स्पेनकडे जाणाऱ्या ‘एमव्ही हॉन्डियस’ या आलिशान क्रूझ जहाजावर हंटाव्हायरसचा उद्रेक झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) या प्रकरणाची अधिकृत पुष्टी केली असून आतापर्यंत सहा रुग्णांमध्ये संसर्ग निश्चित झाला आहे, तर तीन जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे आंतरराष्ट्रीय आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.
हे जहाज अर्जेंटिनातून प्रवासाला निघाले होते आणि त्यावर विविध देशांतील प्रवासी व कर्मचारी होते. जहाजावरील काही प्रवाशांना ताप, श्वसनाचा त्रास आणि गंभीर संसर्गाची लक्षणे दिसू लागल्यानंतर तपास करण्यात आला. त्यानंतर हंटाव्हायरसचा संसर्ग असल्याचे स्पष्ट झाले. जहाजावर एकूण १४७ प्रवासी आणि कर्मचारी असल्याची माहिती देण्यात आली आहे.
हे ही वाचा:
दिल्लीत भाजप मुख्यालयासह सरकारी कार्यालयांवर हल्ल्याचा इशारा
तामिळनाडूत विजय यांचे सरकार येण्याचा मार्ग झाला मोकळा
रिलायन्स समूहाशी संबंधित प्रकरणांमध्ये मुंबईतील १७ ठिकाणी छापेमारी
होर्मुझ सामुद्रधुनीत अमेरिकन-इराणी संघर्षात भारतीय नाविकाचा मृत्यू
हंटाव्हायरस हा प्रामुख्याने उंदरांच्या विष्ठा, लघवी किंवा लाळेद्वारे पसरणारा धोकादायक विषाणू मानला जातो. काही प्रकरणांमध्ये हा संसर्ग मानवातून मानवातही पसरू शकतो, विशेषतः ‘अँडीज’ प्रकारातील विषाणूमध्ये अशी शक्यता अधिक असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे. या विषाणूमुळे फुफ्फुसांवर गंभीर परिणाम होऊ शकतो आणि मृत्यूचाही धोका वाढतो.
जहाजाला सुरुवातीला काही बंदरांमध्ये प्रवेश नाकारण्यात आला होता. मात्र परिस्थिती गंभीर होत गेल्यानंतर स्पेन सरकार आणि WHO यांच्या समन्वयातून जहाजाला कॅनरी आयलंडजवळ थांबण्याची परवानगी देण्यात आली. आता विविध देश त्यांच्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी विशेष विमानांची व्यवस्था करत आहेत. जर्मनी, फ्रान्स, बेल्जियम, नेदरलँड्स आणि इतर युरोपीय देशांनी बचाव मोहीम सुरू केली आहे.
WHO चे महासंचालक टेड्रोस अधानोम घेब्रेयेसस स्वतः स्पेनमध्ये पोहोचले असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, हा उद्रेक कोविडसारख्या जागतिक महामारीसारखा नसला तरी जहाजासारख्या बंदिस्त ठिकाणी संसर्ग वेगाने वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रवाशांचे विलगीकरण, तपासणी आणि संपर्क शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे.
दरम्यान, या जहाजावर दोन भारतीय कर्मचारी असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र भारतीय आरोग्य संस्थांनी सध्या भारतासाठी कोणताही तातडीचा धोका नसल्याचे स्पष्ट केले आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद आणि राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडून परिस्थितीवर सतत लक्ष ठेवले जात आहे.







