आयकर विभागाने केलेल्या खळबळजनक दाव्यानुसार महाराष्ट्रात तब्बल एक हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे उघडकीस झाले आहे. सप्टेंबर महिन्याच्या २३ तारखेपासून सुरू असलेल्या आयकर विभागाच्या तपासातून ही माहिती पुढे आली आहे. या भ्रष्टाचारात काही व्यावसायिक दलाल आणि सरकारशी संबंधित व्यक्ती यांचा सहभाग असल्याचे समोर येत आहे. गुरूवार, ७ ऑक्टोबर रोजी आयकर विभागामार्फत हा गौप्यस्फोट करण्यात आला आहे.
गेल्या सहा महिन्यापासून या गैरव्यवहाराची माहिती आयकर विभागाला मिळत होती. त्या संदर्भात आयकर विभागातर्फे २५ घरांवर तर १५ कार्यालयांवर धाडी टाकल्या. मुंबईतील प्रसिद्ध अशा ओबेरॉय हॉटेल मधील काही खोल्या यासाठी वापरण्यात येत होत्या. या खोल्या दोन दलालांसाठी कायमस्वरूपी आरक्षित केलेल्या होत्या. हे दलाल या खोल्यांचा वापर ग्राहकांना भेटण्यासाठी करत असत. या खोल्यांची ही आयकर विभागामार्फत झाडाझडती करण्यात आली. या संपूर्ण व्यवहारात सहभाग असलेले लोक स्वतःसाठी कोड नेम्सचा वापर करत होते. तर एका प्रकरणात तब्बल दहा वर्षांपूर्वीच्या व्यवहारांच्या नोंदीही पुढे आल्या आहेत. या सर्व प्रकरणात तब्बल १०५० कोटीचा गैरव्यवहार झाल्याचा दावा आयकर विभागाने केला आहे.
हे दलाल मोठमोठ्या कंपन्यांना जामीन मिळवून देण्यापासून ते सरकारी परवानग्या मिळवून देण्यापर्यंत सर्व गोष्टी करत होते. त्यासाठी सुरक्षित समजल्या जाणाऱ्या संभाषणाच्या साधनांचा वापर करत होते. पण तरीही आयकर विभागाने गंभीर असे डिजिटल स्वरूपाचे पुरावे मिळवले आहेत. या दलालांमार्फत अंगडियांचाही वापर केला जात होता. या अंगडियांच्या मार्फत पैशाची देवाणघेवाण केली जात होती. यापैकी एका अंगडियाकडून दीड कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत.
आयकर विभागाने जप्त केलेल्या कागदपत्रांमध्ये एकूण आर्थिक व्यवहार, पैशांची देवाण-घेवाण, किती पैसे देणे, किती पैसे येणे बाकी आहे या सगळ्यांच्या नोंदी आहेत. प्रत्येक व्यवहाराची एकूण किंमत २०० करोड पेक्षा अधिक आहे. यात सरकारी अधिकाऱ्यांनी महत्त्वाच्या जागांवर बदली मिळवण्यासाठी मोजलेले पैसे, ठेकेदारांनी अडकलेली देयके मिळवण्यासाठी दिलेले पैसे या प्रकारच्या व्यवहारांचा समावेश आहे.
यापैकी एका दलालाने शेतकऱ्यांकडून जमीन खरेदी करून ती सरकारी कंपन्या, अथवा खाजगी बड्या कंपन्यांना विकून मोठ्या प्रमाणात काळा पैसा जमा केल्याचे उघडकीस आले आहे. यात अनेक मोठ्या सरकारी अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी आर्थिक गुंतवणूक केल्याचेही समोर आले आहे.
या तपासात एका कार्यालयातून तारखेनुसार केलेल्या व्यवहारांचे पुरावे पुढे आले आहेत. यामधून २७ कोटी रुपयांच्या ठेवी आणि ४० कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचेही समोर आले आहे. तर विविध लोकांना एकूण २३ कोटी रुपयांचे दिल्याचेही पुढे आले आहे. तर काही व्हॉट्सॲप संभाषणावरून १६ कोटी रुपये मिळाल्याचे आणि १२ कोटी रुपये खर्च केल्याचेही पुढे आले आहे. हा दलाल सरकारी कराराची मुदत वाढवणे, तसेच विविध सरकारी योजनांच्या अंतर्गत भूखंड मिळवून देणे या प्रकारची कामे करत होता आणि त्या बदल्यात ही बडी रक्कम कमावत होता.
हे ही वाचा:
छत्तीसगडमध्ये का सुरु झाला हिंदू-मुसलमान संघर्ष?
पाकिस्तानला मिळणारी मदत तातडीने थांबवा!
यापैकी काही व्यक्तींचे स्वतःचे मोठे भूखंड व्यवहारांचे आणि बांधकामांचे व्यवसाय आहेत. त्या संबंधितही आर्थिक देवाण-घेवाण झाल्याचे उघड झाले आहे. विविध मोबाईल फोन, पेन ड्राईव्ह, हार्ड ड्राईव्ह, आय क्लाऊड ई-मेल अशा विविध ठिकाणांहून ही सर्व माहिती मिळाली आहे. तर ४.६ कोटींची रोख आणि ३.४२ कोटींचे दाग-दागिने जप्त करण्यात आले आहेत. यासोबतच चार लॉकर देखील ताब्यात घेण्यात आले आहेत.
याच प्रकरणात भाजपा आमदार आणि मुंबई भाजपाचे प्रभारी अतुल भातखळकर यांनी ट्विट करून ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे. “खेळ खल्लास राज्यात आयकर खात्याच्या धाडीत सापडले १०५० कोटींच्या भ्रष्टाचाराचे पुरावे. बदल्यांसाठीची देवाणघेवाण २०० कोटींची. लॅपटॉप, पेन ड्राईव्ह, हार्ड डिस्कमध्ये सापडली भ्रष्टाचाराची कुंडली. प्रेस इन्फॉरमेशन ब्युरोने जारी केला बक्कळ तपशील.”