राज्यात आज जाहीर झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या निकालांनी ग्रामीण महाराष्ट्रातील राजकीय चित्र स्पष्ट केले आहे. एकूण १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समितींचे निकाल आज पूर्ण झाले असून भारतीय जनता पक्षाने सर्वाधिक यश मिळवत स्वतःला ‘पार्टी नंबर एक’ म्हणून सिद्ध केले आहे. या निवडणुकांमध्ये जिल्हा परिषदांच्या एकूण ७३१ जागा, तर पंचायत समितींच्या हजारो जागांसाठी मतदान झाले होते. या ७३१ जागां पैकी भाजपने २५२ जागांवर आपले वर्चस्व दाखवले असून त्यांच्यानंतर त्यांचाच मित्रपक्ष असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसने १७२ जागांवर आघाडी घेतली आहे. निकालांनुसार भाजपने सर्वाधिक जागांवर विजय मिळवत राज्याच्या ग्रामीण राजकारणात आपले वर्चस्व मजबूत केले आहे.
हे ही वाचा:
पंजाबमध्ये वर्गातच विद्यार्थिनीला घातली गोळी
आयबीचे अहवाल पाकिस्तानला पुरवले; हिमंतांच्या निशाण्यावर गौरव की सोनिया?
२०२६-२७ मध्ये भारत जी २० देशांना मागे टाकत होणार नंबर १
‘मोबाईलचे गुलाम बनू नका, त्याचा योग्य वापर करा!’
कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा या तिन्ही विभागांमध्ये भाजपची कामगिरी ठळक ठरली. सिंधुदुर्ग, सोलापूर, परभणी, धाराशिव यांसारख्या जिल्ह्यांमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूरमध्ये बहुपक्षीय लढती पाहायला मिळाल्या, तरीही भाजपने अनेक ठिकाणी निर्णायक भूमिका मिळवली आहे. रत्नागिरी आणि रायगडमध्ये शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसने काही प्रमाणात ताकद दाखवली असली, तरी एकूण निकाल भाजपच्या बाजूने झुकलेले दिसतात. लातूर जिल्ह्यात काँग्रेसने सर्वाधिक जागा मिळवत आपले अस्तित्व कायम ठेवले आहे.
या निवडणुकांमध्ये मतदारांचा उत्साहही मोठ्या प्रमाणात दिसून आला. राज्यभर सरासरी मतदान सुमारे ६५ टक्क्यांहून अधिक झाले असून काही जिल्ह्यांमध्ये हे मतदान ७० टक्क्यांच्या पुढे गेले. ग्रामीण भागातील पाणीटंचाई, रस्ते, आरोग्य केंद्रे, शाळा, तसेच शेतकऱ्यांशी संबंधित योजनांवर मतदारांनी स्पष्टपणे आपला कौल दिल्याचे चित्र आहे. महिला आणि तरुण मतदारांचा सहभागही यावेळी लक्षणीय राहिला.
निकालांवर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेचे आभार मानले. ते म्हणाले की, “या निकालांतून ग्रामीण महाराष्ट्राने विकासकामांवर विश्वास व्यक्त केला आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पातळीवर भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला, ही बाब आमच्यासाठी जबाबदारी वाढवणारी आहे.” सरकारच्या योजनांचा फायदा शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचा निर्धार त्यांनी पुन्हा व्यक्त केला.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, ज्या ठिकाणी अपेक्षित यश मिळाले नाही, तिथे आत्मपरीक्षण केले जाईल. “लोकशाहीत विजय आणि पराभव स्वीकारून पुढे जाणे गरजेचे आहे. आगामी ५ वर्षांत जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या माध्यमातून ग्रामीण विकासाला अधिक गती दिली जाईल,” असेही त्यांनी स्पष्ट केले. या निकालांमुळे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि राज्याच्या राजकारणाची दिशा ठरणार असल्याचे मत राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत.







