पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाची पोलखोल करण्यासाठी आणि दहशतवादविरोधी भारताची लढाई याबद्दल इतर देशांना माहिती देण्यासाठी भारताकडून शिष्टमंडळे पाठवली जात आहेत. अमेरिका, पनामा, गयाना, ब्राझील आणि कोलंबियासह पाच देशांमध्ये ऑपरेशन सिंदूर आउटरीचचा भाग म्हणून सर्वपक्षीय संसदीय शिष्टमंडळ रवाना झाले आहे. काँग्रेस खासदार शशी थरूर हे या शिष्टमंडळाचे नेतृत्व करत असून शनिवारी पहाटे ते दिल्लीहून अमेरिकेसाठी निघाले आहेत.
यावेळी शशी थरूर यांनी स्पष्ट केले की, आपल्या देशासाठी आपण आवाज उठवला पाहिजे आणि जगाला संदेश दिला पाहिजे की दहशतवाद आपल्याला गप्प बसवू शकत नाही. दहशतवादाविरोधात लढण्यासाठी भारत ठाम आहे आणि सर्व शिष्टमंडळांचा हाच एक आवाज आहे. सर्वजण एकाच पानावर असणे चांगले आहे आणि सरकारची ब्रीफिंगही याच विषयावर होती. आम्ही तयार आहोत, सर्वांना परिस्थिती समजते आणि आम्ही त्याच भावनेने पुढे जात आहोत. आम्ही एका आवाजात बोलू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, शशी थरूर यांनी भारताची भूमिका, परराष्ट्र धोरण आणि जागतिक राजनैतिक कूटनीति यावरही आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीवरील विधानावरही भाष्य केले. ते म्हणाले की, “भारताच्या परराष्ट्र धोरणात पारदर्शकता आणि संवादाची परंपरा आहे, परंतु त्याला ‘मध्यस्थी’ म्हणणे चुकीचे ठरेल. सरकारची भूमिका चांगली माहिती आहे. कोणत्याही संकटाच्या वेळी, मदतीसाठी फोन करणाऱ्या आणि विचारणाऱ्या देशांशी नेहमीच संपर्क असतो. परंतु याचा अर्थ असा नाही की कोणतीही औपचारिक मध्यस्थी प्रक्रिया झाली आहे.” पुढे एक उदाहरण देत थरूर म्हणाले, जर एखाद्या देशाने आपल्याला फोन केला, आपल्याशी बोलले आणि आपण त्यांना आपल्या पावलांबद्दल सांगितले तर त्याला मध्यस्थी म्हणायचे का? मला नाही वाटत. परराष्ट्र मंत्री नेहमीच त्यांच्याशी कोणी संपर्क साधला हे सार्वजनिकरित्या सांगतात. जेव्हा जेव्हा इतर कोणत्याही परराष्ट्र मंत्र्यांनी त्यांना फोन केला तेव्हा त्यांनी सोशल मीडियावरील पोस्टद्वारे ते स्पष्ट केले होते.
हे ही वाचा:
अमेरिकेबाहेर बनवलेल्या आयफोनसह सर्व स्मार्टफोनवर २५ टक्के कर लादणार
“दहशतवादी आणि नागरिकांमध्ये फरक न करणाऱ्यांना सुरक्षेवर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही”
शेअर बाजाराला मिळालेलं ‘गिफ्ट’ : आशीषकुमार चौहान
अदाणींना टार्गेट का करण्यात आले, त्याचा उलगडा होतोय..
शशी थरूर हे नेतृत्व करत असलेल्या शिष्टमंडळात भाजप खासदार तेजस्वी सूर्या, भुवनेश्वर कलिता, शशांक मणी त्रिपाठी, एलजेपी (रामविलास) च्या शांभवी चौधरी, टीडीपीचे जीएम हरीश बालयोगी, शिवसेनेचे मिलिंद देवरा, जेएमएमचे सरफराज अहमद आणि अमेरिकेतील माजी भारतीय राजदूत तरनजीत सिंग यांचा समावेश आहे. हे शिष्टमंडळ, प्रथम न्यू यॉर्क येथे प्रवास करतील, जिथे ते ९/११ स्मारकाला भेट देणार आहेत. काँग्रेसचे जयराम रमेश यांच्या मते, संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी संपर्क साधल्यानंतर पक्षाने आनंद शर्मा, गौरव गोगोई, सय्यद नसीर हुसेन आणि राजा ब्रार ही चार नावे सुचवली होती. थरूर यांचे नाव, जे त्यापैकी नव्हते, मात्र थरूर यांच्या नावाचा समावेश झाल्याने पक्षाला धक्का बसला.







