जम्मू- काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्याला भारताने पाकिस्तानला ठोस प्रत्युत्तर द्यावे, अशी भूमिका विरोधी पक्षांकडून केली जात असून यासाठी पाठिंबा असल्याचेही या पक्षांनी म्हटले आहे. शरद पवारांनी सरकारला पाठींबा दिला आहे. मात्र, शरद पवारांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा राजीनामा न मागितल्याने ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उघड नाराजी व्यक्त केली आहे. तसेच शरद पवारांना आर. आर. पाटील, विलासराव देशमुख यांच्या राजीनाम्याची आठवण करून देत त्यांचा राजीनामा का घेतला असा सवाल विचारला आहे.
दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ठोस प्रत्युत्तर द्यावे, अशी मागणी विरोधी पक्षांकडून करण्यात येत आहे. यासाठी शरद पवार यांनी सरकारला आपला पाठिंबा असल्याचे जाहीर केले होते. यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांनी मात्र, नाराजी व्यक्त केली आहे. “२६/११ च्या हल्ल्यानंतर आर. आर. पाटील आणि विलासराव देशमुख यांचा राजीनामा घेतला गेला होता. जर तेव्हाचे राजीनामे योग्य होते, तर आज अमित शाह यांचा राजीनामा का नको?” असा थेट सवाल संजय राऊत यांनी शरद पवार यांना विचारला आहे.
शरद पवारांना उद्देशून संजय राउत म्हणाले की, “सरकार बरोबर आहात म्हणजे तुम्ही सरकारच्या चुकांबरोबर आहात का? देशाच्या सुरक्षेच्या संदर्भात सरकारने ज्या चुका केल्या आहेत त्याच्यावर कोणी बोलायचं? शिवराज पाटील यांचा राजीनामा घेतला होता तेव्हा शरद पवार मंत्रिमंडळात होते. शिवराज पाटील यांनी बॉम्बस्फोट घडवले नव्हते ना, पण त्यांची नैतिक जबाबदारी होती. काँग्रेसने शिवराज पाटील यांचा राजीनामा घेतला होता.”
हे ही वाचा :
पंकजा मुंडेंना अश्लील संदेश पाठवणाऱ्या एकाला पुण्यातून अटक
कर्नाटकमध्ये बजरंग दलाच्या कार्यकर्त्याची हत्या
राजधानीत वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस; जनजीवन विस्कळीत
बीएसएफने दहशतवादी कटकारस्थान उधळलं
संजय राऊत म्हणाले की, गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे. चुन चुन के मारेंगे हे प्रत्येक वेळेला बोलतात. काँग्रेसच्या काळात सुद्धा गृहमंत्री हेच बोलत होते, आता देखील तुम्ही हेच बोलत आहात. भारतीय जनता पक्ष आणि भाजपचे मंत्री हे काँग्रेस पक्षाची भ्रष्ट नकल आहे. कार्बन कॉपी नाही तर भ्रष्ट नकल आहे. मुळात जे घडलं आहे त्याला जबाबदार गृहमंत्री आहेत. ही जबाबदारी घेऊन अमित शाह यांनी राजीनामा दिला पाहिजे. ते राजीनामा देत नसतील तर प्रधानमंत्री त्यांना पदावरून हटवले पाहिजे, अस संजय राऊत म्हणाले.