संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या नसरापूर येथील चिमुकलीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणात पुणे विशेष न्यायालयाने आरोपी भीमराव कांबळे याला दोषी ठरवले आहे. अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याचा आरोप न्यायालयात सिद्ध झाल्यानंतर हा महत्त्वपूर्ण निकाल देण्यात आला. आता आरोपीला कोणती शिक्षा सुनावली जाणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने नरसापूर येथील बालिकेवर झालेल्या अत्याचार व हत्या प्रकरणात आरोपी भीमराव कांबळेला २९ जूनला शिक्षा सुनावण्यात येणार आहे.
पुण्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथील साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करुन हत्या करण्यात आली. १ मे २०२६ रोजी पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे ही धक्कादायक घटना घडली होती. उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी आजीकडे आलेली चिमुकली अचानक बेपत्ता झाली होती. शोधमोहीम सुरू असतानाच तिचा मृतदेह गावातील एका गोठ्याजवळ आढळून आला. तपासात तिच्यावर लैंगिक अत्याचार करून हत्या करण्यात आल्याचे समोर आले आणि या घटनेमुळे राज्यभर संतापाची लाट उसळली.
घटनेनंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज, डीएनए अहवाल, फॉरेन्सिक पुरावे आणि साक्षीदारांच्या जबाबांच्या आधारे भीमराव कांबळे याला अटक करण्यात आली. तपासादरम्यान आरोपीविरोधात भक्कम पुरावे गोळा करण्यात आले. अवघ्या काही दिवसांत आरोपपत्र दाखल करून खटला जलदगतीने चालवण्यात आला. विशेष न्यायालयात सुनावणीदरम्यान सरकारी पक्षाने आरोपीविरुद्ध वैज्ञानिक पुरावे, साक्षीदारांचे जबाब आणि वैद्यकीय अहवाल सादर केले. न्यायालयाने हे सर्व पुरावे ग्राह्य धरत आरोपी दोषी असल्याचे स्पष्ट केले. सुनावणीदरम्यान ५० हून अधिक साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली होती.
निकाल सुनावताना न्यायालयाने आरोपीच्या कृत्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली. उपलब्ध माहितीनुसार, न्यायालयाने आरोपीला या गुन्ह्याची गंभीरता लक्षात आणून देताना, “तू काय केले आहेस ते पाहा आणि तुला कोणती शिक्षा व्हायला हवी हे स्वतः सांग,” अशा शब्दांत फटकारले. न्यायालयाच्या या निरीक्षणाची सर्वत्र चर्चा होत आहे. त्यावर भीमराव कांबळे याने पुन्हा आरोप फेटाळले. तो म्हणाला की, “मी त्या दिवशी त्या मुलीला गाठी शेव खाण्यासाठी घेऊन गेलो होतो. त्यावेळी मी पाय घसरून पडलो आणि त्याचवेळी त्या मुलीच्या डोक्यालाही मार लागला. मी तिला शांत करण्याचा प्रयत्न केला पण ती सारखी ओरडत होती,” असे भीमराव कांबळे याने म्हटले. यावर न्यायाधीश भीमराव कांबळेला म्हटले की, “आता तू जे सांगतो आहेस तो इतिहास झालाय, कारण तुझ्यावर गुन्हा सिद्ध झाला आहे. तुला कोणती शिक्षा द्यायला हवी.” न्यायाधीशांच्या या म्हणण्यावर भीमराव कांबळेने कोणतेच उत्तर दिले नाही.
हे ही वाचा:
एनसीईआरटीच्या नववीच्या पुस्तकात प्रथमच ‘आणीबाणी’वरील स्वतंत्र धडा!
‘संजय दिना पाटील यांनी ठार केलेले ५ लोक कोण?’
न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता यांना समर्पित भारत घडवू
इराणविरोधातील संघर्षात नाटो सहयोगींनी अमेरिकेला निराश केले!
सरकारी पक्षानेही न्यायालयाकडे आरोपीसाठी कठोरात कठोर शिक्षेची मागणी केली आहे. गुन्ह्याचे स्वरूप, पीडितेचे अल्पवय आणि आरोपीची क्रूरता लक्षात घेता हे प्रकरण “दुर्मीळातील दुर्मीळ” श्रेणीत मोडत असल्याचा युक्तिवाद करण्यात आला आहे. सरकारी वकिलांनी भीमराव कांबळे याला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. भीमराव कांबळेला कोणताही पश्चाताप नाही. तो दयेच्या लायकीचा नाही. ज्या मुलीने त्याच्यावर विश्वास ठेवला त्या मुलीवर त्याने ३९ मिनिटे अतिशय घृणास्पद प्रकार केला. वैद्यकीय तपासणीत भीमराव कांबळेने या मुलीवर विविध प्रकारे लैंगिक अत्याचार केल्याच समोर आल्याचे सरकारी वकिलांनी न्यायमूर्तींच्या निदर्शनास आणून दिले.







