दहशतवादाच्या विरोधात आयोजित करण्यात आलेल्या शांतता रॅलीवर पाकिस्तानातील खैबर पख्तूनख्वा प्रांतात आत्मघाती हल्ला झाल्याने किमान १४ जणांचा मृत्यू, तर दोन डझनहून अधिक जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये पाच पोलीस कर्मचारी आणि नऊ नागरिकांचा समावेश असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. हा हल्ला रविवारी स्वात जिल्ह्यातील कबाल शहरात झाला असून, पाकिस्तानातील वाढत्या दहशतवादी कारवायांबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
ही रॅली स्थानिक आदिवासी परिषद आणि नागरिकांनी दहशतवादाच्या निषेधार्थ तसेच परिसरात शांतता प्रस्थापित करण्याच्या मागणीसाठी आयोजित केली होती. शेकडो नागरिक या रॅलीत सहभागी झाले होते. रॅली पोलीस ठाण्याजवळ पोहोचत असताना आत्मघाती हल्लेखोराने स्फोट घडवून आणला. स्फोट इतका भीषण होता की परिसरात एकच गोंधळ उडाला आणि अनेक जण गंभीर जखमी झाले.
प्राथमिक तपासानुसार, हल्लेखोराने पोलीस ठाण्याजवळ प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता. पोलिसांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न करताच त्याने स्वतःला उडवून दिले. घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर रक्ताचा सडा पडला असून, अनेक वाहने आणि जवळील इमारतींचेही नुकसान झाले आहे. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, काहींची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही संघटनेने स्वीकारलेली नसली, तरी संशयाची सुई तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) या दहशतवादी संघटनेकडे वळली आहे. गेल्या काही वर्षांत खैबर पख्तूनख्वा प्रांतात टीटीपीच्या कारवायांमध्ये मोठी वाढ झाली असून, स्वात खोऱ्यात पुन्हा दहशतवादी सक्रिय झाल्याने स्थानिक नागरिक वारंवार आंदोलन करत आहेत.
हल्ल्यानंतर पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अली झरदारी, पंतप्रधान शहबाज शरीफ आणि गृहमंत्री मोहसिन नक्वी यांनी तीव्र निषेध व्यक्त केला. दहशतवादाचे संपूर्ण उच्चाटन करण्याचा निर्धार व्यक्त करत जखमींवर सर्वोत्तम वैद्यकीय उपचार करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत.
हे ही वाचा:
रस्त्यावर बांधकाम साहित्य टाकल्यास दंड!
तेल स्वस्त, बाजार मस्त! सेन्सेक्स ७९ हजारांच्या उंबरठ्यावर
मोदींना शिवीगाळ करणाऱ्या ‘त्या’ १५ वर्षीय मुलीविरुद्ध गुन्हा नाही
‘तन्वी भारताची पुढची सुपरस्टार’
विशेष म्हणजे, खैबर पख्तूनख्वा हा प्रांत गेल्या काही महिन्यांपासून दहशतवादी हल्ल्यांचे केंद्र ठरत आहे. पोलीस ठाणी, सुरक्षा दल आणि नागरिकांना लक्ष्य करून सातत्याने हल्ले होत असून, पाकिस्तान सरकारने अफगाणिस्तानातील तालिबान सरकारवर टीटीपीला आश्रय दिल्याचा आरोप केला आहे. मात्र, अफगाणिस्तानने हे आरोप फेटाळले आहेत.







