अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव पुन्हा एकदा धोकादायक टप्प्यावर पोहोचला आहे. अमेरिकेने इराणमधील बंदर अब्बास परिसरात केलेल्या हल्ल्यानंतर इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स अर्थात आयआरजीसीने अमेरिकन लष्करी तळांना लक्ष्य करत जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. त्यामुळे पश्चिम आशियात पुन्हा युद्ध भडकण्याची भीती निर्माण झाली असून संपूर्ण जगाचं लक्ष या संघर्षाकडे लागलं आहे.
इराणच्या सरकारी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेने होर्मुझ सामुद्रधुनीजवळील बंदर अब्बास भागात ड्रोन नियंत्रण केंद्र आणि काही लष्करी ठिकाणांवर कारवाई केली. अमेरिकेचा दावा आहे की इराणकडून व्यापारी जहाजांना आणि अमेरिकन सैन्याला धोका निर्माण होत होता, त्यामुळे ही कारवाई “संरक्षणात्मक” स्वरूपाची होती. मात्र इराणने हा दावा फेटाळत अमेरिकेवर थेट आक्रमण केल्याचा आरोप केला आहे.
हे ही वाचा:
मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट
‘पर्शियन गल्फ स्ट्रेट अथॉरिटी’ला ब्लॅकलिस्टमध्ये टाकले
“जबाबदारी माझी, प्रत्येक त्रुटी दुरुस्त करणार”
वर्क फ्रॉम होममुळे बदलतोय घर खरेदीचा ट्रेंड
या हल्ल्यानंतर आयआरजीसीने पहाटे अमेरिकन हवाई तळांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले केल्याचं जाहीर केलं. इराणने स्पष्ट इशारा देत म्हटलं की, “अमेरिकेकडून पुन्हा कोणतीही आक्रमक कारवाई झाली तर त्याला अधिक कठोर आणि निर्णायक उत्तर दिलं जाईल.” या हल्ल्यांमुळे कुवेत, बहरीन आणि आखाती देशांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. काही भागांत सायरन वाजवण्यात आले तर हवाई संरक्षण यंत्रणा सक्रिय करण्यात आल्या.
दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर दबाव कायम ठेवण्याचे संकेत दिले आहेत. होर्मुझ सामुद्रधुनीवर इराण किंवा अन्य कोणत्याही देशाचं नियंत्रण स्वीकारलं जाणार नाही, असं ट्रम्प यांनी स्पष्ट केलं. दुसरीकडे इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांनी अमेरिकेला कठोर इशारा देत इराण कोणत्याही युद्धासाठी पूर्णपणे तयार असल्याचं सांगितलं आहे.
होर्मुझ सामुद्रधुनी ही जगातील सर्वात महत्त्वाच्या तेल वाहतूक मार्गांपैकी एक मानली जाते. या भागात संघर्ष वाढल्यास जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती पुन्हा वाढू शकतात, अशी भीती व्यक्त केली जात आहे. आधीच सुरू असलेल्या युद्धविराम चर्चांवरही या नव्या संघर्षामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील अविश्वास आणखी वाढल्याने मध्यपूर्वेतील परिस्थिती अधिक स्फोटक बनली आहे.







