ठाकरे गटातून निवडून आलेल्या आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केलेल्या ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील पुन्हा एकदा वादाच्या केंद्रस्थानी आले आहेत. पत्रकारांशी बोलताना त्यांनी वापरलेल्या आक्षेपार्ह भाषेमुळे नव्या राजकीय चर्चांना तोंड फुटले आहे.
काही दिवसांपूर्वी संजय दिना पाटील यांनी आपल्या विरोधकांवर टीका करताना आक्रमक भूमिका घेतली होती. शिवसैनिकांनी अंगावर येण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना रुग्णालयात किंवा स्मशानात पाठवू, असे वक्तव्य त्यांनी केल्याचा आरोप झाला होता. या वक्तव्यावरून विरोधकांनी तीव्र टीका केली होती. त्यानंतर माध्यम प्रतिनिधींनी याबाबत त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी संतप्त होत पत्रकारांशीही अरेरावीची भाषा वापरल्याचा आरोप करण्यात आला.
या संपूर्ण प्रकरणावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांसमोर भूमिका मांडली. त्यांनी सांगितले की, संजय दिना पाटील यांच्याशी आपली चर्चा झाली असून पत्रकारांविषयी अपमानास्पद वक्तव्य करण्याचा त्यांचा कोणताही हेतू नव्हता, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. पत्रकारांशी त्यांचे नेहमीच चांगले संबंध राहिले असून कोणाच्याही भावना दुखावण्याची त्यांची इच्छा नव्हती, अशी भावना त्यांनी व्यक्त केल्याचे शिंदे यांनी सांगितले.
यावेळी बोलताना एकनाथ शिंदे यांनी संजय दिना पाटील यांची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. काही राजकीय नेते सातत्याने त्यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबीयांवर वैयक्तिक टीका करत असल्याचा दावा त्यांनी केला. अशा प्रकारच्या वक्तव्यांमुळे निर्माण झालेल्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर संजय दिना पाटील यांनी प्रतिक्रिया दिली असावी, असे एकनाथ शिंदे म्हणाले. मात्र, पत्रकारांविषयी अशा प्रकारची भाषा कोणत्याही लोकप्रतिनिधीने वापरू नये, हेही त्यांनी स्पष्ट केले. “जर पत्रकारांबाबत काही अपमानास्पद शब्द वापरले गेले असतील, तर त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करावी,” असा सल्लाही आपण संजय दिना पाटील यांना दिल्याचे शिंदे यांनी सांगितले. पत्रकारांशी त्यांचा कोणताही वैयक्तिक वाद नसल्याचेही त्यांनी नमूद केले.
हे ही वाचा:
खासदार संजय दिना पाटलांकडून पत्रकारांना शिवीगाळ
चीनच्या भूमीत भारताचा सुवर्ण पराक्रम! महिला रिले संघाचे यश
नसरापूरचा नराधम भीमराव कांबळे दोषी!
एनसीईआरटीच्या नववीच्या पुस्तकात प्रथमच ‘आणीबाणी’वरील स्वतंत्र धडा!
राज्यातील राजकीय वातावरणावर भाष्य करताना शिंदे यांनी २०२२ पासून राजकारणात वापरल्या जाणाऱ्या भाषेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीत सातत्याने खालच्या पातळीवरील आरोप-प्रत्यारोप, वैयक्तिक टीका आणि कुटुंबीयांवरून होणारे हल्ले वाढल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. अशा प्रकारच्या वक्तव्यांमुळे समाजात चुकीचा संदेश जात असल्याचेही ते म्हणाले.







