संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या टप्प्यातील कामकाजाचा गुरुवार, १३ फेब्रुवारी हा शेवटचा दिवस आहे. दरम्यान, वक्फ विधेयकावरील संयुक्त संसदीय समितीचा (जेपीसी) अहवाल आज दोन्ही सभागृहात सादर करण्यात येणार होता. जेपीसीचा अहवाल राज्यसभेत सादर करण्यात आल्यानंतर सदस्यांनी प्रचंड गोंधळ घातला. दरम्यान, लोकसभेत प्रश्नोत्तराचा तास सुरू झाल्यानंतर मोठा गोंधळ झाला. गोंधळामुळे सभागृहाचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.
वक्फ (सुधारणा) विधेयक, २०२४ वरील जेपीसीचा अहवाल विरोधकांच्या प्रचंड गोंधळात राज्यसभेत मांडण्यात आला. पण, पुढे अध्यक्ष जगदीप धनखड यांना कामकाज तहकूब करावे लागले. वक्फ मालमत्तांची नोंदणी सुलभ करण्याच्या उद्देशाने विधेयकावरील अहवाल राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी मांडताच, विरोधी पक्षाच्या खासदारांनी असा दावा केला की असहमतीच्या नोंदींचे काही भाग काढून टाकण्यात आले आणि घोषणाबाजी करण्यात आली. कामकाज पुन्हा सुरू होताच धनखड यांनी राष्ट्रपतींचा संदेश वाचून दाखवण्याचा प्रयत्न केला तेव्हा गोंधळ सुरूच राहिला. अहवालावरील चर्चेदरम्यान विरोधकांनी अखेर राज्यसभेतून सभात्याग केला.
काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, आमच्या विचारांना धक्का देणारे आणि खोटे अहवाल विरोधक स्वीकारणार नाहीत. तसेच हा अहवाल जेपीसीकडे परत पाठवून पुन्हा सादर करण्याची मागणी केली. जेपीसीच्या अहवालात अनेक सदस्यांचा असहमती अहवाल आहे. त्या नोट्स काढून टाकणे आणि आमचे विचार दाबून टाकणे योग्य नाही. हे लोकशाहीविरोधी आहे. आम्ही असे बनावट अहवाल कधीही स्वीकारणार नाही. जर अहवालात असहमतीचे विचार नसतील तर ते परत पाठवून पुन्हा सादर करावेत, अशी मागणी खरगे यांनी लावून धरली आहे.
मल्लिकार्जुन खरगे यांच्या दाव्यांना केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी उत्तर दिले आहे. असहमतीच्या नोंदी अहवालाच्या परिशिष्टात जोडल्या गेल्या असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच विरोधकांवर सभागृहाची दिशाभूल केल्याचा आरोपही केला. अहवालातून कोणताही मुद्दा हटवण्याचा किंवा काढून टाकण्याचा प्रश्न नाही. विरोधी पक्षाचे सदस्य अनावश्यक मुद्दा निर्माण करत आहेत, असे ते म्हणाले.
हे ही वाचा :
लालूप्रसाद यादव म्हणतात, जब तक बिहार मे है लालू…
अमेरिकेच्या उपाध्यक्षांच्या मुलांना मोदींनी दिलेल्या भेटवस्तूंमधून भारतीय संस्कृतीची ओळख
निवडणुक अर्जात खरी माहिती लपवून ठेवल्याप्रकरणी धनंजय मुंडेंना कारणे दाखवा नोटीस
युक्रेन- रशिया युद्ध संपणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा चर्चेसाठी पुढाकार
दरम्यान, राज्यसभेत राडा झाल्यानंतर लोकसभेतही गोंधळ झाला. विधेयक मागे घेण्याचीही मागणी करण्यात आली. अखेर लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी कामकाज दुपारी २ पर्यंत स्थगित केलं. प्रश्नोत्तराच्या काळात कुठलाही गदारोळ घालायचा नसतो. नव्याने निवडून आलेले खासदार प्रश्न उपस्थित करत असतात. त्यांच्यासमोर तुम्ही विरोधक म्हणून गदारोळाचा आदर्श घालून देत आहात का? आत्ता जे सुरू आहे त्यावरुन हेच दिसतं आहे की तुम्हाला सदनाचं कामकाज योग्य पद्धतीने चालू द्यायचं नाही, असे म्हणत त्यांनी लोकसभेचे कामकाज स्थगित केले.