महाराष्ट्र रोज सध्या कोरोना रुग्णसंख्या वाढीच्या बाबतीत नवा विक्रम रचताना दिसत आहे. महाराष्ट्र्र राज्याचा कोरोना रुग्णसंख्येच्या बाबतीत देशात प्रथम क्रमांक लागतो तर जगात महाराष्ट्र चौथ्या क्रमांकाला आहे. दैनंदिन रुग्णसंख्या वाढीच्या बाबतीतही महाराष्ट्र रोज नवा विक्रम रचताना दिसत आहे. शुक्रवारीही कोरोना रुग्णवाढीच्या बाबतीतही महाराष्ट्र्रात सर्वात जास्त वाढ झाली आहे.
शुक्रवारी महाराष्ट्रात ३६,९०२ नवे कोरोना रुग्ण वाढले आहेत. या रुग्णवाढी नंतर महाराष्ट्रातील सक्रिय रुग्णांचा आकडा २,८२,४५१ इतका झाला आहे. महाराष्ट्राच्या या परिस्थितीचे अतिशय गंभीर पडसाद उमटताना दिसत आहेत. महाराष्ट्र सध्या लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर आहे.रविवार २८ मार्च पासून महाराष्ट्रात रात्रीची जमावबंदी लावण्यात येत आहे. मुख्यमंत्री कार्यालयाकडून या संबंधीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रात सुरु असलेला कोरोनाचा हाहाकार लक्षात घेता सरकारमार्फत हा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य सध्या कोरोना रुग्णसंख्येच्या बाबतीत भारतात प्रथम क्रमांकावर आहे. तर जगात रुग्णसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्राचा चौथा क्रमांक लागतो.
शुक्रवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात कोरोना संदर्भातील एक महत्वाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत मुख्यमंत्र्यानी जिल्हाधिकारी, विभाग आयुक्त, पोलीस आयुक्त, जिल्हा कोविड रुग्णालयातील डॉक्टर्स या सर्वांशी चर्चा करून राज्यातील कोविड परिस्थितीचा आढावा घेतला. या बैठकीनंतरच राज्यात २८ तारखेपासून रात्रीची जमावबंदी लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मुख्यमंत्री कार्यालयाच्या ट्विटर हॅण्डलवरून या संबंधीचे ट्विट केले आहे. “रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता गर्दी टाळणे,संसर्गाला रोखण्यासाठी कडक उपाययोजना लागू करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करणे नाईलाजाने गरजेचे ठरत असल्याने राज्यभरात रविवार,२८ मार्च २०२१ पासून रात्रीची जमावबंदी लावण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी दिल्या” असल्याचे या ट्विटमध्ये म्हटले आहे.