गेल्या काही दिवसांपासून उत्तर प्रदेशमधील काही शहरांमध्ये हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. प्रयागराज येथेही हिंसाचार घडला होता. त्यानंतर योगी आदित्यनाथ यांनी आंदोलनकार्त्यांवर कठोर पावलं उचलायला सुरुवात केली आहे. प्रयागराज हिंसाचाराचा मुख्य सूत्रधार मोहम्मद जावेद याच्या घराचा काही भाग पाडण्यात आला आहे. प्रयागराज विकास प्राधिकरणाने (PDA) यासंदर्भात नोटीस जारी केली होती.
घर बेकायदेशीरपणे बांधले गेले असून आवश्यक परवानगी घेतली गेली नाही, असे प्रयागराज डेव्हलपमेंट अथॉरिटी (PDA) च्या नोटीसमध्ये असे म्हटले आहे. इमारतीच्या बांधकामात नियमांचे उल्लंघन करण्यात आले आहे. घर खाली करण्यास सांगण्यात आले होते. त्यासाठी प्राधिकरणाने त्यांच्या घराच्या दारात नोटीस लावली होती. ज्यामध्ये कुटुंबातील सदस्यांना १२ जून रोजी म्हणजेच रविवारी सकाळी ११ वाजेपर्यंत घर सोडण्याचे आदेश देण्यात आले होते. याप्रकरणी प्राधिकरणाने जावेदला ५ मे रोजी कारणे दाखवा नोटीस बजावली होती.
तसेच उत्तर न मिळाल्याने आणि इमारत रिकामी न केल्याने पुन्हा ९ जून रोजी दुसरी नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतर आज प्राधिकरणाने कारवाई केली आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलीस घरात घुसून सामान बाहेर काढत असल्याचे सांगण्यात येत आहे.
हे ही वाचा:
‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राजीनामा द्या’
नुपूर शर्मांच्या समर्थनार्थ नेपाळमध्ये एकत्र आले हिंदू
शिवसेनेऐवजी राष्ट्रवादीचा उमेदवार असता तर निवडून आला असता!
भारताच्या अर्थव्यवस्थेचे आणि पंतप्रधान मोदींचे अमेरिकेकडून कौतुक
पैगंबर यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर नुपूर शर्मा यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे तरीही वाद थांबण्याचे नाव घेत नाहीये. शुक्रवार, १० जून रोजीच्या नमाजानंतर दिल्ली, लखनौ, कोलकातामध्ये मुस्लिमांनी निदर्शने केली. यानंतर महाराष्ट्रातील काही शहरांमध्येही निदर्शने करण्यात आली होती. त्यानंतर प्रयागराजमध्ये हिंसाचार करणाऱ्यांची ओळख पटली असून ६८ जणांना अटक करण्यात आली आहे. तर, सहारनपूरमध्ये ४८, हाथरसमध्ये ५०, मुरादाबादमध्ये २५, फिरोजाबादमध्ये ८, आंबेडकर नगरमध्ये २८ जणांना अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.