ‘पेशंट झिरो’!
काश्मीरमध्ये गोल्फ टुरिझमला मोठी चालना
गेल्या वर्षी एप्रिलमध्ये पहलगाम येथे झालेल्या पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू करण्यात आले होते. ७ मे रोजी, भारताने रात्री केलेल्या हल्ल्यांमध्ये पाकिस्तानव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले.







