पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षा व्यवस्थेतील गफलतीमुळे देशात संताप व्यक्त होत असताना आता पंजाबचे पोलिस महासंचालक आणि मुख्य सचिवांना निलंबित करा अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश एनव्ही रमण्णा यांच्यासमोर हे प्रकरण आले असून ज्येष्ठ वकील मणिंदर सिंग यांनी ही याचिका दाखल केली आहे. शुक्रवारी त्यावर सुनावणी होणार आहे. पंतप्रधानांच्या बाबतीत अशी दिंरगाई चालणार नाही, पंजाब सरकारने यासंदर्भात जबाबदारी निश्चित करावी आणि संबंधित व्यक्तींवर कारवाई करावी अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.
पंजाबचे मुख्य सचिव अनिरुद्ध तिवारी व पोलिस महासंचालक सिद्धार्थ चटोपाध्याय यांना निलंबित करण्यात यावे असेही याचिकेत म्हटले आहे.
पंजाबचे मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी यांनी याप्रकरणी विशेष तपास समितीची स्थापना केली असून या समितीच्या माध्यमातून सुरक्षा व्यवस्थेत झालेल्या दिरंगाईचा तपास करण्यात येणार आहे. त्या समितीत निवृत्त न्यायाधीश मेहताब सिंह गिल व गृह तसेच न्याय विभागाचे मुख्य सचिव अनुराग वर्मा यांचा समावेश आहे.
हे ही वाचा:
सुरक्षा व्यवस्थेतील हलगर्जीपणाबद्दल फिरोजपूर एसएसपी निलंबित
पहिल्या ‘ममी’ वरील संशोधन पूर्ण! ‘ही’ तथ्ये आली समोर
पंतप्रधानांचा ताफा अडवणारा ‘हात’ कोणाचा?
पोलिसांनीच सांगितला पंतप्रधानांच्या प्रवासाचा मार्ग
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विविध प्रकल्पांचे लोकार्पण करण्यासाठी पंजाबातील फिरोजपूर येथे जाणार होते. प्रारंभी हेलिकॉप्टरने त्यांचा प्रवास होणार होता, पण खराब हवामानामुळे हवाई मार्गे न जाता रस्तामार्गेच प्रवास करण्याचे ठरले. पण फिरोजपूरहून ३० किमी अंतरावर असताना पंतप्रधानांचा ताफा शेतकरी आंदोलकांनी अडविला. त्यामुळे पंतप्रधानांना २० मिनिटे उड्डाण पुलावर थांबून राहावे लागले. त्यानंतर ते नियोजित स्थळी न जाताच माघारी वळले. पंतप्रधानांनी याबाबत तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करत मुख्यमंत्री चन्नी यांना खडे बोलही सुनावले होते.