पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला म्हणून भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवून पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ ठिकाणी हवाई हल्ले करत जैश, लष्कर आणि हिजबुलचे दहशतवादी तळ उध्वस्त केले. या कारवाईनंतर भारताने स्पष्ट केले होते की, त्यांनी फक्त दहशतवादी छावण्यांना लक्ष्य केले. पाकिस्तानी लष्करी आस्थापने किंवा निवासी क्षेत्रांना लक्ष्य केलेले नाही. त्यामुळे पुढे तणाव वाढवायचा की नाही हा निर्णय पाकिस्तानने घेणे अपेक्षित होते. मात्र, पाकिस्तानने भारताच्या लष्करी ठिकाणांवर आणि नागरी भागांवर ड्रोन हल्ले करण्याचा प्रयत्न केला. हे सर्व हल्ले भारताने रोखले. यानंतर भारताने पाकिस्तानला जशास तसे उत्तर देण्यास सुरुवात केली.
भारताच्या प्रत्युत्तर कारवाईनंतरही पाकिस्तानकडून कुरघोड्या सुरूचं असून दुसरीकडे मात्र बिथरलेल्या पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री भारतासमोर गुडघे टेकताना दिसत आहेत. भारताने कारवाई थांबवली तर आम्हीही थांबण्याचा विचार करू, असं पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी म्हटले आहे. एका मुलाखतीत ते म्हणाले की, जर भारताने आणखी कोणतेही हल्ले केले नाहीत तर पाकिस्तान तणाव कमी करण्याचा विचार करेल. पण, पुढे ते असेही म्हणाले की, जर भारताने कोणताही नवीन हल्ला केल्यास त्याला प्रत्युत्तर मिळेल. आमचा संयम संपला होता म्हणून आम्ही प्रतिसाद दिला. जर भारत इथेच थांबला तर आम्हीही थांबण्याचा विचार करू, असे दार यांनी म्हटले.
स्थानिक वृत्तवाहिनीशी बोलताना इशाक दार म्हणाले की, जर भारताने आक्रमकता दाखवली नाही आणि हल्ले थांबवले तर आम्हालाही तणाव कमी करायचा आहे. पाकिस्तानला नेहमीच शांतता हवी आहे आणि जर भारत यावेळी थांबला तर आम्हीही शांततेचा विचार करू आणि प्रत्युत्तर देणार नाही. आमचे ध्येय विनाश आणि पैशाचा अपव्यय नाही. हा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानने विविध देशांशी संपर्क स्थापित केला आहे, असेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा..
रावळपिंडीवर फडकणार भारताचा तिरंगा
पाकिस्तानला मिळालेल्या आयएमएफ कर्जावर गुल पनागने काय केली टिप्पणी?
आतंकवादी हल्ल्यांचा परिणाम अमेरिकेवरही?
पाकिस्तानी हल्ल्यात जम्मूच्या शंभू मंदिराचे नुकसान
दरम्यान, भारत आणि पाकिस्तानकडून सुरू असलेल्या हल्ल्यांदरम्यान, भारताने शनिवारी सांगितले की पाकिस्तानी सैन्य आपले सैन्य सीमावर्ती भागात हलवत आहे. यामुळे संघर्ष वाढत आहे. विंग कमांडर व्योमिका सिंग आणि परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांच्यासमवेत पत्रकार परिषदेत बोलताना कर्नल सोफिया कुरेशी म्हणाल्या, पाकिस्तानी सैन्य सीमावर्ती भागात आपले सैन्य हलवत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे तणाव अधिक वाढत आहे.