राज्यात आज सुरू असलेल्या मतमोजणीतील सुरुवातीच्या कलांवरून भारतीय जनता पक्ष (भाजप) आघाडीवर असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. सकाळपासून समोर येत असलेल्या आकडेवारीनुसार अनेक महत्त्वाच्या ठिकाणी भाजपने निर्णायक आघाडी घेतल्याचे चित्र आहे. मुंबईत आतापर्यंत २२७ पैकी २२५ जागांचे कल समोर आले असून, त्यापैकी ९९ जागांवर भाजप आघाडीवर आहे. भाजपचा मित्र पक्ष असलेल्या शिवसेनाने ३१ जागांवर आघाडी घेतली आहे. दुसरीकडे, मुंबईकरांनी ठाकरे बंधूंनी केलेल्या भावनिक आवाहनाला अपेक्षित प्रतिसाद दिला नसल्याचे स्पष्ट होत आहे. मुंबईत सध्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ६२ जागांवर आघाडीवर असून, महाराष्ट्र नवनिर्माण सेना ९ जागांवर आघाडीवर आहे. ठाण्यात शिवसेना (शिंदे गट) आघाडीवर असल्याचे चित्र आहे. येथे १३१ जागांपैकी ७० जागांचे कल समोर आले असून, त्यापैकी ३५ जागांवर शिंदे गटाची शिवसेना तर १५ जागांवर भाजप आघाडीवर आहे.
हे ही वाचा:
“भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल वाईट बोलणारे राहुल गांधी देशाची माफी मागणार का?”
इराणमधून ३०० भारतीयांसह विमान दिल्लीत पोहचणार
मेहुल चोक्सीचा मुलगा मनी लाँड्रिंगमध्ये सक्रिय!
अखेर ट्रम्प यांना मिळाला नोबेल पुरस्कार! प्रकरण काय?
सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपची कामगिरी अपेक्षेपेक्षा चांगली असल्याचे दिसत आहे. अनेक प्रमुख मतदारसंघांमध्ये भाजप उमेदवारांनी निर्णायक आघाडी घेतली असून, मतमोजणी पुढे जात असताना हे अंतर वाढताना दिसत आहे. पुण्यात भाजपने एकहाती सत्ता आपल्या बाजूने खेचल्याचे चित्र आहे. १६५ पैकी सध्या ९२ जागांचे निकाल समोर आले असून, त्यापैकी भाजप ८० जागांवर आघाडीवर आहे.
पिंपरी-चिंचवडमध्येही भाजपने १२७ पैकी ७७ जागांवर निर्णायक आघाडी घेतली आहे. यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा धक्का मानला जात आहे. येथे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ३८ जागांवर आघाडीवर आहे. राजकीय जाणकारांच्या मते, संघटनात्मक ताकद, आक्रमक प्रचार आणि मतदारांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवलेले मुद्दे याचा थेट फायदा भाजपला होत आहे.
राज्यात सुरू असलेल्या मतमोजणीतील प्राथमिक कलांमध्ये मुंबई–पुण्यापाठोपाठ इतर महत्त्वाच्या महापालिकांमध्येही भाजपची आघाडी दिसून येत आहे. सोलापूर महापालिकेत १०२ पैकी ४६ जागांचे कल समोर आले असून भाजप २६, काँग्रेस ९ तर राष्ट्रवादी काँग्रेस ७ जागांवर आघाडीवर आहे. नाशिकमध्ये १२२ पैकी ५८ जागांचे कल जाहीर झाले असून भाजप ३२, शिंदे गटाची शिवसेना १२, तर शिवसेना (उबाठा) ८ जागांवर आघाडीवर आहे. जालना महापालिकेत ६८ पैकी ३१ जागांचे कल समोर आले असून भाजप १८ जागांवर, काँग्रेस ७ तर राष्ट्रवादी ४ जागांवर आघाडीवर आहे.
दुसरीकडे वसई-विरार महापालिकेत १३२ पैकी ६० जागांचे कल समोर आले असून भाजप २४, बहुजन विकास आघाडी २१ आणि शिवसेना (उबाठा) १० जागांवर आघाडीवर आहे. नागपूर महापालिकेत १५६ पैकी ७४ जागांचे कल जाहीर झाले असून भाजप ४८, काँग्रेस १७ आणि इतर ९ जागांवर आघाडीवर आहेत. सांगली-मिरजमध्ये १०० पैकी ४२ जागांचे कल समोर आले असून भाजप २१ तर काँग्रेस १६ जागांवर आघाडीवर आहे. छत्रपती संभाजीनगर महापालिकेत ११५ पैकी ५३ जागांचे कल समोर आले असून भाजप २९, एआयएमआयएम ११ आणि काँग्रेस ८ जागांवर आघाडीवर असल्याचे चित्र आहे.
दुसरीकडे, विरोधी पक्षांमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये अपेक्षित यश मिळताना दिसत नाही. काही ठिकाणी चुरशीची लढत असली तरी सध्या भाजपचा कल वरचढ असल्याचे स्पष्ट होत आहे. मात्र अनेक मतदारसंघांमध्ये आघाडी-पिछाडीतील फरक कमी असल्याने अंतिम निकालाबाबत अनिश्चितता कायम आहे.
भाजप नेत्यांकडून सुरुवातीच्या कलांचे स्वागत करण्यात येत असून, मतदारांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल समाधान व्यक्त केले जात आहे. मात्र अंतिम निकाल जाहीर होईपर्यंत संयम बाळगण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. विरोधी पक्षांकडून “लढत अजून संपलेली नाही” अशी प्रतिक्रिया दिली जात आहे.







